शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

१९८६ साली लिबिया आणि चाड या दोन देशांमध्ये एका सीमावर्ती भूभागावरून युद्ध सुरू झाले.

कागदावर पाहिलं तर निकाल आधीच ठरलेला वाटत होता.

लिबियाकडे सुमारे ७,००० सैनिक, ३०० रणगाडे (टँक्स), ६० लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती.

तर दुसरीकडे चाडकडे रणगाडेच नव्हते.

पण त्यांच्याकडे एक अशी गोष्ट होती जी लिबियाकडे नव्हती…

टोयोटा पिकअप गाड्या.

या गाड्यांच्या मागील बाजूस त्यांनी मशीनगन आणि रॉकेट लॉन्चर बसवले होते.

म्हणजे ही लढाई एसयूव्ही विरुद्ध रणगाडे अशी होती !

निकाल काय लागणार, हे कोणालाही सहज सांगता आलं असतं.

पण प्रत्यक्षात घडलं अगदी उलट.

१९८७ मध्ये फाडा (Fada) येथे झालेल्या लढाईत चाडच्या टोयोटांनी लिबियाच्या रणगाडा ब्रिगेडचा अक्षरशः धुव्वा उडवला.

या लढाईत लिबियाचे तब्बल १०० रणगाडे नष्ट झाले, तर चाडने गमावल्या फक्त ३ टोयोटा गाड्या.

यानंतर चाडच्या सैन्याने ओउआदी डूम (Ouadi Doum) या लिबियन हवाई तळावर हल्ला केला.

या तळाचे संरक्षण ५,००० सैनिक करत होते आणि आजूबाजूला दाट माइनफिल्ड पसरवलेले होते.

पण टोयोटा गाड्या जवळपास १०० किमी प्रतितास वेगाने धावत होत्या. त्या इतक्या हलक्या आणि वेगवान होत्या की अनेक सुरूंग त्यांच्यामुळे सक्रियच झाले नाहीत.

त्यांनी थेट हवाई तळावर धडक मारून तो उद्ध्वस्त केला.

इतक्यावरच ते थांबले नाहीत.

चाडच्या सैन्याने लिबियाच्या सीमेत तब्बल २०० किलोमीटर आत घुसून आणखी एका हवाई तळावर अचानक हल्ला केला.

या कारवाईत त्यांनी ७० रणगाडे आणि ३० विमाने नष्ट केली.

महागडे, जड आणि शक्तिशाली रणगाडे या हलक्या आणि वेगवान टोयोटांचा पाठलाग करू शकत नव्हते.

यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण होतं.

टोयोटा बिघडली तर जवळपास प्रत्येक गावात तिची दुरुस्ती करणारा मेकॅनिक मिळत असे.

ती पुन्हा काही तासांत रस्त्यावर येत असे.

पण रणगाड्याची चेन तुटली किंवा एखादा महत्त्वाचा भाग निकामी झाला, तर तो रणगाडा युद्धात निरुपयोगी ठरत असे.

शेवटी इतिहासाने एक अनपेक्षित निकाल नोंदवला.

टोयोटांनी रणगाड्यांना हरवलं. या युद्धाला पुढे “टोयोटा वार” असंच नाव पडलं !

यातून मिळणारा धडा स्पष्ट आहे.

प्रत्येक वेळी मोठी ताकद, मोठा खर्च किंवा अत्याधुनिक साधनं जिंकतीलच असं नसतं.

अनेकदा वेग, चपळाई आणि परिस्थितीनुसार स्वतःच्या ताकदीचा योग्य वापर हेच विजयाचं खरं गमक ठरतं.

याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी टोयोटा रणगाड्यांवर मात करेल किंवा हलकी साधनं नेहमीच जिंकतील.

पण कोणत्याही स्पर्धेत, व्यवसायात किंवा आयुष्यात पहिला प्रश्न हा असायला हवा—

“आपल्याकडे नेमकं काय आहे, आणि त्याचाच सर्वात मोठा फायदा कसा करून घेता येईल?”

अनेकदा विजय हा सर्वात शक्तिशाली व्यक्तीचा नसतो…

तो स्वतःच्या सामर्थ्याचा सर्वात हुशारीने वापर करणाऱ्याचा असतो.

(संकलन – श्याम धारासूरकर Librarian, उरण महाविद्यालय)

लायब्ररी हेल्पलाईन नंबर- 9892798322

( please visit library-blog for more articles )

एडिसनचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर एक महान संशोधक उभा राहतो

एडिसनचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर एक महान संशोधक उभा राहतो.

ज्याने विद्युत दिवा बनवला. फोनोग्राफ. चित्रपट तंत्रज्ञानातील प्रयोग.

टेलिफोनमधील आवाज अधिक स्पष्ट आणि मोठा करणारी सुधारणा. अशा अनेक मानवोपयोगी शोधांचा जनक म्हणून एडिसन आपल्याला माहित आहे.

पण एडिसनकडे आणखी एक कौशल्य होतं—ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही.

त्याला “प्रसिद्धी” मिळवता येत होती.

लोकांचं लक्ष कुठे वळवायचं, चर्चेचा मुद्दा कसा बदलायचा आणि जनमत आपल्या बाजूने कसं घडवायचं, हे त्याला उत्तम समजत होतं.

एका ठिकाणी त्याने या कौशल्याचा अत्यंत निर्दयीपणे वापर केला. त्याची ही गोष्ट !

१८८० च्या दशकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत वीजव्यवस्था उभी राहत होती.

एडिसनची कंपनी डायरेक्ट करंट—म्हणजे DC प्रणालीच्या माध्यमातून अमेरिकन घरांमध्ये वीज पोहोचवत होती.

पण DC ची एक मोठी अडचण होती.

ती वीज फार लांब अंतरावर कार्यक्षमपणे पाठवता येत नव्हती. त्यामुळे ग्राहकांच्या जवळच ठिकठिकाणी छोटी वीजनिर्मिती केंद्रं उभारावी लागत होती.

शहर वाढलं की नवी केंद्रं उभारा. ग्राहक वाढले की आणखी वायरिंग करा.

ही पद्धत चालत होती; पण तिचा विस्तार महाग आणि अवघड होता.

दुसऱ्या बाजूला एडिसनचा स्पर्धक जॉर्ज वेस्टिंगहाऊस अल्टरनेटिंग करंट—म्हणजे AC प्रणाली पुढे नेत होता.

निकोला टेस्लाच्या ट्रान्सफॉर्मरच्या संशोधनामुळे AC प्रणाली अधिक प्रभावी झाली होती. ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने तिचं व्होल्टेज वाढवून वीज लांब अंतरावर पाठवता येत होती आणि घरात पोहोचण्यापूर्वी ते पुन्हा कमी करता येत होतं.

याचा अर्थ साधा होता.

AC अधिक अंतरापर्यंत पोहोचत होती.

अधिक लोकांना वीज देऊ शकत होती.

आणि तिचं जाळं उभारणं तुलनेने स्वस्त पडत होतं.

एडिसनला हे दिसत नव्हतं असं नाही.

उलट, ते त्याला फार स्पष्टपणे दिसत होतं.

ग्राहकांनी जर फक्त तंत्रज्ञानाची क्षमता, किंमत आणि विस्ताराची सोय पाहिली, तर AC त्याच्या DC व्यवसायाला मागे टाकणार होती.

मग अशा वेळी काय करायचं?

तुम्ही तुलना जिंकू शकत नसाल, तर तुलनेचा निकषच बदला. एडिसनने इथे त्याची सर्वाधिक चतुर (आणि लबाड) खेळी खेळली.

त्याच काळात न्यूयॉर्क राज्य फाशीच्या शिक्षेला पर्याय शोधत होतं. अल्फ्रेड साउथविक नावाच्या एका दंतवैद्याला वाटत होतं की विजेच्या धक्क्याने मृत्युदंड देणं अधिक वेगवान आणि तुलनेने मानवी ठरू शकेल. (असं म्हणतात की काही राजकारण्यांना हाताशी घेऊन एडिसनने स्वतःच ही कल्पना पुढे आणली होती. मात्र तास ठोस पुरावा उपलब्ध नाही.) अल्फ्रेड साउथविक याने एडिसनला यासाठी संपर्क केला. या कामासाठी कोणता विद्युत प्रवाह वापरावा, असा प्रश्न एडिसनला विचारण्यात आला.

एडिसनने यासाठी चक्क AC ची शिफारस केली.

ही तीच प्रणाली होती, जी त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी जॉर्ज वेस्टिंगहाऊस विकत होता.

मात्र एखाद्या तटस्थ वैज्ञानिकाने केलेली निरागस तांत्रिक सूचना नव्हती.

प्राण्यांना विजेचे धक्के देण्यात आले.

पत्रकारांना बोलावण्यात आलं.

प्रात्यक्षिकं आयोजित करण्यात आली. या चाचण्या पूर्ण होताच एडिसन आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी AC किती प्राणघातक आहे, हे लोकांसमोर दाखवायला सुरुवात केली.

कालपर्यंत घरं उजळवणारी वीज अचानक लोकांसमोर मृत्यूचं साधन म्हणून उभी केली जाऊ लागली.

प्रतिमा बदलली की वास्तवाकडे पाहण्याची नजरही बदलते.

एडिसनच्या पाठिंब्याने काम करणाऱ्या हॅरॉल्ड ब्राउनने पहिली इलेक्ट्रिक चेअर तयार करण्यात मदत केली. त्या खुर्चीत जाणीवपूर्वक वेस्टिंगहाऊसशी संबंधित AC उपकरणं वापरण्यात आली.

एडिसनने विजेच्या धक्क्याने मृत्युदंड देण्यासाठी ‘Westinghoused’ हा शब्द वापरात आणण्याचाही प्रयत्न केला.

जणू एखाद्या कंपनीचं नावच त्याला मृत्यूचा समानार्थी शब्द बनवायचा होता.

AC हे केवळ दुसरं तंत्रज्ञान नाही. AC म्हणजे मृत्यू देणारी वीज.

आज एखाद्या ब्रँडला असुरक्षित, देशविरोधी, आरोग्यास अपायकारक किंवा अविश्वसनीय ठरवण्यासाठी ज्या पद्धतीने मोहिमा चालवल्या जातात, त्यांची ही जुनी आवृत्ती होती.

उत्पादनावर हल्ला करण्याऐवजी त्याच्या प्रतिमेवर हल्ला करा.

एकदा लोकांच्या मनात भीती बसली की तांत्रिक माहिती समजावून सांगण्याचं काम फार कठीण होतं.

ऑगस्ट १८९० मध्ये विल्यम केम्लर हा इलेक्ट्रिक चेअरवर मृत्युदंड दिला गेलेला पहिला माणूस ठरला.

ही पद्धत जलद, स्वच्छ आणि मानवी आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होता.

प्रत्यक्षात घडलं उलटंच.

पहिल्या विजेच्या धक्क्याने केम्लरचा मृत्यू झाला नाही.

यंत्र पुन्हा सुरू करावं लागलं.

नंतर अधिक शक्तिशाली विजेचा धक्का देण्यात आला. उपस्थित लोकांसमोर त्याचं शरीर जळू लागलं.

ज्या पद्धतीला आधुनिक आणि मानवी म्हणून सादर करण्यात आलं होतं, ती एक भयावह सार्वजनिक घटना ठरली.

स्वतः वेस्टिंगहाऊसने नंतर म्हटल्याचं सांगितलं जातं—

“कुऱ्हाडीने यापेक्षा चांगलं काम झालं असतं.”

एडिसनच्या मोहिमेने AC बद्दल लोकांच्या मनात शंका आणि भीती निर्माण केली. आणि त्यामुळे जवळपास पुढील एक दशक AC चा वापर मर्यादित राहिला.

पण मार्केटिंग कितीही ताकदवान असलं, तरी ते चांगल्या स्पर्धक उत्पादनाची मूलभूत क्षमता कायमची लपवू शकत नाही.

AC प्रणालीने लांब अंतरावर वीज पाठवणं स्वस्त होत होतं. वेगाने आणि स्वस्तात सर्वदूर वीज पाठविणे शक्य होत होते. शेवटी AC आधुनिक वीजव्यवस्थेचा पाया बनली.

एडिसन करंटचं युद्ध हरला.

पण या युद्धाने मार्केटिंगबद्दल एक अस्वस्थ करणारं सत्य उघड केलं.

*तुमचं उत्पादन गुणवत्तेच्या तुलनेत जिंकत नसेल, तर तुम्ही स्पर्धेचं मैदान बदलू शकता*.

*स्वतःची ताकद सांगण्याऐवजी प्रतिस्पर्ध्याची जोखीम वाढवून दाखवू शकता.*

*आपलं उत्पादन आकर्षक करण्याऐवजी दुसरा पर्याय भयानक वाटेल, अशी प्रतिमा तयार करू शकता.*

*पण —हे काही काळ चालतं.

अनेकदा बराच काळ चालतं.

कारण लोक आकडेवारीपेक्षा कथा पटकन स्वीकारतात.

अभ्यासू तुलनेपेक्षा भीतीला वेगाने प्रतिसाद देतात.

एखाद्या उत्पादनाची तांत्रिक माहिती समजून घेण्यासाठी वेळ लागतो; पण “हे धोकादायक आहे” हे एक वाक्य पुरेसं ठरतं.

*आजही व्यवसायात हेच घडतं.*

एखादी कंपनी स्वतःच्या सॉफ्टवेअरची वैशिष्ट्यं सांगण्याऐवजी प्रतिस्पर्ध्याच्या डेटासुरक्षेबद्दल भीती निर्माण करते.

एखादा राजकीय पक्ष स्वतःच्या कामगिरीऐवजी विरोधक सत्तेत आला तर काय संकट येईल, याची चित्रं रंगवतो.

*एखादा कर्मचारी स्वतःच्या क्षमतेपेक्षा दुसऱ्या सहकाऱ्याच्या चुका ठळक करतो.*

एखादा ब्रँड आपलं उत्पादन चांगलं आहे असं सांगत नाही; तो बाकीची उत्पादनं वापरणं म्हणजे धोका आहे, असं सुचवतो.

रणनीती जुनी आहे.

फक्त माध्यमं बदलली आहेत.

शक्तिशाली संवाद लोकांच्या मनात खोटं सत्य म्हणून उभं करू शकतो.

पण फक्त तोपर्यंतच—

जोपर्यंत वास्तव स्वतःचा “स्विच” चालू करत नाही.

( संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय, उरण )

लायब्ररी हेल्पलाईन- 9892798322

(Please visit library-blog for more articles )

आजच्या काळातील ययाती सिंड्रोम

भागवत पुराणात सांगितलेली ययातीची कथा. नहुष राजाचा पराक्रमी पुत्र, ययाती हा एक महान चक्रवर्ती सम्राट होता. आपल्या पराक्रमाने, सौंदर्याने आणि शासनाने त्याने कीर्ती मिळवली होती. पण एका चुकीमुळे, दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांनी त्याला अकाली वृद्धत्वाचा शाप दिला. ऐन तारुण्यात आलेलं हे वार्धक्य ययातीला सहन झालं नाही. त्याने शुक्राचार्यांची खूप विनवणी केली. तेव्हा त्यांनी शाप पूर्णपणे मागे न घेता एक पर्याय दिला – “जर तुझा कोणी पुत्र स्वेच्छेने त्याचं तारुण्य तुला देऊन तुझं वार्धक्य स्वीकारायला तयार झाला, तर तुला तुझं तारुण्य परत मिळेल.”

ययातीने आपल्या मोठ्या पुत्रांना विचारले, पण कोणीही आपल्या तारुण्याचा त्याग करून वडिलांचे वार्धक्य स्वीकारायला तयार झाले नाही. शेवटी, त्याचा सर्वात धाकटा पुत्र, पुरु, वडिलांच्या सुखासाठी आपले तारुण्य द्यायला तयार झाला.

ययातीला पुन्हा तारुण्य मिळालं. त्यानंतर त्याने अनेक वर्षे, सर्व प्रकारची ऐंद्रियिक सुखे आणि ऐषोआराम भोगले. जगातील सर्व सुखं त्याच्या पायाशी लोळण घेत होती. पण इतका भोग घेऊनही त्याच्या मनाला शांती मिळाली नाही, तृप्ती लाभली नाही. तेव्हा त्याला एक महान सत्य उमगले…

“इच्छांची पूर्तता करून कधीही इच्छा शांत होत नाहीत. जसे अग्नीत तूप टाकल्याने अग्नी विझत नाही, उलट तो अधिकच भडकतो, त्याचप्रमाणे भोगांच्या उपभोगाने वासना अधिकच वाढतात.”

हा साक्षात्कार झाल्यावर ययातीला आपली चूक कळली. त्याने तात्काळ आपला पुत्र पुरुला त्याचे तारुण्य परत केले आणि राज्याचा त्याग करून तो मोक्षाच्या शोधात वनात निघून गेला.

ययातीची कथा ही केवळ एक पौराणिक कथा नाही, तर ती आजच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचे अचूक वर्णन करते. आपण सर्वच कुठेतरी ‘ययाती’ झालो आहोत.

एखाद्या प्रमोशनसाठी आपण दिवसरात्र एक करतो. ते मिळाल्यावर काही काळ आनंद होतो, पण लगेचच पुढच्या प्रमोशनचे, जास्त पगाराचे किंवा मोठ्या केबिनचे वेध लागतात. एका यशस्वी प्रोजेक्टनंतर दुसरा, दुसऱ्या नंतर तिसरा… ही शर्यत कधीच संपत नाही. आपल्या सहकाऱ्याच्या गाडीपेक्षा मोठी गाडी, त्याच्या घरापेक्षा मोठं घर, या तुलनेच्या अग्नीत आपण आपलं मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक सुख ‘तूप’ म्हणून टाकत असतो. आपण आपल्या आरोग्याचे आणि वेळेचे ‘तारुण्य’ देऊन करिअरचे ‘वार्धक्य’ विकत घेत आहोत का?

बाजारात आलेला नवीन मोबाईल फोन आपल्याला हवा असतो. तो मिळाल्यावर काही महिन्यांतच त्याचं नवीन मॉडेल येतं आणि आपलं मन पुन्हा अशांत होतं. सोशल मीडियावर मिळणारे लाइक्स आणि फॉलोअर्स हे देखील असेच आहेत. शंभर लाइक्स मिळाले की हजारांची अपेक्षा, हजार मिळाले की लाखांची. प्रत्येक नोटिफिकेशन हा त्या अग्नीत टाकलेल्या तुपाच्या थेंबासारखा आहे, जो आपली मान्यतेची भूक अधिकच वाढवतो.

किंवा एका नात्यातून दुसऱ्या नात्यात सुखाच्या शोधात फिरणारी व्यक्तीसुद्धा ययातीसारखीच आहे. तिला वाटते की बाह्य परिस्थितीत किंवा व्यक्तीमध्ये बदल केल्याने सुख मिळेल, पण खरा बदल तर आतून घडायचा असतो.

ययातीला हे समजायला बरीच वर्षे लागली, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. राजा ययातीने अनेक वर्षांच्या भोगानंतर जे सत्य जाणले, ते हेच की खरा आनंद बाहेरील वस्तू किंवा परिस्थितीत नाही, तर तो आपल्या आत, आपल्या संयमात आणि समाधानात आहे. सुख हे इच्छापूर्तीमध्ये नाही, तर इच्छांवर नियंत्रण मिळवण्यात आहे. जेव्हा आपण आपल्या इच्छांचे गुलाम न बनता स्वामी बनतो, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने शांती आणि समाधान लाभते.

SBFC कंपनीचे CEO असीम धृ यांच्या एक मुलाखतीत त्यांनी किस्सा सांगितलं होता. दुबई शॉपिंग फेस्टिव्हल चालू होता, ते एका मोठ्या मॉल मध्ये उभे होते. आजूबाजूला लोक प्रचंड शॉपिंग करत होते. एकमेकाला खरेदी केलेल्या वस्तू दाखवत होते. लुई व्हिटोन, प्राडा अशा महागड्या ब्रँडसच्या पिशव्या मिरवत होते. तेव्हा असीम यांच्या मनात विचार आला की त्यांना काहीच विकत घेण्याची ईच्छा नव्हती. ते म्हणाले की ” तुम्हाला जे पाहिजे ते उपलब्ध आहे….तुमची ते मिळविण्याची ऐपत आहे …आणि तरीही तुम्हाला ते नको आहे….हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे !”

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian उरण महाविद्यालय, उरण )

लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322

( please visit library-blog for more articles )

AI: तुमचा नवीन डिजिटल कामगार

Perplexity ने नुकतेच ‘Personal Computer’ लाँच केले आहे. हे नाव ऐकून तुम्हाला वाटेल की हा एखादा नवीन लॅपटॉप आहे का? तर नाही. हा एक असा AI प्रोग्राम आहे जो तुमच्या computer वर २४/७ सक्रिय राहतो आणि तुमच्या फाईल्स, अ‍ॅप्स आणि सेशन्सचा वापर करून तुमची कामे पूर्ण करतो.

आता मुद्दा फक्त AI ला प्रश्न विचारण्याचा उरला नसून, त्याला ठराविक ‘उद्दिष्टे’ देण्याचा आहे. तुम्ही झोपलेले असतानाही हा AI तुमची फाईल शोधणे, डेटा व्यवस्थित करणे किंवा दिलेले काम पूर्ण करणे यांसारख्या क्रिया स्वतःहून पार पाडू शकतो. तुम्ही फक्त सांगा: “ही फाईल शोध, ती ऑर्गनाईज कर आणि मी सकाळी उठण्यापूर्वी हे काम पूर्ण कर.” तुमची फाईल्स, अ‍ॅप्स आणि सेशन्सचा वापर करून हा AI स्वतःहून ती कामे पूर्ण करेल. थोडक्यात, तुम्ही झोपेत असताना तुमचा कॉम्प्युटर तुमच्यासाठी काम करत असेल.

जर हे तंत्रज्ञान असेच प्रगत होत राहिले, तर आज आपण ज्या पद्धतीने संगणक वापरतो, ती पद्धत लवकरच कालबाह्य वाटू लागेल.

मात्र, हे तंत्रज्ञान सध्या त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. संवेदनशील माहिती, महत्त्वाच्या फाईल्स किंवा ईमेलसाठी अशा सिस्टिमवर पूर्णपणे विश्वास ठेवणे सध्या धाडसाचे ठरेल. AI अजूनही सूचनांचा चुकीचा अर्थ लावू शकतो, चुकीची कृती करू शकतो किंवा महत्त्वाचा डेटा चुकून डिलीट करून महागड्या चुका करू शकतो. Perplexity ने स्वतः स्पष्ट केले आहे की, महत्त्वाच्या कृतींसाठी वापरकर्त्याची मंजुरी लागेल आणि यात ‘किल स्विच’ची सुविधाही दिली आहे. यावरूनच हे स्पष्ट होते की, ही केवळ सुरुवात आहे. ही प्रणाली अजूनही पूर्णपणे परिपक्व झालेली नाही आणि वापरकर्त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलणे गरजेचे आहे.

दीर्घकालीन विचार केला तर, या तंत्रज्ञानाचा मूळ उद्देश संशोधन आणि सरावातून या सिस्टिम्स इतक्या विश्वसनीय बनवणे आहे की, त्या आपल्या दैनंदिन डिजिटल श्रमाचा मोठा हिस्सा स्वतःहून सांभाळू शकतील. याचा सकारात्मक परिणाम असा होऊ शकतो की, आपण स्क्रीनला चिकटून राहण्याऐवजी खऱ्या आयुष्यात आणि ऑफलाईन कामांत जास्त वेळ घालवू शकू, कारण आपली डिजिटल कामे पार्श्वभूमीवर आपला ‘पर्सनल AI’ हाताळत असेल.

भविष्यात हे सर्व शक्य होण्यासाठी केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर आपल्या नोकऱ्या, शिक्षण आणि आर्थिक व्यवस्थांनाही या बदलांनुसार अपडेट व्हावे लागेल.

शेवटी, आपण अजून त्या पूर्ण विकसित टप्प्यावर पोहोचलो नसलो तरी, हे एक स्पष्ट संकेत आहेत की कॉम्प्युटर आता केवळ एक साधन राहिले नसून ते ‘कामगार’ बनत आहेत. यापुढे खरे ‘प्रॉडक्ट’ हे एखादे फिजिकल डिव्हाइस नसून, त्या डिव्हाइसद्वारे काम करणारी तुमचीच एक ‘डिजिटल आवृत्ती’ असेल. हे तंत्रज्ञान मानवी जीवनासाठी शाश्वत आणि फायदेशीर ठरेल की नाही, हे भविष्यात आपल्याला या सिस्टिम्स कशा प्रकारे हाताळतो यावर अवलंबून असेल.

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण )

लायब्ररी हेल्पलाईन नंबर- 9892798322

(Please visit the library-blog for more articles )

चांगले बॉस बना !

तुम्ही उद्योजक असाल किंवा मोठे पदाधिकारी, तुम्हाला तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची व सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभली तर तुमच्या उद्योगाची वा कार्यालयाची झपाट्याने प्रगती होईल. परंतु, हे ठाऊक असूनही, बरेचदा आपण कमी पडतो ते कर्मचाऱ्यांची मनं जाणण्यात व त्यामुळेच आपल्या हाताखाली कर्मचारी फारसे टिकत नाहीत.

इंग्रजीत एक म्हण आहे, ‘People Don’t leave jobs, they leave bad bosses’ अर्थात्, एकवेळ कमी पगारावरही कर्मचारी काम करतील पण खडूस बॉसच्या हाताखाली काम करताना त्या कर्मचाऱ्यांची होणारी मानसिक घुसमट सहन करण्याच्या पलीकडे असते आणि अखेरीस कर्मचारी अशा नोकरीला अल्पावधीतच रामराम ठोकतात.

जे आजवर उत्तम बॉस म्हणून लोकप्रिय झाले त्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती होती आणि म्हणूनच ते वेळोवेळी आपल्या कर्मचाऱ्यांना दोन शब्द कौतुकाचे दिल्यावाचून रहात नसत. एका अभ्यासांती असा निष्कर्ष निघाला की, तुम्ही जर बॉस असाल तर हे लक्षात ठेवा, की तुम्ही जितक्या वेळा तुमच्या कर्मचाऱ्यांवर डाफरता त्याच्या तिप्पट वेळा तुम्ही त्यांचं कौतुक करायला हवं तेव्हाच ते तुमच्यासोबत काम करताना खूश रहातील. यामुळे तुमच्या संपूर्ण कर्मचारी वर्गात नेहमीच आनंदाचे वातावरण राहील यात शंका नाही.

कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कौतुकाच्या शब्दाबरोबरच मध्येमध्ये त्यांना बक्षीस व प्रोत्साहनपर भेटवस्तू वा अन्य काहीतरी द्यायलाच हवं. अगदी ढेपाळलेल्या कर्मचाऱ्यासाठीही या सर्व बाबी फार प्रेरणादायक ठरतात व तो कर्मचारी लवकरच झटून कामाला लागतो.

याप्रकारे करा कर्मचाऱ्यांचं कौतुक –

• कर्मचाऱ्यांना रागवायचं ओरडायचं असेल तर ते खाजगीत परंतु कौतुक करताना मात्र आवर्जून चारचौघात करा.

• कौतुक करताना पाल्हाळ लावण्याची गरज नाही. अगदी मोजक्या शब्दात आणि टू द पॉईंट बोलून कर्मचाऱ्यांचं कौतुक करा.

• कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामाबद्दल कधीमधी त्यांचे आभार माना.

• मीटींगमध्ये त्यांच्या कामाची आवर्जून दखल घ्या.

• अध्येमध्ये त्यांच्यासह स्नेहभोजन वा चहापार्टी आयोजित करा.

• त्यांच्या कामासाठी गरजेची अशी वस्तू तुमच्यातर्फे त्यांना भेट म्हणून द्या.

• शब्दांपेक्षा कृती अधिक बोलते हे जाणून कधीतरी त्यांच्या पाठीवर कौतुकाने थाप द्या. थँक यू, ग्रेट जॉब, वेल डन वगैरे म्हणताना हस्तांदोलन करायला आवर्जून पुढे व्हा.

• जबाबदारीचं काम द्या. तुम्ही विश्वास ठेवलात तर त्यांचा स्वतःवरचा विश्वास आपोआप वाढतो.

• चांगले बॉस म्हणजे केवळ गोड बोलणारे बॉस नव्हे. तर जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण तयार करते तीच व्यक्ती चांगली बॉस होऊ शकते.

जगप्रसिद्ध सॉफ्टस्किल्स ट्रेनर डेल कार्नेगी म्हणतात, ‘लोक पैशासाठी काम करताyत हे जरी खरं असलं तरीही त्यांना त्याहीपेक्षा अधिक हवं असतं ते म्हणजे कौतुक, ओळख आणि बक्षीस ..’

(संकलन – श्याम धारासूरकर Librarian, उरण महाविद्यालय उरण )

लायब्ररी हेल्प लाईन नंबर 9892798322

(Please visit the library-blog for more articles )