लिज्जतकथा

शिक्षण नाही,
अनुभव नाही,
भांडवल नाही,
मदत नाही,
समाजाचा सपोर्ट नाही….या परिस्थितीत भलेभले हात टेकतात. मात्र सात महिलांनी या परिस्थितीवर मात करून तब्बल 1600 करोडचा व्यवसाय उभा केला. त्यांच्या जिद्दीची आणि अचाट बिझनेस कौशल्याची ही गोष्ट !

वर दिलेली कारणं तुमच्या पण प्रगतीच्या आड येत असतील तर ही गोष्ट वाचून तुम्हाला लक्षात येईल की ही फक्त “कारणे” आहेत , प्रश्न नाहीत.

तर .. ते वर्ष असेल साधारण 1950 चं.. जेव्हा भारतातील बहुतांश लोकांच्या पदरी शिक्षण नव्हतं. शिक्षणालाच मुळात तेव्हा तितकंस महत्त्व प्राप्त झालेलं नव्हतं, असा तो काळ. या काळात सात बायकांनी
(जसवंतिबेन जमनादास पोपट, परवतीबेन रामदास थोडानी, उजंबेन नरांडास कुंडलिया, बानुबेन एन. तन्ना, लगुबेन अमृतलाल गोकानी, जयबेन वी. विथलानी, आणि दिवालिबेन लुक्का..)
जसवंतिबेन जमनादास पोपट यांना लिज्जत पापड चे प्रमुख संस्थापक मानले जाते.

ज्यांना मुळात उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा कोणताही अनुभव नव्हता ना पदरी शिक्षण होतं.. अशा बायकांनी एकत्र येऊन एक असा उद्योगव्यवसाय सुरू केला की जो बघता बघता प्रचंड वाढला. या व्यवसायाची उलाढाल अल्पावधीतच तब्बल 1600 कोटींइतकी झाली आणि तब्बल 69 शाखाही अस्तित्वात आल्या.
या विलक्षण उद्योगव्यवसायाचं नाव होतं, ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड !’

अलिकडच्या काळातील टॉपक्लास दोन कंपन्या ‘स्टारबक्स’ आणि ‘Apple’ यांच्या व्यावसायिक धोरणांशी मिळतीजुळती तत्व भारतातील लिज्जत पापड समूहानी त्याकाळीच राबवली होती.

काय होतं या कंपनीच्या धोरणांमध्ये एवढं विशेष की ज्यामुळे ही कंपनी अल्पावधीतच एवढी फोफावली आणि तब्बल 62 वर्षांहून अधिक काळ या कंपनीने जनमानसावर राज्य केलं ?
तत्कालीन भारताची स्थिती अशी होती की जेव्हा अगदी 8 टक्केच महिला शिकलेल्या होत्या. मात्र, शिकलेल्या असूनही त्यांनासुद्धा घराबाहेर पडून काम करण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीही, 1959 च्या सुमारास सात महिलांनी एकत्र येत अशी कल्पना प्रत्यक्षात आणली ज्यासाठी त्यांना कुठेच घराबाहेर न जाताही नफा कमावता येणार होता. शिवाय वेळेचं बंधन नव्हतं आणि हे उत्पादन तत्कालीन बाजारपेठेची गरजही होतं.

सुरूवातीला मिळालेल्या अवघ्या 80 रूपयांच्या भांडवलातून काम सुरू झालं. मात्र एवढ्याशा भांडवलातूनही त्यांनी बनवलेले पापड इतके चविष्ट होते की अल्पावधीतच लहानमोठ्या दुकानदारांनी हे पापड आपल्याकडे विक्रीसाठी ठेवण्यास सुरूवात केली.

आता हळूहळू लिज्जत पापडने आपला व्यवसाय वाढवायला सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी आपल्या उत्पादनांची किंमत थोडीफार वाढवली आणि आपल्याबरोबर आणखी काही महिलांना या कामी जोडून घेतले. त्यांच्या या कृतीने महिलांच्या जीवनात रंग भरले, अनेक महिलांना जगण्याचा नवा उद्देश सापडला, नवा दृष्टीकोन मिळाला.

या कंपनीच्या पहिल्या बोर्ड मीटींगमध्ये त्यांनी ‘महिला सक्षमीकरण’ हेच उद्दीष्ट ठरवून टाकले. महिलांचं जीवन फुलवणे व त्यांना स्वयंपूर्ण होता येण्यासाठी हा समूह योगदान देईल असे मोठे लक्ष्य आता या कंपनीने समोर ठेवले व त्यानुरूप काम सुरू केले. त्यासाठी कंपनीला मिळणाऱ्या नफ्यातील काही रकमेची तरतूद सर्वानुमते करण्यात आली. लिज्जत समूहाशी जोडल्या जाणाऱ्या महिलांना ‘कामगार’ वगैरे न संबोधता छानपैकी ‘लिज्जत सिस्टर्स’ अर्थात ‘लिज्जत भगिनी’ असे संबोधून त्या प्रत्येकीला कंपनीच्या मालकीहक्कातील काही प्रमाणात भागधारक बनवण्यात आले. सामुहिक मालकी हक्क तत्वावर कंपनी अधिक जोमाने प्रगती करू लागली. नफा आणि तोटा सर्वांनी मिळून वाटून घ्यायचा हे साधं तत्व..

ना वयाची अट, ना धर्माची, ना जातीची ..
प्रत्येक महिला कंपनीची काही प्रमाणात मालकीण असणार हेच धोरण कायमस्वरूपी राबवले गेले. सध्या प्रचलित असलेल्या ‘स्टारबक्स’ कंपनीनेही हेच धोरण अंगिकारले आहे.. केवळ फरक एवढाच आहे की स्टारबक्समध्ये एमबीए पदवी घेतलेल्या सुशिक्षित हुशार पदाधिकाऱ्यांनी ही कल्पना राबवली आहे तर लिज्जत पापड समूहातील स्त्रिया अल्पशिक्षित व अशिक्षित असूनही त्यांनी हीच कल्पना कैक वर्षांपूर्वीच राबवली होती.. तेव्हा स्टारबक्सचा जन्मही झाला नव्हता. एवढी कुशाग्र बुद्धीमत्ता या महिलांची होती.

लिज्जत समूहाच्या प्रगतीचा दुसरा व महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी सप्लाय चेन तयार केल्या. याकरिता कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या जीवनशैलीशी सुसंगत कामाचे स्वरूप व वेळा आणि किफायती आणि अत्यंत दर्जेदार उत्पादन बनवण्याचा त्यांचा प्रयास यशस्वी झाला.
एका विशिष्ट मध्यवर्ती ठिकाणी पापडाकरीता वापरण्यात येणारे पीठ एकत्रित केले जाई. तिथे त्या पिठापासून पापडाची खिशी (dough) बनवली जाई. लिज्जत भगिनी तेथून ती घेऊन जात आणि त्यापासून ठराविक आकाराचे व संख्येचे पापड बनवत. हे पापड कंपनीत आणून दिले की त्यांना त्याचे पैसे आणि पुढले पापड बनवण्यासाठी पुन्हा आणखी पापडाची खिशी दिली जाई. अशा पद्धतीने काम सुरू झाले आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत दिवसागणिक कंपनी मोठी होऊ लागली.

कंपनीला जो नफा होई, तो गोल्ड कॉईन्सच्या स्वरूपात महिलांमध्ये वाटून दिला जाई. या सर्वात फार महत्त्वाचं होतं ते म्हणजे कंपनीचे ध्येयधोरण कायम ठेवणे व सर्व महिलांना त्यामध्ये व त्यानुरूप प्रोत्साहन देत काम चालू रहाणे आणि कंपनीने हे देखील यशस्वी करून दाखवले.

“सर्वांसाठी प्रगतीची द्वारे खुली” या तत्वामुळे शेकडो महिला या समुहाशी देशभरातून जोडल्या गेल्या व त्यांनी आपली प्रगती व आपल्या मेहनतीने व्यवसायवृद्धीही केली.
एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की केवळ एमबीए सारख्या मोठमोठ्या पदव्या असतील तरच तुमचा व्यवसाय यशस्वी होतो असे नाही, तर व्यवसाय यशस्वी होण्यासाठी एकात्मतेची ताकद ओळखता यायला हवी.

एका उद्योजकात म्हणूनच शिक्षणाबरोबरच, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि दूरदृष्टी व विकास करण्याची क्षमता या साऱ्यांचा उत्तम मिलाप असला पाहिजे.

(संकलन – श्याम धारासूरकर, ग्रंथपाल, उरण महाविद्यालय, उरण
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit the library-blog for more articles )

ब्रेन रॉट’ पिढी.

मिलेनियल्स, जेंझी, अल्फा जनरेशन नंतर ऑक्सफर्ड डिक्शनरीने एक नवीन शब्द आणलाय “ब्रेन रॉट” जनरेशन.
“अधाश्यासारखे इंस्टाग्राम, टिकटॉक, युटूबवरील पंधरावीस सेकंदाच्या रिल्स तासंतास पाहून झोंबीसारखे त्याच्या आहारी जाऊन स्वतःचा मेंदू कुजवून घेणारी पिढी” हा ब्रेन रॉट या शब्दाचा अर्थ होतोय. चार वर्षाच्या लेकरापासून ते सत्तर वर्षांचे म्हातारे, मिलेनियल्स, जेंझी, अल्फा हे आता ब्रेन रॉटचे झोंबी झालेत. ऑक्सफर्ड डिक्शनरीने तर या शब्दाला २०२४ मधील “word of the year ” म्हणून घोषित केला.
कामावरून बसने-कारने घरी जाणारी मिलेनियल्स, गावभर उंडारत फिरणारी झेंजी, नाहीतर काहीच काम नाही म्हणून निवांत बेडवर सोफ्यावर लोळत पडणारी अल्फा, सगळी पिढी आता फक्त ब्रेन रॉट झाली आहे. रिल्स स्क्रोल करून – करून आता कुठंतरी थांबावं, पण नाही. जरा मोबाईलच्या स्क्रीनवरून बोटं बाजूला झाली कि मेंदूतून जोराची सनक येतेय, समोर दिसेल त्याच्यावर चिडचिड होतेय “झोंबी स्क्रोलिंग”. एवढा वेळ डोळ्यांची दिवाळी आणि मेंदूचा भुगा करून काहीच कसं मिळालं नाही याची अजूनच सणक येत असेल तर अभिनंदन तुम्ही तुमची एक नवीनच पिढी तयार केली आहे
आणि हो तुमच्यासारखे असे लाखोजण तुमच्या आजूबाजूला सोशल मीडियाचे रक्तपिपासू झोंबी आहेत “ब्रेन रॉटस”
सुरवातीला या शब्दला विरोध झाला अशी काही पिढी अस्तित्वातच नाही त्यामुळे हा शब्द माघारी घ्या म्हणून लोकांनी आवाज उठवला. पण कोंबड झाकलं म्हणून दिवस उगवायचा थांबत नाही या म्हणीप्रमाणे ऑस्ट्रेलियातील काही संशोधकांनी सुमारे एक लाख लोकांच्यावर मानसिक कसोटीच्या आधारवर प्रयोग आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन ब्रेन रॉट अस्तित्वात आहे हे सिद्ध केले. अगदी दोन आठवड्यापूर्वी त्यांनी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये आपले संशोधन प्रसिद्ध केले आणि मग जगभरतील मीडिया जागी झाली, या पिढीच्या अस्तित्वाला विरोध करणारे नास्तिक अचानक पुन्हा ब्रेन रॉटचे आस्तिक झाले. हे संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणतायत ब्रेन रॉट फक्त एक मानसिक रोग नसून त्याच्याहीपुढ निघून गेला आहे जो आता एक शारीरिक दुष्परिणाम झाला आहे ज्याला डॉक्टर “न्यूरोकॉग्निटिव सिंड्रोम” असं म्हणतात जो मेंदूपेशींचे आतून नुकसान करतोय.
या सगळ्याच्या मागे एकच केमिकल लोचा आहे तो म्हणजे “डोपामिन” तो नाद लावतोय, नवीन काहीतरी बघा, पुढं जावा अजून स्क्रिनवर बोटं फिरवा मग मी तुम्हाला आनंदी ठेवेन, तेच ते बघत राहिलात तर तो आनंद कमी करेन.
डोपामिन आपल्याला म्हणतं: “काहीतरी नवीन बघ… अजून बघ… अजून स्क्रोल कर… मी तुला लगेच आनंद देतो.” पंधरावीस सेकंद करत करत पुढं तासंतास डोकं त्यामध्ये गुरफटून जातेय आणि
शेवटी उरतोय रिकामपणा…. डोकं सुन्न करणारा. !!!!
मग हा मेंदूचा “रिवार्ड सिस्टम” डोपामिन ओव्हरलोड होतोय, आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी मेंदूमधील डोपामिन रिसेप्टर कमी करतो. डोपामिन वारंवार वाढल्यामुळे मेंदूतील काही भाग सतत उत्तेजित राहतोय, सारखी सारखी उत्तेजना पाहिजेय त्याला, मग त्या उत्तेजनेच्या नादात एकाग्रता, निर्णय घेणे (Prefrontal cortex ) रोजच्या सवयी (Striatum) यांचा लय बिघडतोय आणि मग पुन्हा मेंदूच्या सर्किट्सवर ताण येतोय आणि आपले लक्ष एखाद्या कामावरून कमी होतेय. मग हे आशाळलेले मन मेंदूकडे अजून डोपामिनची मागणी करतेय.
विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर मेंदूमध्ये डोपामिन मुख्यतः मिडब्रेनमध्ये तयार होते त्यानंतर त्याला सुरक्षित पॅकेजमध्ये ठेवून सिनॅप्समध्ये सोडली जातात. सिनॅप्स हा एक जंक्शन आहे जिथे एक न्युरॉनने दुसऱ्या न्युरॉनशी संवाद साधतो, जेणेकरून मेंदूचा संदेश दुसऱ्या न्यूरॉन्सपर्यंत पोहोचेल. पुढे अति झालेलं डोपामिन transporters आणि एंझाइम्सद्वारे metabolize केलं जात म्हणजे हे होताना काही प्रमाणात reactive oxygen species (ROS) तयार होतात, जे जर जास्त झाले तर पेशींना oxidative stress होऊ शकतो. या नादात मेंदूच्या पेशींमध्ये ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढतो हा केमिकल स्ट्रेस म्हणजे पेशींमध्ये मोकळी फिरणारी विषारी रसायने, जी त्या पेशींना आतून वाळवीसारखे पोखरतात. हा मेंदूच्या पेशींमधील स्ट्रेस सारखाच वाढत राहिला तर पेशींची न भरून येणारी हानी होतेय या मेंदूपेशींना हा स्ट्रेस डॅमेज करायला सुरवात करतो. अशी स्थिती फक्त अत्यधिक किंवा pathological dopamine activity मध्ये होते, जसे की काही ड्रग्स वापरल्यास किंवा dopamine नियमन बिघडल्यास. हाच बिघडलेला डोपामिन पुढे जाऊन तो पेशींच्या प्रोटीन, DNA आणि ऊर्जा केंद्रांवर हल्ला करतो आणि मग जगण्यासाठी पेशींना जास्तीचा ऑक्सिजन वापरायला भाग पडतो. त्यातून सतत ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढू लागल्यास न्यूरॉन्स नीट काम करत नाहीत किंवा मरतात, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता कमी होते, मानसिक थकवा, चिंता, डिप्रेशन आणि अल्झायमर, पार्किन्सन सारखे न्यूरोडीजेनेरेटिव आजार होऊ शकतात.
खरेतर बाबा आमटे म्हणाले होते “देश उभा करायला आणि बुडती नाव वाचवायला समुद्रात झोकून देणारे कॅप्टन हवे असतात.” हे कॅप्टन अंगमेहनती असले पाहिजेत, तासंतास एकाग्रचित्त होऊन वाचन करणारे अभ्यास करणारे विचारवंतअसले पाहिजेत. रात्रदिवस प्रयोगशाळेत प्रयोग करणारे शास्त्रज्ञच जपान-जर्मनीसारखे बेचिराख झालेले देश राखेतून उभा करू शकतात. पण आमचे जेंझी आणि अल्फा ज्यांच्यावर मिलनियल्सच्या म्हातारपणाच्या अपेक्षा आहेत त्यांची एकाग्रता पंधरा सेकंदावर आली आहे. आता पुढच्या पिढीतून कुठले अब्दुल कलाम आणि सीव्ही रामन…!!!
याच पिढीच्या खांद्यावर पुढचा देश, पुढचं विज्ञान, पुढचं तंत्रज्ञान उभं राहणार आहे. आणि हि पिढी कुठाय?
१५ सेकंदांच्या जगात बंदिस्त……
“अंगमेहनती लोक, सतत शिकणारे, वाचन करणारे, प्रयोग करणारे, विचार करणारे” जपान-जर्मनी राखेतून उभे राहिले ते अशा लोकांच्या कष्टांवर.
या पंधरा सेकंदाच्या व्यसनामुळं शास्त्रज्ञांना असं दिसून येतेय एक पिढीचं सामाजिक जीवनातून एकांतपणा घेतेय. कमी जीवन समाधान, आत्मसन्मान कमी, स्वतःच्या प्रतिमेबद्दल चिंता, नीट झोप न येणे, चिंता आणि एकटेपणा यांसारखे नकारात्मक परिणाम या ब्रेन रॉट पिढीमध्ये वाढतायत. पंधरा सेकंदांच्या जगात बंदिस्त असलेली ही पिढी तरी बदलू शकते; स्वतःला डिजिटल व्यसनापासून दूर ठेवून, एकाग्रता जपून, सतत शिकत राहून आणि विचार करून मेंदूला शांत होण्याची कला शिकवणारीच पिढी पुढील अब्दुल कलाम, सी.व्ही. रामन तयार करू शकते.

नाहीतर तुम्हाला माहित आहे का मेंदूचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे जो आजपर्यंत कोणताच शास्त्रज्ञ सोडवू शकला नाही….
“The brain loves the stimulation but struggles with the comedown”
मेंदूला उत्तेजना खूप आवडते, पण त्यानंतर शांत होणे त्याला कठीण जाते.

पंधरा सेकंदाच्या बंदिस्त जगातील ब्रेन रॉट “झोंबी स्क्रोलिंग” पिढी आता या मेंदूच्या जाळयात अडकत चालली आहे.

(संकलन – श्याम धारासूरकर, ग्रंथपाल, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit the library-blog for more articles )

*टॉमी हिलफिगर: फॅशन जगतातील एक मार्केटिंग मास्टरस्ट्रोक*

टॉमी हिलफिगर… हे नाव तुम्ही नक्की ऐकलं असेल. हे नाव जरी आज जागतिक फॅशनमध्ये प्रतिष्ठित असलं तरी, ते नाव सुप्रसिद्ध कसं झालं यामागे एक जबरदस्त “मार्केटिंग” स्टोरी आहे !

तर मग काय घडलं ज्यामुळे टॉमी हिलफिगर नाव फॅशनच्या विश्वात झपाट्याने प्रसिद्ध झालं? याचं उत्तर आहे एका अफलातून मार्केटिंग स्टंटमध्ये, ज्यामागे होता एक प्रतिभावान माणूस – जॉर्ज लॉइस.
एका जाहिरातीमुळे जॉर्ज लॉइसने टॉमी हिलफिगरचं नशीब रातोरात बदलून टाकलं.

१९८५ चा काळ. टॉमी हिलफिगरला आपलं नाव फॅशन इंडस्ट्रीत मोठं करायचं होतं, पण तो एकदम अज्ञात होता. यासाठी त्याने जॉर्ज लॉइस या मार्केटिंग गुरूकडे मदत मागितली.टॉमीने जॉर्ज लॉईसला सांगितलं की त्याच्या ब्रँडला लोकप्रियता मिळायला हवी….आणि ती देखील कमीत कमी वेळात !

जॉर्ज लॉइसने एका भन्नाट आयडिया शोधून काढली. एवढी “अतरंगी” आयडिया की ती ऐकून ऐकून खुद्द टॉमही घाबरला. जॉर्जने प्रस्ताव दिला की टॉमीच्या नावाची तुलना फॅशनच्या दिग्गजांशी केली जावी:
राल्फ लॉरेन , कॅल्विन क्लेन, पेरी एलिस

हे त्याकाळचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर्स होते. थेट त्यांच्यासोबत तुलना करायची अशी जॉर्ज लॉइसची संकल्पना होती.टॉमी हिलफिगर हे ऐकून चक्रावला.

“मी हे कसं करू शकतो? माझं असं म्हणणं म्हणजे मी स्वत:ची अवास्तव स्तुती करत असल्यासारखं वाटेल. हे लोक दिग्गज आहेत. मी त्यांच्यासमोर काहीच नाही.”

जॉर्जने त्याला शांत बसवलं आणि म्हटलं, “जर तुला फॅशनमध्ये नाव कमवायचं असेल, तर तुला लाखो डॉलर जाहिरातींवर खर्च करायला लागतील आणि तरीसुद्ध तुझे नाव बनायला अनेक वर्षं लागतील.
पण जर तुला उद्या प्रसिद्ध व्हायचं असेल, तर आपल्याला काहीतरी भन्नाट करावं लागेल.”

जॉर्जच्या कल्पनेनुसार एक जाहिरात तयार करण्यात आली.
त्यात तिन्ही जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर्सची नाव मधली काही अक्षरे गाळून लिहिण्यात आली आणि सोबत टॉमीचेही नाव तसेच लिहिण्यात आले. सोबत टॉमी हिलफिगरचा लोगो दिला होता. त्याखाली लिहिले होते …जगातील चार सर्वत्कृष्ट फॅशन डिझायनर्सची नावे तुम्हाला ओळखता येतात का पहा ? आणि त्यापैकी सगळ्यात कमी प्रसिद्ध असलेल्या डिझायनरचा लोगो हा आहे !

न्यूयॉर्कमधल्या फॅशन साठी प्रसिद्ध असलेल्या 7th Avenue वर आणि इतर मोक्याच्या ठिकाणी या जाहिराती झळकल्या. एवढी bold जाहिरात पाहून लोक चकित झाले.
“हा टॉमी हिलफिगर कोण आहे? तो स्वत:ची तुलना राल्फ, पेरी, आणि कॅल्विनसारख्या दिग्गजांशी कसा करू शकतो?”

हिलफिगर अचानक प्रकाशझोतात आला. या जाहिरातीची इतकी चर्चा झाली की एका आठवड्यातच त्याला तेव्हाच्या प्रसिद्ध जॉनी कार्सन टीव्ही शोमध्ये पाहुणा म्हणून बोलावलं गेलं.

सुरुवातीला, टॉमी या सगळ्या प्रसिद्धीमुळे थोडा अस्वस्थ होता. पण आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.
त्यामुळे त्याने मेहनत घेतली, नवनवीन डिझाइन्स साकारली, आणि हळूहळू जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून आपलं स्थान पक्कं केलं.

या यशातून शिकण्यासारखं काय?
धाडसी कल्पना लक्ष वेधून घेतात.
धाडसी कल्पना यशस्वी होतात (जर त्यामागे उत्कृष्ट उत्पादन असेल तर.)
भीतीमुळे अनेकदा चांगल्या कल्पना नाकारल्या जातात.

जॉर्ज लॉइसच्या धाडसी मार्केटिंगमुळेच टॉमी हिलफिगरचा प्रवास एका अज्ञात नावापासून जागतिक फॅशन आयकॉनपर्यंत झाला.

अर्थात इथे हे देखील नमूद करायला हवं की केवळ मार्केटिंग मुळे काही दिवस प्रकाशझोतात राहता येणे शक्य आहे मात्र दीर्घकाळ यश मिळवायचे असेल तर आपल्या उत्पादनात देखील तितकाच दम होता. प्रसिद्ध बॉक्सिंगपटू मोहम्मद अली पण स्वतःला I am the Best म्हणायचा. ते सतत म्हणण्यामुळे आपोआपच त्याची तशीच प्रतिमा तयार झाली. ही प्रतिमा टिकवण्यासाठी मोहम्मद अलीने प्रचंड मेहनत घेतली. नाव टिकवणे हेच त्याचं मोटिव्हेशन बनलं !

रोज सकाळी जागे झाल्यावर आणि रात्री झोपताना स्वतःशी म्हणून तर पहा…I am the Best ! I am the Best…..! स्वतःबद्दलच्या या सकारात्मक भावना दिवसेंदिवस बळकट होत जातात आणि पुढे तोच आपला स्वभाव बनत जातो !!

(संकलन – श्याम धारासूरकर, ग्रंथपाल, उरण महाविद्यालय उरण.)
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles)

*उजेड देणाऱ्या बल्बचा “काळा” इतिहास !*

थॉमस एडिसन ने १८७८ मध्ये light Bulb चं पेटंट घेतलं आणि Lighting या एका नव्या उद्योगक्षेत्राची सुरुवात झाली. लवकरच यामध्ये अनेक तांत्रिक सुधारणा होत गेल्या आणि जगभर मागणी झपाट्यानं वाढली.
मागणी वाढली तशा या मागणीला पुरवठा करणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात आल्या आणि स्पर्धा देखील वाढली. अमेरिकेची GE , जर्मनीची OSRAM , PHILIPS ही डच कंपनी , जपानची Tokyo Electric अशा अनेक कंपन्या या वाढत्या बाजारपेठेचा मोठा घास घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. तेव्हाच Phobeus या कार्टल चा जन्म झाला.

लाइटिंग क्षेत्रात झपाट्याने प्रगती व्हावी, नवे तंत्रज्ञान विकसित व्हावे या उद्देशाने जगातील बहुतांशी मोठ्या कंपन्यांनी एकत्र येऊन काम करायचे ठरवले. १९२४ मध्ये जिनिव्हा येथे त्यांची पहिली परिषद भरली. Convention for the Development and Progress of the International Incandescent Electric Lamp Industry असं भरगच्च नावही त्याला मिळालं. लाईट बल्बचा आकार आणि होल्डर स्टॅंडर्ड (एकसारखा) करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सर्वच निर्णय काही ग्राहकांच्या फायद्यासाठी होते असे नाही.
या सर्व कंपन्यांना लक्षात आले होते की जसजसं तंत्रज्ञान विकसित होईल आणि बल्ब चं आयुष्यमान सुधारेल तसं विक्री कमी होऊ लागेल. आणि म्हणून बल्ब चं आयुष्य वाढविण्यापेक्षा कमी करण्यासाठी संशोधन सुरु झालं. या कार्टल चं नाव होतं Phobeus. लॅटिन भाषेत याचा अर्थ होतो “प्रकाशित” !

सर्व कंपन्यांनी मिळून एक करार केला की प्रत्येकाने आपल्या बल्बचं आयुष्यमान कमी म्हणजे १००० तासांपर्यंतच ठेवायचं. यासाठी जिनिव्हा येथे एक लॅब उभारण्यात आली आणि प्रत्येक उत्पादक कंपनीला आपल्या उत्पादनाचे सॅम्पल्स या लॅब मध्ये पाठविणे बंधनकारक केले. या लॅब मध्ये बल्बचे आयुष्यमान तपासले जायचे जर ते ८०० ते १२०० तासांपर्यंत असेल तर ठीक , पण जास्त असले तर मोठा फाईन आकारला जायचा. बल्ब ची गुणवत्ता कमी कशी करायची, आणि बरोबर १००० तासांच्या आत बल्ब काम करायचा बंद झाला पाहिजे यावर संशोधन करण्यासाठी Phobeus कार्टल ने खूप खर्च केला. किती विरोधाभास आहे बघा. तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी स्थापन झालेल्या संस्थेने प्रत्यक्षात उलट काम केले.

कार्टल सुरु होण्याआधी बल्ब साधारणपणे २५०० तास चालत असे , कार्टल अस्तित्वात आल्यानंतर बल्ब चे आयुष्यमान सुमारे १००० तास झाले. यामुळे साहजिकच विक्री वाढली आणि या कंपन्यांनी प्रचंड नफा मिळवला.

जवळजवळ २० वर्षे लाईट बल्ब मध्ये काहीही सुधारणा होऊ न देता Phobeus कार्टल ने ग्राहकांचं आणि तंत्रज्ञानाचं प्रचंड नुकसान केलं. पुढे १९४० ला या कार्टलच्या करतुदी जनतेसमोर आल्या.

आता Phobeus अस्तित्वात नाही आणि कुणाला हे नाव लक्षात राहण्याचही कारण नाही. पण planned obselence हा कॉन्सेप्ट त्यांनी निर्माण केला आणि तो आजही वापरला जातो आहे. planned obselence म्हणजे प्रॉडक्ट केव्हा वापरातून बाद होईल हे आधीच ठरवून त्यानुसार उत्पादन करणे. मोबाईल कंपन्या, consumer electronics कंपन्या अगदी सॉफ्टवेअर कंपन्या देखील ग्राहकाला ठराविक वर्षांनंतर नवीन उत्पादन घ्यावंच लागेल असं डिझाईन करतात. कारण जर असं केलं नाही तर त्या कंपन्याची विक्री कमी होऊन आपोआपच दिवाळखोर होतील.

आता LED लाईट्स वापरल्या जात आहेत. LED लाईट्सचे साधारण आयुष्यमान पन्नास हजार तास इतके असते. म्हणजे दररोज आठ तास जरी लाईट चालली तरी १७-१८ वर्षे खराब होणार नाही. थोडक्यात LED lights ची विक्री भविष्यात कमी होत जाईल. ज्या कंपन्यांनी LED lights बनविण्याच्या क्षेत्रात भरपूर गुंतवणूक केली असेल त्यांना भविष्यात हे आव्हान मिळणारच आहे. किंवा कदाचित जगाच्या पाठीवर कुठेतरी आणखी एखादे कार्टल यावर उपाय शोधून बसले असेल सांगता येत नाही.. 🙂

(संकलन- श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण)
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles)

साबण आणि हॉटेल

हॉटेल रूम मध्ये चेक इन केल्यानंतर, बॅग्ज ठेवून आपण सहसा पहिल्यांदा वॉशरूम कडे वळतो. बाथरूम काउंटर पाशी ठेवलेला आकर्षक पॅकिंग मधला साबण वापरतो. प्रत्येक हॉटेल अतिशय चोखंदळपणे साबण, शॅम्पू, त्यांचे पॅकिंग, त्यावरील ब्रॅण्डिंग याकडे लक्ष देऊन निवडत असते. पण हे छोटे आकर्षक साबण पुढे जाऊन त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरते. १-२ दिवस वापरून ग्राहक साबण तसाच ठेवतात (काही ग्राहक घरी नेतातही !) आणि त्या उरलेल्या साबणाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हॉटेल्स कडे येऊन पडते. तुम्ही म्हणाल एका छोट्याश्या साबणाला इतकं काय महत्व द्यायचं ? पण मित्रांनो तसं नाहीये !

हा खरंतर जगभरात एक मोठा प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ भारतातच बघा. भारतात साधारण ५०००० हॉटेल्स असतील असं गृहीत धरूया (प्रत्यक्षात जास्तच असतील) , प्रत्येक हॉटेल मध्ये सरासरी १० रूम्स धरल्या तर एकूण ५ लाख रूम्स आहेत. ७०% occupancy rate ने साधारण ३.५ लाख रूम्स दररोज वापरल्या जातात म्हणजेच दररोज ३.५ लाख साबण थोडेसे वापरून फेकून दिले जात आहेत. या साबणांचं काय करायचं ? असा प्रश्न खचितच हॉटेल मधील कुणा गेस्टला पडला असेल ! पण १४ वर्षांपूर्वी अमेरिकेत एका माणसाला हा प्रश्न पडला. नुसत्या प्रश्नावर तो थांबला नाही तर त्याचं उत्तरही त्याने शोधलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्या उत्तराने जगभरातील हजारो लोकांचे प्राण वाचवले ! त्याने साबणाला पुनर्जन्म दिला आणि अनेकांना मृत्यूपासून वाचवलं …

अमेरियकेतील शॉन सिपलर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करत होता. शॉन ला कामानिमित्त जगभर फिरावं लागत असे. इतकं की वर्षातील १५०-२०० दिवस तो हॉटेल्स मध्येच राहत असे. २००८ साली अशाच एका हॉटेल मध्ये शॉन थांबला होता तेव्हा त्याला अर्धवट वापरलेल्या साबणाचं पुढे काय होतं हा प्रश्न पडला. त्याने लागलीच रूम सर्विसला फोन केला आणि “वापरलेल्या साबणांचं तुम्ही काय करता ?” हा प्रश्न विचारला. उत्तर आलं, आम्ही वापरलेले साबण फेकून देतो. शॉन ने थोडी आकडेमोड केली आणि त्याला लक्षात आलं की लाखो साबण दररोज फेकले जात आहेत. यावर आपण काहीतरी करायला हवं. तो विचार त्याच्या डोक्यात घर करून बसला. काही आठवड्यानंतर तो जेव्हा घरी परतला तेव्हा जवळच असलेल्या Holiday Inn हॉटेल मध्ये जाऊन त्याने हाच प्रश्न विचारला. उत्तर ही तेच मिळालं. त्याने मॅनेजरला विचारलं टाकून देण्याऐवजी तुम्ही हे साबण मला द्याल का ? मॅनेजर ने होकार दिला. त्याच दिवशी त्याने सहा आणखी हॉटेल्सना भेट दिली आणि सगळ्या हॉटेल्सने होकारच दिला.

एका महिन्यातच शॉन हजारो असे साबण घेऊन आला आणि मित्रांच्या साहाय्याने आपल्या गॅरेज मध्येच एक छोटेखानी वर्कशॉप सुरु केले. त्याने बटाटे सोलावेत तसे साबणाचा बाहेरचा भाग सोलून काढला. त्यानंतर ग्राइंडर मध्ये टाकून साबणांचा चुरा केला. हा चुरा वितळवून नंतर साबणांच्या मोल्ड मध्ये टाकला. एक रात्री सुकविल्यानंतर दुसर्या दिवशी साबणाच्या वड्या कापल्या. आणि नवीन साबण तयार ! या सगळ्यासाठी त्याने किचन मध्ये वापरली जाणारे टूल्सच वापरले. या त्याच्या गॅरेजमधून लवकरच तो दररोज ५०० साबण तयार करू लागला. साबण तयार तर होऊ लागले पण त्यांचं करायचं काय ?

शॉनच्या वाचनात हे आले होते की जगभरात दररोज सुमारे ९००० बालके अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे मरण पावतात. यापैकी निम्याहून जास्त मृत्यू केवळ नियमित हात धुतल्याने टाळता येऊ शकतात. आपण तयार केलेले साबण अनेक गरीब देशांतील या बालकांपर्यंत पोहोचविण्याचा शॉनचा प्रयत्न होता. यासाठीच त्याने Clean The World नावाची संस्था सुरु केली.
कल्पना उद्दात्त असली तरी प्रत्यक्षात उतरवणे कठीण होते. हजारो हॉटेल्स मधून साबण गोळा करून, प्रोसेस करून , दूरवरच्या अनेक देशांत पोहोचविणे logistics च्या दृष्टीने कठीण होते आणि यासाठी पैसा उभारावा लागणार होता. देणगी देणाऱ्या अनेक संस्थांकडे त्याने प्रयत्न केले पण पैसे उभे करणे जमत नव्हते. इकडे साबणाचा साठा पण वाढत होता. लवकरच काही केले नसते तर शॉनला हा पूर्ण प्रकल्पच बंद करावा लागणार अशी चिन्हे दिसत होती.

तेव्हाच शॉन सिपलर ने एक नवीन बिझनेस मॉडेल वापरायचे ठरवले. (आपल्या कडील उद्योजकांना यातून प्रेरणा मिळावी हा या लेखाचा मूळ उद्देश आहे !) त्याने स्वतःच्या संस्थेला एक प्लॅटफॉर्म बिझनेस बनविले. जसा उबर हा ग्राहक आणि टॅक्सीचालक याना जोडणारा एक प्लॅटफॉर्म आहे तसा clean the world हा हॉटेल्स आणि गरजू बालके याना जोडणारा प्लॅटफॉर्म आहे. यात दोन्ही बाजूना फायदा व्हावा अशी योजना असते. शॉनने clean the world मध्ये सहभागी होणाऱ्या हॉटेल्सना प्रत्येक रूममागे १ डॉलर प्रति महिना अशी नाममात्र फी आकारायला सुरुवात केली. या फी मध्ये हॉटेल्सना तीन फायदे झाले. पहिला म्हणजे साबणाची विल्हेवाट लावण्याच्या जबाबदारीतून मुक्ती , दुसरा म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने Sustainability Goals पूर्ण करण्यासाठी मदत आणि तिसरा म्हणजे हॉटेलचा सोशल इम्पॅक्ट दाखविण्याची सोय !

त्याचसोबत United Nations, Unicef, children International या संस्थांसोबत काम करून साबणाची आवश्यकता जिथे आहे , तिथे ते पाठविण्याची सोय केली. लोकल क्लिनिक्स आणि शाळांसोबत या संस्था काम करतात. लहान मुलांना स्वच्छतेचे महत्व शिकवतात, साबण वाटप आणि वापराची देखरेखही करतात. सध्या Clean the world ८००० हॉटेल्स (१.५ मिलियन रूम्स) सोबत काम करत आहेत, जगभरात ८ पेक्षा जास्त देशांत साबण प्रोसेस करण्याचे कारखाने त्यांनी सुरु केले आहेत. १२७ देशांत सात करोड साबण आतापर्यंत त्यांनी पोहोचवले आहेत आणि हे करत असताना समुद्रात/जमिनीत जाणारा २३ मिलियन पाउंड कचरा कमी केला आहे. सीरिया मधील रेफ्युजी, सोमालिया, बांगलादेश, पाकिस्तान, झाम्बिया, होन्डुरास हे आफ्रिकन देश सगळ्यात मोठे लाभार्थी ठरले आहेत.

अजूनही जगातील ३ बिलियन लोकांकडे साबणासारखी साधी पण जीवनावश्यक सुविधा पोहोचलेली नाही. आणि अजूनही हजारो हॉटेल्स साबण फेकून देत आहेत. clean the world पासून प्रेरणा घेऊन इतर देशांमध्येही असं काम करणाऱ्या संस्था उभ्या राहू लागल्या आहेत. शॉनने एकापेक्षा अधिक प्रॉब्लेम्स आपल्या युनिक आयडीयाने सोडवले आहेतच, तेही कुणाच्या देणगीवर अवलंबून न राहता एक प्रोफीटेबल बिझनेस उभारून ! आजही शॉन सगळ्यांना हेच सांगतो …तुमच्या बेसिनवर पडून असलेला तो साबणाचा तुकडा कुणाचातरी जीव वाचवू शकतो…तो वाया घालवू नका !

(संकलन – श्याम धारासूरकर Librarian, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )