Run, Operate and Manage by Kapil Patil Educational Institute | UGC Recognised as 2(f) 12(B) | Permanently Affiliated to University of Mumbai | Re-accredited 'B' Grade by NAAC (3rd cycle) | AISHE code 34145
1923 मध्ये जपानमधील ग्रेट कांतो भूकंपामुळे 100,000 पेक्षा जास्त लोक मरण पावले. लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले किंवा बदलले. त्यापैकीच एक तरुण होता तादाओ. भूकंपामुळे तादाओला टोकियोला जावे लागले. तिथे पोहोचल्यावर त्याला त्याच्या काकांसोबत लेथ ऑपरेटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तादाओ लेथ वर काम करण्यात निपुण झाला आणि लवकरच त्याने मशीन्सचे सुटे भाग बनवण्यासाठी कंत्राटदार म्हणून व्यवसाय सुरू केला. हे काम खूप कष्टाचे होते. त्याचा धाकटा भाऊ, तोशिओ देखी त्याच्या व्यवसायात सहभागी झाला.
पण तोशिओ लेथमन नव्हता. तो एक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींमध्ये रस असणारा माणूस होता. तो स्वतःला एक संशोधक मानत असे आणि एडीसनला आपला आदर्श मानत होता. तोशिओला सरकारी नोकरी होती. पण तिथे फारसे चांगले काम नव्हते. तोशिओला माहित होते की तो त्यापेक्षा मोठ्या गोष्टींसाठी बनला आहे, म्हणून त्याने आपली नोकरी सोडली आणि काहीतरी शोधण्याच्या उद्देशाने आपल्या मेहनती भावाकडे सामील झाला. त्याने अनेक कल्पना वापरून पाहिल्या, काही चालल्या काही कधीच चालल्या नाही. पण त्याची पहिली व्यावसायिकरित्या यशस्वी कल्पना, जी त्याच्या स्वतःच्या नावावर विकली गेली, ती होती अंगठीसारखे एक सिगारेट होल्डर. हे खूप लोकप्रिय झाले कारण युद्धोत्तर जपानमध्ये सिगारेट्स दुर्मिळ होत्या आणि लोक सिगारेट पूर्णपणे संपेपर्यंत ओढत असत. हे उपकरण खूप लोकप्रिय झाले. युपिबा (Yupiba) असे त्याला म्हटले जायचे, त्याने कंपनीला इतका नफा मिळवून दिला की ते काहीतरी अधिक महत्त्वाकांक्षी करण्याचा प्रयत्न करू शकले.
नवीन कल्पना शोधत असताना, दोन्ही भाऊ टोकियोमधील एका व्यवसाय प्रदर्शनात गेले, जिथे त्यांनी अनेक उत्तम अविष्कार प्रथमच पाहिले. युद्धोत्तर संपूर्ण जपानमध्ये नव्या कंपन्या, व्यवसाय उदयास येत होते. त्यामुळे बाजारातही अनेक नवनवीन वस्तू दिसत होत्या.
तोशिओला इथे एक संधी दिसली. ते जवळपास प्रत्येक व्यावसायिकाला गरजेचे ठरेल असे उपकरण होते. पण प्रदर्शनात ठेवलेले ते उपकरण अगदी प्राथमिक स्वरूपाचे आणि यांत्रिकी असल्यामुळे अवजड होते.
तोशिओने यालाच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बनविण्याचा प्रयत्न केला. त्या नव्या यंत्रावर तो आपल्या भावासोबत रात्रंदिवस काम करत राहिला. अनेक फसलेल्या प्रयत्नानंतर त्याने शेवटी एक काम करू शकेल असा नमुना (Prototype) बनवला. उत्साहाने, त्या भावांनी आपले उपकरण काही मोठ्या व्यापार कंपन्यांकडे नेले. त्यांना ते उपकरण आवडले देखील. मात्र ते खर्चिक आणि बेभरवशाचे असल्याने कोणतेही विकत घेतले नाही.
तोशिओ आणि तादाओ निराश होऊन पुन्हा आपल्या मूळ पैसे कमावून देणाऱ्या उद्योगाकडे परत जाऊ शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी त्यांचे उपकरण अधिक चांगले करण्यासाठी आणि त्यातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी त्यांचे इतर दोन भाऊ देखील सामील झाले. शेवटी, अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर त्यांना त्यांचे उपकरण मिळाले.
त्याचे वजन 140 किलो होते. ते 70 सेंटीमीटर उंच आणि पूर्ण एक मीटर रुंद होते, ज्याची किंमत 500,000 येन किंवा 1950 च्या दशकाच्या शेवटी 3,000 डॉलरपेक्षा जास्त होती. आता हे अवजड वाटत असले तरी तेव्हा हे बऱ्यापैकी स्वीकाहार्य होते.
दोन्ही भाऊ खूप उत्साही होते, त्यांचे यंत्र एका व्यापार प्रदर्शनात घेऊन जाण्यासाठी तयार होते, पण त्यांना विमानात चढण्याची परवानगी मिळाली नाही. कारण त्यांचे यंत्र विमानाच्या परवानगी असलेल्या आकारापेक्षा मोठे होते. खूप वाद घातल्यानंतर, त्यांना त्यांचे यंत्र काळजीपूर्वक वेगळे करावे लागले. विमानातून उतरल्यानंतर जेव्हा त्यांनी ते सुटे भाग पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते यंत्र चाललेच नाही. विमान कंपनीच्या धोरणामुळे त्यांचे सर्व प्रयत्न आणि तेवढी वर्षे वाया गेली.
निराश झालेले, पण हार मानण्यास तयार नव्हते. त्यांनी चित्रांचा वापर करून प्रदर्शनामध्ये शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण चालू यंत्र न पाहिल्याने त्याची उपयुक्तता लोकांना कळलीच नाही.
चौघेही पराभूत होऊन टोकियोला परत आले.
पण उचिडा योको (Uchida Yoko), जी जपानमधील सर्वात मोठी ऑफिस उपकरणांची पुरवठादार कंपनी होती तिच्या काही लोकांना या यंत्राची उपयुक्तता कळली होती. त्या कंपनीने शहानिशा करण्यासाठी आपल्या प्रतिनिधीला पाठविले. तो इतका प्रभावित झाला की त्याने उचिडा योको आणि त्या भावांसोबत एक विशेष वितरक म्हणून करार केला.
आणि तिथून पुढे इतिहास घडला. ते 140 किलोचे उपकरण जगभरातील शेकडो कार्यालयांमध्ये पोहोचले आणि त्याचे पुढील मॉडेल जगभरातील लाखो कार्यालयांमध्ये पोहोचले. तोशिओ, तादाओ आणि त्यांच्या भावांसाठी आता मागे वळून पाहण्याची गरज नव्हती, कारण त्यांची कंपनी एका शोधाकडून दुसऱ्या शोधाकडे, एका नवनिर्मितीकडून दुसऱ्या नवनिर्मितीकडे वाटचाल करत होती.
त्यांनी अनेक नवीन उपकरणे बनविली. ज्यात ऑफिस उत्पादकता, वेळ व्यवस्थापन आणि संगीतही समाविष्ट होते. खरं तर, त्यांच्या कंपनीचे नाव ते बनवत असलेल्यापैकी अनेक वस्तूंशी समानार्थी आहे. आज, अर्थातच, ते त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी सर्वात जास्त ओळखले जातात. आणि त्यांचे नाव घराघरात पोहोचले आहे. ही कंपनी एलसीडी स्क्रीन असलेला डिजिटल कॅमेरा किंवा 3.2 एमपी कॅमेरा असलेला पहिला मोबाईल फोन किंवा काचेवर मजकूर दाखविणारे मनगटी घड्याळ (wristwatch) बाजारात आणणारी पहिली कंपनी होती. 1993 मध्ये डिजिटल होकायंत्र (digital compass) असलेले मनगटी घड्याळ, 1992 मध्ये खिशात ठेवता येण्यासारखा एलसीडी टीव्ही, सिंथेसाइज्ड आवाज असलेली गिटार आणि त्यापूर्वी काही दशकांपूर्वी, जगातील पहिले वैयक्तिक कॅल्क्युलेटर, आणि त्याच्याही 15 वर्षांपूर्वी, ते 140 किलोचे ऑफिस कॅल्क्युलेटर, 14 A , ज्याने कार्यालयीन कामात क्रांती घडवली.
कोणाला खरे वाटणार नाही की इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारा हा मोठा समूह सिगारेट ठेवण्यासाठीच्या अंगठीसारख्या उत्पादनातून निर्माण झाला असेल. अर्थात, हे फक्त नशिबावर अवलंबून नाही. यात त्यांचे कठोर परिश्रम, चिकाटी आणि शुद्ध संशोधक वृत्ती देखील आहे. हे कठोर परिश्रम, चिकाटी आणि शुद्ध संशोधक वृत्ती होती तोशिओ, तादाओ, काझुओ आणि युकियो यांची, ज्या भावांचे आडनाव शेवटी मनगटी घड्याळे आणि संगीत कीबोर्डसाठी एक प्रतिशब्द बनले. ते आडनाव होते काशीओ (Kashio) किंवा जसे जगाला माहित आहे तसे कॅसिओ (Casio).
तर मित्रहो,
“कोशिश करनेवालो की हार नही होती “👍
दररोज सकाळी अलार्म वाजतो, आपण डोळे चोळत उठतो आणि धावपळ सुरू होते — नोकरी, फोन, ई-मेल, मीटिंग्स, ट्रॅफिक, सोशल मीडिया… आणि रात्री थकून कोसळताना आपल्यालाच प्रश्न पडतो.
“आज दिवसभर धावलो, पण खरंच जगणं झालं का?”
याच ठिकाणी सुरू होते “स्लो लिव्हिंग” ही सुंदर संकल्पना —
थोडं थांबणं, शांत श्वास घेणं आणि आता या क्षणात जगणं.
स्लो लिव्हिंग म्हणजे काय नाही?
हे “आळशीपणा” नाही, “काम टाळणं” नाही आणि “सगळं सोडून डोंगरात जाऊन बसणं” तर मुळीच नाही.
स्लो लिव्हिंग म्हणजे — आयुष्य थांबवणं नाही, तर त्याचा वेग स्वतः ठरवणं.
उदाहरणार्थ –
सकाळी ऑफिसला जायचं आहे, म्हणून घाईत गाडी दामटतो. कारण उठायला उशीर झाला, रात्री मोबाईलवर स्क्रोल करत बसलो.
पण जर थोडं लवकर झोपलो आणि सकाळी शांततेने उठलो, तर गाडीही हळू चालवता येते, मनही प्रसन्न राहतं. एवढं साधं आहे हे!
आपल्याला सगळं हवं असतं — नवी गाडी, नवा फोन, नवे कपडे…
पण एकदा मनाला विचारलं की, “खरंच ही गरज आहे का?”
उत्तर बहुतेक वेळा “नाही” असतं.
जसं ऑनलाइन शॉपिंग करताना अनेक वस्तू कार्टमध्ये टाकतो, आणि शेवटी विचार करतो — “खरंच हे आवश्यक आहे का?”
तो विचार आला की विषय संपतो.
गरजा मर्यादित केल्या की मन मोकळं होतं, आणि तेव्हाच शांत श्वास घेता येतो.
स्लो लिव्हिंगचा मजेशीर भाग
कधी कधी हे खूप साधं असतं —
* सकाळी चहाच्या कपातून येणाऱ्या वाफेकडे बघत पावसाचा सुगंध अनुभवणं.
* मुलांनी विचारलेल्या निरागस प्रश्नाचं उत्तर प्रेमाने देणं.
* मित्राला भेटताना मोबाईल बाजूला ठेवून मनमोकळ्या गप्पा मारणं.
या छोट्या क्षणांमध्येच आयुष्याचा खरा गोडवा आहे —
आणि त्यासाठी एकही रुपया खर्च नाही.
स्लो लिव्हिंग म्हणजे फक्त मंद गती नाही, तर उद्देशपूर्ण गती आहे.
आपल्याला का जगायचं आहे, काय महत्वाचं आहे — हे उमजलं की धावपळसुद्धा शांत वाटते.
जर तुमचा उद्देश आरोग्य राखणं असेल —
तर तुम्ही जेवण, झोप, व्यायाम यांना वेळ द्याल.
जर उद्देश मन:शांती असेल —
तर तुम्ही कामापेक्षा स्वतःकडे लक्ष द्याल.
आजच्या जगात स्लो लिव्हिंग का आवश्यक?
आज “ फास्ट ” जगणं म्हणजे “ स्मार्ट ” समजलं जातं. “मला वेळ नाही” असं सांगणं म्हणजे प्रतिष्ठा वाटते.
लोकं सतत व्यस्त दिसतात, पण आतून थकलेली असतात.
फास्ट लाईफ देतं यशाचं बाह्य रूप, पण घेऊन जातं मन:शांतीचं मर्म.
त्याउलट, स्लो लिव्हिंग करणारा माणूस बाहेरून शांत दिसतो, पण आतून समाधानी असतो.
तो प्रत्येक क्षणात जगतो, आणि म्हणूनच त्याचं जगणं पूर्ण वाटतं.
स्लो लिव्हिंग म्हणजे आयुष्याचा वेग कमी करणं नव्हे,
तर मनाचा वेग कमी करणं.
स्लो लिव्हिंग म्हणजे झाडासारखं —
शांत, स्थिर, पण तरीही सतत वाढत राहणारं.
स्लो लिव्हिंग म्हणजे —
पावसाच्या थेंबात, मुलाच्या हसण्यात, आणि गप्पांच्या ओघात आनंद शोधणं.
आणि सर्वात महत्त्वाचं —
*स्लो लिव्हिंग म्हणजे स्वतःसाठी थांबून श्वास घेणं.*
थोडं थांबा… डोळे मिटा… आणि श्वास घ्या.
कदाचित तुम्हाला जाणवेल —
याच क्षणात संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे.
विद्यार्थी मित्रहो,
आनंदाने उत्सहात जगा आणि आपले ध्येय साध्य करा पण..
समजून घ्या आर्ट ऑफ लिविंग….जीवन आनंदाने जगण्याची कला
All the best……
“तो एक उगवता कावळा आहे, आमच्या पिसांनी सजलेला (आमच्या कल्पना चोरून लिहिणारा !)
आणि तो आमच्यासारखा काव्य लिहू शकतो असा त्याचा गैरसमज आहे”.
लेखक आणि राजकारणी असलेल्या सॅम्युएल पीप्स यालाही त्या लेखकाचं त्याने पाहिलेलं नाटक अजिबात आवडलं नाही.
१६६२ मध्ये त्याने लिहिलं –
“हे माझ्या आयुष्यात पाहिलेलं सगळ्यात कंटाळवाणं नाटक आहे.”
१७५८ मध्ये फ्रेंच कवी डिडरॉ त्या लेखकाबद्दल म्हणाला:
“त्याने काव्य लिहिले यात त्याची चूक नाही, पण त्यामुळे कवितेचा दर्जा खालावला.”
१७६५ मध्ये फ्रेंच इतिहासकार आणि प्रसिद्ध लेखक व्हॉल्टेअर म्हणाला:
“तो थोडीशी कल्पनाशक्ती असलेला “जंगली” लेखक होता. त्याची नाटकं फक्त लंडन आणि कॅनडातच चालतील.”
१८१४ मध्ये कवी बायरन म्हणाला:
“त्या लेखकाचं नाव उगाचच मोठं केलं गेलंय, लवकरच लोक त्याला विसरून जातील.”
१९०७ मध्ये जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाला:
“त्याच्यासारखा लेखक मला इतका नकोसा वाटतो की त्याच्यावर दगड फेकावेत असं वाटतं.”
रशियन लेखक टॉलस्टॉय म्हणाला:
“त्याच्या नाटकांचा मला तीव्र तिरस्कार आहे आणि कंटाळा येतो.”
इतक्या मोठ्या कवी-लेखक -नाटककारांनी ज्या लेखकाची निंदा केली,
तो हयात असताना तर केलीच , त्याच्या मृत्यूपश्चातही केली,
जवळजवळ १५० वर्षे विविध महान लेखक – कवींनी ज्याच्यावर टीका केली,
आज तोच लेखक इंग्रजीतील सर्वात महान लेखक मानला जातो.
एव्हाना तुम्ही त्या लेखकाचं नाव ओळखलं असेलच !
तो लेखक आहे – विलियम शेक्सपिअर
असं का घडलं असेल ?
कोणाचं म्हणणं बरोबर आहे ? शेक्सपिअरची नाटके डोक्यावर घेणाऱ्या जगभरातील रसिकांचं की त्याच्यावर टीका करणाऱ्या हुशार, प्रभावी, प्रथितयश लेखकांचं ?
याच्यामागे एक तांत्रिक कारण आहे.
शेक्सपिअरच्या काळात जी नाटके होत तेव्हा ध्वनीक्षेपक नव्हते. कलाकारांना ओरडून बोलावे लागत होते. त्यात प्रेक्षकांचाही हल्लागुल्ला असायचा. हे वातावरण लक्षात घेऊन शेक्सपिअरने नाटके लिहिली.
त्याने सोपी भाषा, छोटी वाक्य आणि लोकाभिमुख शब्द आणि वाक्यप्रचार वापरले.
थोडक्यात, शेक्सपिअरने सामान्य पेक्षकांना समोर ठेवून नाटक लिहिलं.
शेक्सपिअरने कधीही टीकाकारांसाठी किंवा इतर लेखकांसाठी लिहिलं नाही. आणि त्याने टीका कधी ऐकलीही नाही.
त्याने सामान्य लोकांसाठी लिहिलं.
म्हणूनच आजही लोक त्याचे वाक्प्रचार दैनंदिन जीवनात वापरतात.
कधी तुम्ही एखादा सामान्य माणूस रॉबर्ट ग्रीन, व्हॉल्टेअर किंवा टॉलस्टॉय यांनी लिहिलेली वाक्य दैनंदिन वापरात ऐकली आहेत का?
पण शेक्सपिअर? रोज ऐकायला मिळतो.
हे अगदी तसेच आहे जे ज्ञानेश्वरांनी केले. सामान्य माणसांपर्यंत ज्ञान पोहोचविण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणून आज ज्ञानेश्वर अजरामर आहेत.
या उदाहरणांमधून दोन गोष्टी नक्की शिकण्यासारख्या आहेत.
१ . तुम्ही कोणीही असलात, काहीही केलं तरी टीका होणारच ! ज्यांचे ऐकले नाही ते पण टीका करणार, ज्यांचं ऐकलं ते पण टीका करणार आणि कोणाचंच ऐकली नाही तरी टीका होणारच !
त्यामुळे फार ताण घेऊ नका. मनातील “होकायंत्र” वापरा !
२ . आपल्या व्यवसायात ग्राहकांना (Target Audience) समोर ठेवूनच सर्व कामे करा. त्यांना आवडेल का ? त्यांना उपयोगी ठरेल का ? त्यांना सोयीचे होईल का ? हा एकमेव विचार सदैव मनात राहूद्या.
विद्यार्थी मित्रहो,
आपल्या नौकरी किंवा व्यवसायात वरील उदाहरण नेहमी लक्षात ठेवावं 👍
जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि औद्योगिक क्रांती घडवली असे आपण वाचले असेल. मात्र जेम्स वॅटने आणखीन एक तितकाच महत्वाचा शोध लावला होता. पण आपण त्या शोधला फार महत्व देत नाही. त्या शोधाबद्दल जाणून घेऊयाच …पण त्याआधी एक आणखी गैरसमज दूर करूया !
जेम्स वॅटच्या इंजिनाच्या आधीच एका स्टीम इंजिनचा शोध लागला होता. १ ७ १ २ मध्ये थॉमस न्यूकमेनने वाफेवर चालणारे बीम इंजिन (beam engine) शोधलं होतं. न्यूकमेनचे इंजिन अवाढव्य होते. त्यामध्ये पिस्टन एकाच दिशेने चालायचा आणि प्रत्येक वेळी पिस्टन स्ट्रोकनंतर सिलिंडर थंड करावा लागत असे. ही प्रक्रिया वेळखाऊ होती आणि त्यामुळे बीम इंजिन धीमे होते आणि त्याची कार्यक्षमता कमी होती. खाणीमध्ये साचलेले पाणी पम्प करून बाहेर काढण्यासाठी प्रामुख्याने बीम इंजिन वापरले जात होते.
१७६४ मध्ये वॉटने “कंडेन्सिंग सिलिंडर” (condensing cylinder) शोधला.
त्यामुळे वाफ एका वेगळ्या सिलिंडरमध्ये थंड केली जायची आणि मुख्य सिलिंडर नेहमी गरम राहायचा.
यामुळे प्रक्रिया जलद, सोपी आणि कार्यक्षम झाली.
जेम्स वॅटने इंजिन मध्ये केलेली सुधारणा अफाट होती. आणि त्यामुळे अनेक अवजड कामांसाठी आता वाफेची ताकद वापरता येणार होती. पण जेव्हा इंजिन म्हणजे काय हेच लोकांना माहित नव्हते तेव्हा ते विकणार कसे ? तेव्हा प्रचंड अवजड कामे नव्हतीच. होती फक्त शेतीची कामे. कृषीप्रधान समाजाला ती कशी विकावी?
इंग्लंडमध्ये तेव्हापर्यंत सगळं घोड्यांच्या ताकदीवर चालायचं.
लोकांना घोड्यांशिवाय दुसऱ्या शक्तीची कल्पनाच नव्हती.
आणि इथे येतो जेम्स वॅटचा दुसरा शोध ! जेम्स वॉटने लोकांच्या भाषेत बोलायचं ठरवलं.
तो आपल्या इंजिनबद्दल “तांत्रिक” बोलला नाही, तर घोड्यांच्या तुलनेत बोलला.
त्याने “Horsepower” हे एकक तयार केलं.
सामान्यतः एक घोडा दिवसभरात जेवढं काम करतो – ३३,००० पाउंड पाणी १,००० फूट खोल विहिरीतून वर काढणं – ते गणित त्याने एका फॉर्म्युल्यात बदललं.
त्याने सांगितलं – १ Horsepower = ५५० पाउंड वजन १ फूट वर १ सेकंदात उचलणं.
आता शेतकरी आणि खाणमालक इंजिनाची ताकद सहज समजू शकत होते.
१ हॉर्सपॉवर इंजिन = १ घोड्यांचं काम.
१० हॉर्सपॉवर इंजिन = १० घोड्यांचं काम.
आणि हे इंजिन २४ तास सतत चालू शकतं, घोड्यांसारखी विश्रांती इंजिनाला नको होती.
म्हणजे एक इंजिनाने तीन पटीने जास्त काम करता येत होतं.
वॉटने घोड्यांचं गणित मशीनमध्ये बदललं. यामुळे लोकांची भीती कमी झाली आणि मशीन स्वीकारणं सोपं झालं.
वॉट स्वतःच्या नाविन्यपूर्ण शोधात अडकून राहिला नाही. त्याने ग्राहकांच्या डोक्यात घुसून त्यांच्या भाषेत संवाद साधला. त्यामुळेच संपूर्ण जगाला औद्योगिक क्रांती समजावून देण्याचे काम त्याला करता आले.
आजही हॉर्सपॉवर ही मापनाची एककं वापरली जातात.
स्टीव्ह जॉब्सने जेव्हा पहिल्यांदा आय-पॉड लाँच केला. तेव्हा त्याने ते नाजूकसे छोटे उपकरण आपल्या जीन्सच्या खिशातून बाहेर काढले आणि म्हणाला “१००० गाणी तुमच्या खिशात !”
ग्राहकांना आय – पॉडचा आकार सेंटीमीटर मध्ये सांगितला नाही आणि मेमरी किती बाइट्स आहे ते पण सांगितले नाही. त्याने तीच भाषा वापरली जी ग्राहकांना कळते !
चांगली मार्केटिंग म्हणजे चांगला संवाद ! ग्राहकांना कळेल असा संवाद !
जर तुमचे उत्पादन किंवा सेवा ग्राहकांचा कोणता प्रॉब्लेम सोडवत आहे हे ग्राहकाला कळेल अशा भाषेत समजावता आले तर तुम्हाला मार्केटिंग जमतेय असे समजा!
तर विद्यार्थी मित्र हो,
आपण व्यवसाय करत असाल किंवा करणार असाल तर ही गोष्ट महत्वाची….
१९९० च्या दशकात, पर्ड्यू विद्यापीठात डॉ. विल्यम मुइर नावाचे एक जीवशास्त्रज्ञ होते. एक प्रयोग करत होते. त्यांचे उद्दिष्ट होते – कोंबड्यांमधील अंडी उत्पादनाची कार्यक्षमता वाढवणे. पण त्यांचा प्रयोग फक्त कोंबड्यांपुरता मर्यादित नव्हता, तो आजच्या तुमच्या-माझ्या कॉर्पोरेट आयुष्यासाठी आणि प्रत्येक टीमसाठी एक मोठा, महत्त्वाचा धडा देणार होता.
डॉ. मुइर यांनी त्यांच्या प्रयोगासाठी कोंबड्यांचे दोन गट तयार केले आणि पुढील सहा पिढ्यांपर्यंत (generations) त्यांचा अभ्यास केला.
पहिला गट म्हणजे ‘नियंत्रण गट’ होता. हा गट अगदी सामान्य कोंबड्यांचा होता. इथे कुठलीही विशेष निवड नव्हती; त्या कोंबड्या शांतपणे, त्यांच्या पद्धतीने एकत्र राहत होत्या.
मात्र दुसरा गट होता ‘सुपर-चिकन्स’चा. या गटात, प्रत्येक पिढीत जी कोंबडी सर्वात जास्त अंडी देत होती, फक्त तिचीच निवड केली गेली. ही कोंबडी म्हणजे त्या गटाची ‘स्टार परफॉर्मर’ होती, वैयक्तिक उत्पादकतेत ‘सर्वाधिक पुढे’ होती. पुढील सहा पिढ्यांपर्यंत या गटात केवळ अशा “स्टार परफॉर्मर्स”नाच ठेवले होते.
सहा पिढ्या उलटल्या… जेव्हा डॉ. मुइर यांनी निरीक्षण नोंदवले, ते विचार करायला लावणारे होते.
नियंत्रण गटात कोंबड्या आनंदाने नांदत होत्या. त्या निरोगी, चांगल्या स्थितीत होत्या आणि त्यांनी एकमेकांना कोणतीही इजा केली नव्हती. या शांत, सहयोगी गटाचे एकूण अंडी उत्पादन आपोआप १६०% नी वाढले होते!
पण ‘सुपर-चिकन्स’च्या खुराड्यातले दृश्य भयानक होते. सहा पिढ्यांनंतर तिथे फक्त तीनच कोंबड्या जिवंत उरल्या होत्या! बाकीच्या कोंबड्यांना त्यांच्याच गटातील इतरांनी चोची मारून मारून ठार केले होते. त्यांच्या अति-स्पर्धेने गटाची उत्पादकता वाढवण्याऐवजी ती नष्ट केली आणि एकूण अंडी उत्पादन खूपच खाली आले होते.
डॉ. मुइर यांचा निष्कर्ष स्पष्ट होता: ‘सुपर-चिकन्स’ वैयक्तिकरित्या जास्त अंडी देत होत्या, कारण त्या अत्यंत आक्रमक होत्या. त्यांनी इतर कोंबड्यांना दडपले, त्यांचे खाद्य हिसकावले, त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जगू दिले नाही. याउलट, सामान्य कोंबड्यांनी सहकार्याने काम केले, एकमेकांना मदत केली आणि त्यामुळे त्यांच्या गटाची सर्वांगीण प्रगती झाली.
हा धडा आजच्या कॉर्पोरेट जगासाठी फार महत्त्वाचा आहे. तुम्ही आपल्या ऑफिसमध्येही ‘सुपर-चिकन्स’ पाहिले असतील (किंवा कदाचित तुम्हीच “सुपर चिकन” असाल!). हे लोक फक्त स्वतःच्या वैयक्तिक यशाचा विचार करतात, इतरांपासून माहिती लपवतात, दुसऱ्याचे काम दडपतात आणि टीम मेंबर्सना मागे खेचतात. त्यांना वाटते की तीव्र स्पर्धेने ते पुढे जातील, पण प्रत्यक्षात त्यांच्यामुळे संपूर्ण टीमचे मानसिक आरोग्य आणि उत्पादकता खालावते.
याचे उत्तम उदाहरण क्रिकेटच्या मैदानावर दिसते.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाकडे अनेक वर्षांपासून पाहा. या संघात नेहमीच विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांसारखे जगातील सर्वात मोठे ‘सुपर-स्टार्स’ (सुपर-चिकन्स) होते. वैयक्तिकरित्या हे खेळाडू प्रत्येक हंगामात शानदार कामगिरी करत होते. पण गेली अनेक वर्षे या टीमने स्पर्धेचे मुख्य विजेतेपद जिंकलेले नव्हते. का? कारण अनेकदा वैयक्तिक ‘सुपर-स्टारडम’मुळे संघातील एकसंधता आणि मधल्या फळीतील खेळाडूंचे योगदान बाजूला पडले.
याच्या उलट, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) किंवा मुंबई इंडियन्स (MI) सारख्या यशस्वी संघांकडे पाहा. इथेही स्टार खेळाडू आहेतच, पण त्यांचे यश कशावर आधारित आहे? टीममधील सहकार्य (Cooperation) आणि प्रत्येक खेळाडूला मिळालेले पाठबळ. या टीम्समध्ये सर्व खेळाडू आपापल्या परीने यशाचा वाटा उचलतात. दोन खेळाडूंच्या परफॉर्मन्स खूप जास्त तफावत (Skill Gap) नसते. त्यामुळे त्यांची प्रगती दीर्घकाळ टिकणारी ठरते.
कोणतीही कंपनी किंवा संघ ‘सुपर-स्टार’वर नाही, तर सामूहिक सहकार्यावर आणि सामाजिक जोडणीवर मोठी होते. प्रगतीचा खरा मार्ग ‘एकमेकांना चोची मारण्यात’ नाही, तर ‘एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून’ पुढे जाण्यात आहे. जेव्हा सहकार्य रुजते, तेव्हा सामूहिक बुद्धिमत्ता कार्यरत होते आणि संपूर्ण गटाचा विकास होतो.
तुम्हाला तुमच्या टीमला अशा ‘सुपर-चिकन्स’च्या खुराड्यात ठेवायचे आहे, जिथे थोडी प्रगती होते, पण विध्वंस जास्त असतो;
की सहकार्याने काम करणाऱ्या सामान्य कोंबड्यांच्या गटात, जिथे सगळ्यांची मिळून सर्वांगीण प्रगती होते?
याचा सर्वांगीण विचार नक्की व्हायला हवा.
“एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ ” अर्थात साथी हाथ बढाना.. साथी रे “