Run, Operate and Manage by Kapil Patil Educational Institute | UGC Recognised as 2(f) 12(B) | Permanently Affiliated to University of Mumbai | Re-accredited 'B' Grade by NAAC (3rd cycle) | AISHE code 34145
Perplexity ने नुकतेच ‘Personal Computer’ लाँच केले आहे. हे नाव ऐकून तुम्हाला वाटेल की हा एखादा नवीन लॅपटॉप आहे का? तर नाही. हा एक असा AI प्रोग्राम आहे जो तुमच्या computer वर २४/७ सक्रिय राहतो आणि तुमच्या फाईल्स, अॅप्स आणि सेशन्सचा वापर करून तुमची कामे पूर्ण करतो.
आता मुद्दा फक्त AI ला प्रश्न विचारण्याचा उरला नसून, त्याला ठराविक ‘उद्दिष्टे’ देण्याचा आहे. तुम्ही झोपलेले असतानाही हा AI तुमची फाईल शोधणे, डेटा व्यवस्थित करणे किंवा दिलेले काम पूर्ण करणे यांसारख्या क्रिया स्वतःहून पार पाडू शकतो. तुम्ही फक्त सांगा: “ही फाईल शोध, ती ऑर्गनाईज कर आणि मी सकाळी उठण्यापूर्वी हे काम पूर्ण कर.” तुमची फाईल्स, अॅप्स आणि सेशन्सचा वापर करून हा AI स्वतःहून ती कामे पूर्ण करेल. थोडक्यात, तुम्ही झोपेत असताना तुमचा कॉम्प्युटर तुमच्यासाठी काम करत असेल.
जर हे तंत्रज्ञान असेच प्रगत होत राहिले, तर आज आपण ज्या पद्धतीने संगणक वापरतो, ती पद्धत लवकरच कालबाह्य वाटू लागेल.
मात्र, हे तंत्रज्ञान सध्या त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. संवेदनशील माहिती, महत्त्वाच्या फाईल्स किंवा ईमेलसाठी अशा सिस्टिमवर पूर्णपणे विश्वास ठेवणे सध्या धाडसाचे ठरेल. AI अजूनही सूचनांचा चुकीचा अर्थ लावू शकतो, चुकीची कृती करू शकतो किंवा महत्त्वाचा डेटा चुकून डिलीट करून महागड्या चुका करू शकतो. Perplexity ने स्वतः स्पष्ट केले आहे की, महत्त्वाच्या कृतींसाठी वापरकर्त्याची मंजुरी लागेल आणि यात ‘किल स्विच’ची सुविधाही दिली आहे. यावरूनच हे स्पष्ट होते की, ही केवळ सुरुवात आहे. ही प्रणाली अजूनही पूर्णपणे परिपक्व झालेली नाही आणि वापरकर्त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलणे गरजेचे आहे.
दीर्घकालीन विचार केला तर, या तंत्रज्ञानाचा मूळ उद्देश संशोधन आणि सरावातून या सिस्टिम्स इतक्या विश्वसनीय बनवणे आहे की, त्या आपल्या दैनंदिन डिजिटल श्रमाचा मोठा हिस्सा स्वतःहून सांभाळू शकतील. याचा सकारात्मक परिणाम असा होऊ शकतो की, आपण स्क्रीनला चिकटून राहण्याऐवजी खऱ्या आयुष्यात आणि ऑफलाईन कामांत जास्त वेळ घालवू शकू, कारण आपली डिजिटल कामे पार्श्वभूमीवर आपला ‘पर्सनल AI’ हाताळत असेल.
भविष्यात हे सर्व शक्य होण्यासाठी केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर आपल्या नोकऱ्या, शिक्षण आणि आर्थिक व्यवस्थांनाही या बदलांनुसार अपडेट व्हावे लागेल.
शेवटी, आपण अजून त्या पूर्ण विकसित टप्प्यावर पोहोचलो नसलो तरी, हे एक स्पष्ट संकेत आहेत की कॉम्प्युटर आता केवळ एक साधन राहिले नसून ते ‘कामगार’ बनत आहेत. यापुढे खरे ‘प्रॉडक्ट’ हे एखादे फिजिकल डिव्हाइस नसून, त्या डिव्हाइसद्वारे काम करणारी तुमचीच एक ‘डिजिटल आवृत्ती’ असेल. हे तंत्रज्ञान मानवी जीवनासाठी शाश्वत आणि फायदेशीर ठरेल की नाही, हे भविष्यात आपल्याला या सिस्टिम्स कशा प्रकारे हाताळतो यावर अवलंबून असेल.
(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर- 9892798322
(Please visit the library-blog for more articles )
तुम्ही उद्योजक असाल किंवा मोठे पदाधिकारी, तुम्हाला तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची व सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभली तर तुमच्या उद्योगाची वा कार्यालयाची झपाट्याने प्रगती होईल. परंतु, हे ठाऊक असूनही, बरेचदा आपण कमी पडतो ते कर्मचाऱ्यांची मनं जाणण्यात व त्यामुळेच आपल्या हाताखाली कर्मचारी फारसे टिकत नाहीत.
इंग्रजीत एक म्हण आहे, ‘People Don’t leave jobs, they leave bad bosses’ अर्थात्, एकवेळ कमी पगारावरही कर्मचारी काम करतील पण खडूस बॉसच्या हाताखाली काम करताना त्या कर्मचाऱ्यांची होणारी मानसिक घुसमट सहन करण्याच्या पलीकडे असते आणि अखेरीस कर्मचारी अशा नोकरीला अल्पावधीतच रामराम ठोकतात.
जे आजवर उत्तम बॉस म्हणून लोकप्रिय झाले त्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती होती आणि म्हणूनच ते वेळोवेळी आपल्या कर्मचाऱ्यांना दोन शब्द कौतुकाचे दिल्यावाचून रहात नसत. एका अभ्यासांती असा निष्कर्ष निघाला की, तुम्ही जर बॉस असाल तर हे लक्षात ठेवा, की तुम्ही जितक्या वेळा तुमच्या कर्मचाऱ्यांवर डाफरता त्याच्या तिप्पट वेळा तुम्ही त्यांचं कौतुक करायला हवं तेव्हाच ते तुमच्यासोबत काम करताना खूश रहातील. यामुळे तुमच्या संपूर्ण कर्मचारी वर्गात नेहमीच आनंदाचे वातावरण राहील यात शंका नाही.
कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कौतुकाच्या शब्दाबरोबरच मध्येमध्ये त्यांना बक्षीस व प्रोत्साहनपर भेटवस्तू वा अन्य काहीतरी द्यायलाच हवं. अगदी ढेपाळलेल्या कर्मचाऱ्यासाठीही या सर्व बाबी फार प्रेरणादायक ठरतात व तो कर्मचारी लवकरच झटून कामाला लागतो.
याप्रकारे करा कर्मचाऱ्यांचं कौतुक –
• कर्मचाऱ्यांना रागवायचं ओरडायचं असेल तर ते खाजगीत परंतु कौतुक करताना मात्र आवर्जून चारचौघात करा.
• कौतुक करताना पाल्हाळ लावण्याची गरज नाही. अगदी मोजक्या शब्दात आणि टू द पॉईंट बोलून कर्मचाऱ्यांचं कौतुक करा.
• कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामाबद्दल कधीमधी त्यांचे आभार माना.
• मीटींगमध्ये त्यांच्या कामाची आवर्जून दखल घ्या.
• अध्येमध्ये त्यांच्यासह स्नेहभोजन वा चहापार्टी आयोजित करा.
• त्यांच्या कामासाठी गरजेची अशी वस्तू तुमच्यातर्फे त्यांना भेट म्हणून द्या.
• शब्दांपेक्षा कृती अधिक बोलते हे जाणून कधीतरी त्यांच्या पाठीवर कौतुकाने थाप द्या. थँक यू, ग्रेट जॉब, वेल डन वगैरे म्हणताना हस्तांदोलन करायला आवर्जून पुढे व्हा.
• जबाबदारीचं काम द्या. तुम्ही विश्वास ठेवलात तर त्यांचा स्वतःवरचा विश्वास आपोआप वाढतो.
• चांगले बॉस म्हणजे केवळ गोड बोलणारे बॉस नव्हे. तर जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण तयार करते तीच व्यक्ती चांगली बॉस होऊ शकते.
जगप्रसिद्ध सॉफ्टस्किल्स ट्रेनर डेल कार्नेगी म्हणतात, ‘लोक पैशासाठी काम करताyत हे जरी खरं असलं तरीही त्यांना त्याहीपेक्षा अधिक हवं असतं ते म्हणजे कौतुक, ओळख आणि बक्षीस ..’
(संकलन – श्याम धारासूरकर Librarian, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्प लाईन नंबर 9892798322
(Please visit the library-blog for more articles )
एका सेकंदासाठी विचार करा… अशी एखादी जादूची मशीन असेल जी आपल्या वातावरणातील घातक कार्बन डायऑक्साइड (CO2) शोषून घेईल आणि त्याचे रूपांतर थेट उपयुक्त दगडात किंवा खनिजात करेल? ऐकायला कदाचित विज्ञानावर आधारित एखाद्या चित्रपटातली गोष्ट वाटेल, पण हे प्रत्यक्षात घडत आहे आणि तेही आपल्या मुंबईतल्या आयआयटी बॉम्बेमध्ये!
आज जग ग्लोबल वॉर्मिंगमुळे होरपळत आहे. आपल्या पृथ्वीचे तापमान वाढवण्यास सर्वात जास्त कारणीभूत आहे तो म्हणजे कोळसा आणि पेट्रोलच्या ज्वलनातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड. पण याच संकटाला संधीत बदलण्याचे स्वप्न आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी पाहिले आहे.
मुंबई च्या आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक विक्रम विशाल आणि प्राध्यापक अर्णभ दत्ता यांनी ‘उर्जनोवा सी’ (Urjanova C) नावाचे एक स्टार्टअप सुरू केले आहे. त्यांचे तंत्रज्ञान कारखान्यांच्या धुराड्यातून निघणारा विषारी CO2 पकडते आणि त्याचे रूपांतर कॅल्शियम कार्बोनेटसारख्या मौल्यवान खनिजात करते. ही खनिजे पुढे सिमेंट किंवा इतर बांधकामात वापरली जाऊ शकतात. म्हणजे एका उद्योगाचा कचरा हा दुसऱ्या उद्योगासाठी कच्चा माल बनतोय!
पण तुम्हाला माहित आहे का, या कामासाठी जगप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्या फाऊंडेशनने या भारतीय टीमला चक्क १.८५ कोटी रुपयांचे (२,५०,००० डॉलर्स) बक्षीस दिले आहे?
आयआयटी बॉम्बेच्या या ‘SASIITB’ नावाच्या टीमने जगभरातील शेकडो स्पर्धकांना मागे टाकत एक्स-प्राईज (XPrize) स्पर्धेत हे घवघवीत यश मिळवले आहे. भारताने २०७० पर्यंत ‘नेट झिरो’ (म्हणजेच पर्यावरणात जेवढा कार्बन टाकला जातो तेवढाच तो शोषून घेणे) होण्याचे जे ध्येय ठेवले आहे, त्या दिशेने हे एक खूप मोठे पाऊल आहे.
आता प्रश्न पडतो की, पकडलेला हा सर्व कार्बन फक्त दगडातच बदलता येतो का?
तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. आयआयटी बॉम्बेने केवळ दगडच नाही, तर या कार्बनपासून ‘कार्बन मोनोऑक्साइड’ (CO) तयार करण्याचे तंत्रज्ञानही विकसित केले आहे. स्टील उद्योगासाठी कार्बन मोनोऑक्साइड हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सध्या कोळसा जाळून तो मिळवला जातो, ज्यामुळे प्रदूषण वाढते. पण या नवीन तंत्रज्ञानामुळे जुनाच कार्बन पुन्हा वापरला जाईल आणि पर्यावरणाचे रक्षणही होईल.
इतकंच नाही, तर एनटीपीसी (NTPC) सोबत मिळून आयआयटी बॉम्बेने जमिनीच्या शेकडो फूट खाली हा कार्बन सुरक्षितपणे साठवण्यासाठी भारताची पहिली प्रायोगिक विहीरही खोदली आहे. ही विहीर म्हणजे भविष्यातील कार्बन साठवण्याची एक मोठी तिजोरीच ठरणार आहे.
जेव्हा आपली तरुण पिढी अशा प्रकारे विज्ञानाचा वापर करून जगापुढील संकटांवर उपाय शोधते, तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. हे तंत्रज्ञान केवळ पर्यावरणाचे रक्षण करणार नाही, तर भविष्यात लाखो लोकांसाठी व्यवसायाच्या नवीन संधीही निर्माण करेल.
(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण )
इतिहासात घोड्यांनी एक मोठा बदल पाहिलाय. तंत्रज्ञानामुळे “जॉब” गमावलेला घोडा हा प्रथम प्राणी असेल. आधी गाड्या आल्या, मग इंजिन्स आली आणि घोड्यांचं काम कमी झालं. पण आता आपण पुन्हा त्याच घोड्यांना एका नवीन रूपात परत आणतोय. हे ऐकायला थोडं मजेशीर वाटतंय ना? 😄
DEEP Robotics ने नुकताच त्यांचा M20 Pro नावाचा रोबोट लाँच केला आहे. दिसायला हा एखाद्या घोड्यासारखा वाटतो, पण त्यामागे जबरदस्त तंत्रज्ञान आहे.
M20 Pro मध्ये काय खास आहे?
स्मार्ट सेन्सर्स: यामध्ये 3D LiDAR आणि Depth Cameras आहेत, ज्यामुळे हा रोबोट आपल्या आजूबाजूचा रस्ता स्वतः शोधू शकतो आणि अडथळे सहज पार करतो.
मजबूत बांधणी: याला IP66 रेटिंग मिळाले आहे, म्हणजेच हा पाऊस, धूळ आणि चिखलातही आरामात काम करू शकतो.
शक्तिशाली मोटर्स: याच्या पायांमध्ये प्रगत मोटर्स आहेत, ज्यामुळे तो पायऱ्या चढू शकतो आणि खडबडीत जमिनीवर घोड्यासारखा धावू शकतो.
काम करण्याची क्षमता: हा रोबोट साधारण २० ते ४० किलो वजन वाहून नेऊ शकतो आणि एकदा चार्ज केल्यावर २ ते ४ तास सतत चालू शकतो.
याचा उपयोग काय?
केवळ मनोरंजनासाठीच नाही, तर औद्योगिक तपासणी (Industrial Inspection) आणि कठीण ठिकाणी माल पोहोचवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. घोड्यासारख्या उंच पायांमुळे हा उंच गवत किंवा दगडधोंड्यांच्या रस्त्यावर इतर छोट्या रोबोट्सपेक्षा जास्त वेगाने चालू शकतो. 🎡
काय सांगावं, कदाचित भविष्यात आपण पुन्हा घोड्यावर बसून फिरू! फरक इतकाच की हे घोडे इलेक्ट्रिक असतील. ⚡🐎
कसं असतं बघा—आधी गाड्यांनी घोड्यांची जागा घेतली आणि आता हे इलेक्ट्रिक घोडे गाड्यांची जागा घेतील असं दिसतंय. चक्र पूर्ण झालं म्हणायचं!
रॉबर्ट कियोसाकी यांचे रिच डॅड, पुअर डॅड हे एक अत्यंत गाजलेले पुस्तक. यामध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी स्वतःच्याच गोष्टी द्वारे पैसे कमावणे, वाढविणे, सांभाळणे आणि आर्थिकदृष्टया स्वतंत्र होण्याचे नियम सांगितले आहेत.
भरपूर शिकून नोकरी करणारे आणि तरीही पैशांची चणचण जाणवणारे रॉबर्ट चे वडील, आणि कमी शिकलेले मात्र योग्य गुंतवणूक करून श्रीमंत झालेले रॉबर्टच्या मित्राचे वडील ! या दोघांकडून रॉबर्ट काय शिकला ते या पुस्तकात सांगितले आहे.
प्रकाशित झाल्यानंतर आज कित्येक वर्षे झाली, तरी आजही हे पुस्तक विक्रीचे नवे नवे उच्चांक गाठत आहे. कित्येक लोकांचे आयुष्य या पुस्तकाने बदलून टाकले आहे.
ज्यांना शक्य असेल त्यांनी पूर्ण पुस्तक अवश्य वाचा.
आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी खाली दिलेले आठ नियम (या पुस्तकातील अत्यंत महत्वाचे 8 मुद्दे) नीट समजावून घ्या.
जर हे नियम वापरले तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही.
*1. तुमच्या विचारांची दिशा बदला* –
‘एखादी वस्तू विकत घेण्याची माझी ऐपत नाही’ असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःच्या प्रगतीत अडथळा निर्माण करता, त्याऐवजी, जेव्हा तुम्ही म्हणता, ‘ अमुक एक वस्तू विकत घेण्यासाठी अधिक पैसे मी कसे बरं कमावू शकतो ?’ तेव्हा तुमच्या मेंदूला चालना मिळते आणि तुमचा मेंदू तुमचे उत्पन्न कसे वाढेल, त्यासाठी तुम्ही काय काय करू शकता या दिशेनी विचार करू लागतो. म्हणूनच, या क्षणापासून, तुमच्या मेंदूत येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक विचाराला सकारात्मक विचारामध्ये परावर्तीत करा. एखादी गोष्ट मी करू शकणार नाही हा विचार कधीच करू नका, तर त्याऐवजी, अमुक एखादी गोष्ट मी कशी बरं करू शकेन याचा विचार करायला लागा. सरावाने तुम्ही स्वतःसाठी स्वतःच एक पोषक दृष्टीकोन विकसीत कराल हे लक्षात घ्या.
Rich dad poor dad या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कीयोसाकींनीही जीवघेण्या स्पर्धेपासून लांब कसं रहायचं हे लहानपणीच जाणलं होतं. मित्राच्या वडीलांसाठी विनामूल्य काम करताना ते त्यांच्या भीतीपासून मुक्त होणं शिकले होते तसंच मित्रासाठी आणि स्वतःसाठी अधिक पैसे कमावण्याची आकांक्षाही तेव्हाच त्यांच्या मनात रूजली होती.
*2. आर्थिक साक्षर व्हा* –
कीयोसाकी म्हणतात, ‘बुद्धिमत्ता अडचणी सोडवते आणि धनाचे उत्पादन करते. आर्थिक बुद्धिमत्तेशिवाय मिळणारे धन हे अल्पावधीतच नष्ट होते.’
आपली शिक्षणव्यवस्था आपल्याला पैशांसाठी काम करायला शिकवते, पण पैसे कसे मिळवायचे, धनसंचय कसा करायचा आणि धनाचे व्यवस्थापन कसे करायचे हे आपल्याला शिकवले जात नाही. प्रत्यक्षात आपल्याला हे सगळं शिकवायला हवं.
आर्थिक सक्षमता आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याप्रत नेते. याचसाठी महागाईकडे (inflation) लक्ष ठेवा आणि आपली आर्थिक उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य गुंतवणूक करा किंवा मालमत्ता जमा करा. Assets विकत घ्या आणि liabilities कमी करा.
*3. स्वतःच्या कामावर किंबहुना स्वतःच्या कामाकडेच लक्ष केंद्रीत करा* –
तुमच्या अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रीत करा ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे आणि त्यासाठी त्यादृष्टीनेच काम करत रहा असं रॉबर्ट कीयोसाकी म्हणतो. म्हणूनच, सधन होण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधत रहा. व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या संधी शोधत रहा. अधिकाधिक मालमत्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील रहा.. आणि जो पैसा कमावाल तो अशारितीने गुंतवा की त्यातून तुम्हाला अधिक परतावा मिळत राहील. एकंदरीत काय, तर तुमचा पैसा तुमच्यासाठी वेळेला कामी आला पाहिजे. पैशासाठी तुम्ही नाही, तर तुमच्यासाठी पैसा आहे हे लक्षात ठेवा.
*4. जोखीम पत्करा आणि आलेल्या अनुभवांतून स्मार्ट व्हा* –
श्रीमंत लोक जोखीम पत्करतात कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक अशा संधी सापडतात ज्यामुळे त्यांना कोट्यधीश होता येऊ शकेल ! रॉबर्ट कीयोसाकींनी सुमारे 18000 डॉलर्सची पहिली छोटीशी गुंतवणूक केली होती जी त्यांना दरमहा 25 डॉलर्सचा देत होती. ही रक्कम जरी फार मोठी नव्हती तरीही त्यामुळेच ते स्मार्ट तर झालेच आणि भविष्यात प्रत्येक गुंतवणुकीपाठोपाठ त्यांच्यातील स्मार्टनेस वाढला. म्हणूनच गुंतवणूक करताना विचारपूर्वक जोखीम पत्करा आणि प्रत्येक अनुभवांती अधिकाधिक सधन आणि स्मार्ट व्हा.
*5. कॉर्पोरेट करभरणीची पद्धत समजून घ्या* –
लेखक सांगतात, कॉर्पोरेट कंपनी आधी कमावते, खर्च करते आणि मग उरलेल्या उत्पन्नावर कर भरते, परंतु सामान्य व्यक्तींना मात्र आधी त्याच्या उत्पन्नातील काही भाग कर म्हणून भरावी लागते आणि मग उरलेली रक्कम खर्च करता येते. ही व्यवस्था एकप्रकारचे शोषण करणारीच आहे मात्र हे थांबवता येऊ शकेल. हे थांबवण्यासाठी, अकांउंटींग, गुंतवणूक, शेअर बाजार आणि कायदा या चार बाबींचे सखोल ज्ञान हवे. यामुळे तुम्ही करपरताव्याचे योग्य नियोजन करू शकाल आणि कर वाचवू शकाल ज्यामुळे अंतिमतः तुम्ही तुमच्या संपत्तीची गुंतवणूक करून अधिक सधन होऊ शकाल.
*6. पैसा शोधा*
कीयोसाकी म्हणतो, एक शिक्षित मन हेच श्रीमंत मन असते. कारण, जेव्हा तुम्ही स्वतःला आर्थिक बाबतीत धिटाईने पुढे न्याल तेव्हाच तुमची प्रगती होईल. श्रीमंत माणसं अडचणीतूनही स्वतःचं नशीब घडवतात आणि हेच पैशालाही लागू होतं. पैसा निर्माण करावा लागतो.
आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करताना लेखक म्हणतो, बुद्धीमान लोकांच्या ज्ञानाला भांडवल समजा व त्यांना आपल्यासह कामात सहभागी करून घ्या. तुमची ज्ञानवृद्धी झाल्याने तुमची ताकद वाढते हे लक्षात घ्या.
म्हणूनच, गुंतवणुकीच्या निरनिराळ्या पर्यायांची ओळख व माहिती करून घ्या. तुमच्यासाठी स्वतंत्रपणे अभ्यास करून गुंतवणूकीचे योग्य पर्याय देणाऱ्या सेवांचा लाभ घ्या. ज्यामुळे तुम्ही आत्मनिर्भर व्हाल आणि स्वतंत्रपणे आर्थिक व्यवहार करू शकाल.
*7. जीवन फुलवण्यासाठी काम करा, पैशासाठी नाही !*
लेखक म्हणतो, ‘लोकं श्रीमंत होण्यासाठी केवळ एकाच तांत्रिक कौशल्यावर अवलंबून असतात’.मात्र खरी जीवनकौशल्य म्हणजे परस्पर संवाद, व्यवस्थेचे वा माणसांचे व्यवस्थापन. या सर्व बाबीही पैसे कमावण्याइतक्याच किंबहुना पैसे कमावण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत आणि दुर्दैवाने त्याही शाळेत शिकवल्या जात नाहीत. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गावर या सर्व जीवनकौशल्यांनाही तुम्ही आत्मसात केले पाहिजे. परिणामकारक संवाद आणि मनुष्यबळाचे व्यवस्थापन यामुळे तुमच्या गुंतवणूक सल्लागाराकडून योग्य आणि अर्थपूर्ण माहिती मिळवणे सहज शक्य होते हे लक्षात घ्या.
*8. भावनांवर नियंत्रण ठेवा* –
रॉबर्ट कीयोसाकी म्हणतो, मनुष्यप्राण्यामध्ये पाच लक्षणं सर्वसाधारणतः नेहमी आढळतात, भीती, दुसऱ्याचा उपहास करणे, आळशीपणा, वाईट सवयी आणि उद्धटपणा. मात्र, हे सर्व एखादी व्यक्ती कशा पद्धतीने वापरते त्याने खरा फरक पडतो.
आभाळ कोसळल्यागत निराश होऊ नका आणि त्याउलट अतिउत्साहाने वा अतिआशादायी होऊन खूप स्वप्नाळूही होऊ नका. त्याऐवजी, तुमचा भावनिक तोल नेमका राखण्यासाठी प्रयत्न करा आणि आर्थिक उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रीत करा. लक्षात घ्या, एखाद्या चंचल, अप्पलपोट्या आणि वेड्यासारखे विचार करणाऱ्या मनापेक्षा सुयोग्य प्रशिक्षित मन हे केव्हाही उत्तमच !
(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian,उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
( please visit the library-blog for more articles)