Run, Operate and Manage by Kapil Patil Educational Institute | UGC Recognised as 2(f) 12(B) | Permanently Affiliated to University of Mumbai | Re-accredited 'B' Grade by NAAC (3rd cycle) | AISHE code 34145
जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि औद्योगिक क्रांती घडवली असे आपण वाचले असेल. मात्र जेम्स वॅटने आणखीन एक तितकाच महत्वाचा शोध लावला होता. पण आपण त्या शोधला फार महत्व देत नाही. त्या शोधाबद्दल जाणून घेऊयाच …पण त्याआधी एक आणखी गैरसमज दूर करूया !
जेम्स वॅटच्या इंजिनाच्या आधीच एका स्टीम इंजिनचा शोध लागला होता. १ ७ १ २ मध्ये थॉमस न्यूकमेनने वाफेवर चालणारे बीम इंजिन (beam engine) शोधलं होतं. न्यूकमेनचे इंजिन अवाढव्य होते. त्यामध्ये पिस्टन एकाच दिशेने चालायचा आणि प्रत्येक वेळी पिस्टन स्ट्रोकनंतर सिलिंडर थंड करावा लागत असे. ही प्रक्रिया वेळखाऊ होती आणि त्यामुळे बीम इंजिन धीमे होते आणि त्याची कार्यक्षमता कमी होती. खाणीमध्ये साचलेले पाणी पम्प करून बाहेर काढण्यासाठी प्रामुख्याने बीम इंजिन वापरले जात होते.
१७६४ मध्ये वॉटने “कंडेन्सिंग सिलिंडर” (condensing cylinder) शोधला.
त्यामुळे वाफ एका वेगळ्या सिलिंडरमध्ये थंड केली जायची आणि मुख्य सिलिंडर नेहमी गरम राहायचा.
यामुळे प्रक्रिया जलद, सोपी आणि कार्यक्षम झाली.
जेम्स वॅटने इंजिन मध्ये केलेली सुधारणा अफाट होती. आणि त्यामुळे अनेक अवजड कामांसाठी आता वाफेची ताकद वापरता येणार होती. पण जेव्हा इंजिन म्हणजे काय हेच लोकांना माहित नव्हते तेव्हा ते विकणार कसे ? तेव्हा प्रचंड अवजड कामे नव्हतीच. होती फक्त शेतीची कामे. कृषीप्रधान समाजाला ती कशी विकावी?
इंग्लंडमध्ये तेव्हापर्यंत सगळं घोड्यांच्या ताकदीवर चालायचं.
लोकांना घोड्यांशिवाय दुसऱ्या शक्तीची कल्पनाच नव्हती.
आणि इथे येतो जेम्स वॅटचा दुसरा शोध ! जेम्स वॉटने लोकांच्या भाषेत बोलायचं ठरवलं.
तो आपल्या इंजिनबद्दल “तांत्रिक” बोलला नाही, तर घोड्यांच्या तुलनेत बोलला.
त्याने “Horsepower” हे एकक तयार केलं.
सामान्यतः एक घोडा दिवसभरात जेवढं काम करतो – ३३,००० पाउंड पाणी १,००० फूट खोल विहिरीतून वर काढणं – ते गणित त्याने एका फॉर्म्युल्यात बदललं.
त्याने सांगितलं – १ Horsepower = ५५० पाउंड वजन १ फूट वर १ सेकंदात उचलणं.
आता शेतकरी आणि खाणमालक इंजिनाची ताकद सहज समजू शकत होते.
१ हॉर्सपॉवर इंजिन = १ घोड्यांचं काम.
१० हॉर्सपॉवर इंजिन = १० घोड्यांचं काम.
आणि हे इंजिन २४ तास सतत चालू शकतं, घोड्यांसारखी विश्रांती इंजिनाला नको होती.
म्हणजे एक इंजिनाने तीन पटीने जास्त काम करता येत होतं.
वॉटने घोड्यांचं गणित मशीनमध्ये बदललं. यामुळे लोकांची भीती कमी झाली आणि मशीन स्वीकारणं सोपं झालं.
वॉट स्वतःच्या नाविन्यपूर्ण शोधात अडकून राहिला नाही. त्याने ग्राहकांच्या डोक्यात घुसून त्यांच्या भाषेत संवाद साधला. त्यामुळेच संपूर्ण जगाला औद्योगिक क्रांती समजावून देण्याचे काम त्याला करता आले.
आजही हॉर्सपॉवर ही मापनाची एककं वापरली जातात.
स्टीव्ह जॉब्सने जेव्हा पहिल्यांदा आय-पॉड लाँच केला. तेव्हा त्याने ते नाजूकसे छोटे उपकरण आपल्या जीन्सच्या खिशातून बाहेर काढले आणि म्हणाला “१००० गाणी तुमच्या खिशात !”
ग्राहकांना आय – पॉडचा आकार सेंटीमीटर मध्ये सांगितला नाही आणि मेमरी किती बाइट्स आहे ते पण सांगितले नाही. त्याने तीच भाषा वापरली जी ग्राहकांना कळते !
चांगली मार्केटिंग म्हणजे चांगला संवाद ! ग्राहकांना कळेल असा संवाद !
जर तुमचे उत्पादन किंवा सेवा ग्राहकांचा कोणता प्रॉब्लेम सोडवत आहे हे ग्राहकाला कळेल अशा भाषेत समजावता आले तर तुम्हाला मार्केटिंग जमतेय असे समजा!
तर विद्यार्थी मित्र हो,
आपण व्यवसाय करत असाल किंवा करणार असाल तर ही गोष्ट महत्वाची….
१९९० च्या दशकात, पर्ड्यू विद्यापीठात डॉ. विल्यम मुइर नावाचे एक जीवशास्त्रज्ञ होते. एक प्रयोग करत होते. त्यांचे उद्दिष्ट होते – कोंबड्यांमधील अंडी उत्पादनाची कार्यक्षमता वाढवणे. पण त्यांचा प्रयोग फक्त कोंबड्यांपुरता मर्यादित नव्हता, तो आजच्या तुमच्या-माझ्या कॉर्पोरेट आयुष्यासाठी आणि प्रत्येक टीमसाठी एक मोठा, महत्त्वाचा धडा देणार होता.
डॉ. मुइर यांनी त्यांच्या प्रयोगासाठी कोंबड्यांचे दोन गट तयार केले आणि पुढील सहा पिढ्यांपर्यंत (generations) त्यांचा अभ्यास केला.
पहिला गट म्हणजे ‘नियंत्रण गट’ होता. हा गट अगदी सामान्य कोंबड्यांचा होता. इथे कुठलीही विशेष निवड नव्हती; त्या कोंबड्या शांतपणे, त्यांच्या पद्धतीने एकत्र राहत होत्या.
मात्र दुसरा गट होता ‘सुपर-चिकन्स’चा. या गटात, प्रत्येक पिढीत जी कोंबडी सर्वात जास्त अंडी देत होती, फक्त तिचीच निवड केली गेली. ही कोंबडी म्हणजे त्या गटाची ‘स्टार परफॉर्मर’ होती, वैयक्तिक उत्पादकतेत ‘सर्वाधिक पुढे’ होती. पुढील सहा पिढ्यांपर्यंत या गटात केवळ अशा “स्टार परफॉर्मर्स”नाच ठेवले होते.
सहा पिढ्या उलटल्या… जेव्हा डॉ. मुइर यांनी निरीक्षण नोंदवले, ते विचार करायला लावणारे होते.
नियंत्रण गटात कोंबड्या आनंदाने नांदत होत्या. त्या निरोगी, चांगल्या स्थितीत होत्या आणि त्यांनी एकमेकांना कोणतीही इजा केली नव्हती. या शांत, सहयोगी गटाचे एकूण अंडी उत्पादन आपोआप १६०% नी वाढले होते!
पण ‘सुपर-चिकन्स’च्या खुराड्यातले दृश्य भयानक होते. सहा पिढ्यांनंतर तिथे फक्त तीनच कोंबड्या जिवंत उरल्या होत्या! बाकीच्या कोंबड्यांना त्यांच्याच गटातील इतरांनी चोची मारून मारून ठार केले होते. त्यांच्या अति-स्पर्धेने गटाची उत्पादकता वाढवण्याऐवजी ती नष्ट केली आणि एकूण अंडी उत्पादन खूपच खाली आले होते.
डॉ. मुइर यांचा निष्कर्ष स्पष्ट होता: ‘सुपर-चिकन्स’ वैयक्तिकरित्या जास्त अंडी देत होत्या, कारण त्या अत्यंत आक्रमक होत्या. त्यांनी इतर कोंबड्यांना दडपले, त्यांचे खाद्य हिसकावले, त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जगू दिले नाही. याउलट, सामान्य कोंबड्यांनी सहकार्याने काम केले, एकमेकांना मदत केली आणि त्यामुळे त्यांच्या गटाची सर्वांगीण प्रगती झाली.
हा धडा आजच्या कॉर्पोरेट जगासाठी फार महत्त्वाचा आहे. तुम्ही आपल्या ऑफिसमध्येही ‘सुपर-चिकन्स’ पाहिले असतील (किंवा कदाचित तुम्हीच “सुपर चिकन” असाल!). हे लोक फक्त स्वतःच्या वैयक्तिक यशाचा विचार करतात, इतरांपासून माहिती लपवतात, दुसऱ्याचे काम दडपतात आणि टीम मेंबर्सना मागे खेचतात. त्यांना वाटते की तीव्र स्पर्धेने ते पुढे जातील, पण प्रत्यक्षात त्यांच्यामुळे संपूर्ण टीमचे मानसिक आरोग्य आणि उत्पादकता खालावते.
याचे उत्तम उदाहरण क्रिकेटच्या मैदानावर दिसते.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाकडे अनेक वर्षांपासून पाहा. या संघात नेहमीच विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांसारखे जगातील सर्वात मोठे ‘सुपर-स्टार्स’ (सुपर-चिकन्स) होते. वैयक्तिकरित्या हे खेळाडू प्रत्येक हंगामात शानदार कामगिरी करत होते. पण गेली अनेक वर्षे या टीमने स्पर्धेचे मुख्य विजेतेपद जिंकलेले नव्हते. का? कारण अनेकदा वैयक्तिक ‘सुपर-स्टारडम’मुळे संघातील एकसंधता आणि मधल्या फळीतील खेळाडूंचे योगदान बाजूला पडले.
याच्या उलट, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) किंवा मुंबई इंडियन्स (MI) सारख्या यशस्वी संघांकडे पाहा. इथेही स्टार खेळाडू आहेतच, पण त्यांचे यश कशावर आधारित आहे? टीममधील सहकार्य (Cooperation) आणि प्रत्येक खेळाडूला मिळालेले पाठबळ. या टीम्समध्ये सर्व खेळाडू आपापल्या परीने यशाचा वाटा उचलतात. दोन खेळाडूंच्या परफॉर्मन्स खूप जास्त तफावत (Skill Gap) नसते. त्यामुळे त्यांची प्रगती दीर्घकाळ टिकणारी ठरते.
कोणतीही कंपनी किंवा संघ ‘सुपर-स्टार’वर नाही, तर सामूहिक सहकार्यावर आणि सामाजिक जोडणीवर मोठी होते. प्रगतीचा खरा मार्ग ‘एकमेकांना चोची मारण्यात’ नाही, तर ‘एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून’ पुढे जाण्यात आहे. जेव्हा सहकार्य रुजते, तेव्हा सामूहिक बुद्धिमत्ता कार्यरत होते आणि संपूर्ण गटाचा विकास होतो.
तुम्हाला तुमच्या टीमला अशा ‘सुपर-चिकन्स’च्या खुराड्यात ठेवायचे आहे, जिथे थोडी प्रगती होते, पण विध्वंस जास्त असतो;
की सहकार्याने काम करणाऱ्या सामान्य कोंबड्यांच्या गटात, जिथे सगळ्यांची मिळून सर्वांगीण प्रगती होते?
याचा सर्वांगीण विचार नक्की व्हायला हवा.
“एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ ” अर्थात साथी हाथ बढाना.. साथी रे “
कल्पना करा, तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला घेऊन बाहेर फेरफटका मारायला गेला आहात. तुम्ही आजूबाजूला दिसणाऱ्या ओळखीच्या माणसांना भेटताय, थांबून बोलताय. वातावरणातला गंध , गाड्यांचे आवाज आणि वाऱ्याची झुळूक तुम्हाला जाणवते आहे.
तुमचा कुत्रा सोबत चालतोय पण तो इथेतिथे ओळखीच्या खुणा हुंगत चाललाय. ओल्या नाकपुढ्या हवेतील असंख्य गंध साठवतायत, गंधांवरून तो जगाचा अर्थ लावतोय. त्याला ते आवाज ऐकू येत आहेत जे तुम्हाला ऐकू येत नाही. त्याला ते दिसतंय जे तुम्हाला दिसत नाही किंवा तुम्ही सवयीने दुर्लक्ष करताय.
त्या कुत्र्याच्या अंगावरील केसात एक गोचीड लपून बसली आहे. त्या अंध आणि बहिऱ्या जिवासाठी जगाचा अर्थ फक्त दोनच गोष्टी आहेत – सस्तन प्राण्याच्या शरीराचे तापमान आणि त्याच्या त्वचेतून येणारा (ब्युटीरिक ऍसिडचा) गंध. यापलीकडे जग आहे, हे त्याला माहीतच नाही.
तुम्ही एका झाडापाशी थांबलात. त्या झाडावर वटवाघूळ लटकलेलं आहे. ते डोळ्यांनी नव्हे, तर प्रतिध्वनीने (echolocation) जग ‘पाहत’ आहे. वस्तूवर आदळून परत येणाऱ्या ध्वनिलहरींमधून ते आपल्या मनात जगाचं चित्र उभं करतं. प्रकाशाचे रंग, झाडांची हिरवी पानं याला त्याच्या जगात काहीच अर्थ नाही.
हे आहे ‘उमवेल्ट’ !
१९०९ मध्ये, जेकब वॉन युक्सकुल (Jakob von Uexküll) नावाच्या एका जीवशास्त्रज्ञाने ‘उमवेल्ट’ ही संकल्पना मांडली. उमवेल्ट’ म्हणजे एकाच परिसरात राहणारे वेगवेगळे प्राणी, जगाला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवतात. थोडक्यात सांगायचं तर, जगाचा तो छोटासा, मर्यादित भाग जो एखादा प्राणी आपल्या ज्ञानेंद्रियांनी ओळखू शकतो, तो म्हणजे त्याची ‘उमवेल्ट’.
जग अफाट आहे. पण आपण तेवढंच जग अनुभवू शकतो जेवढी आपली ज्ञानेंद्रिये पाहू शकतात. प्रत्येक जीव आपल्या ‘उमवेल्ट’लाच संपूर्ण आणि अंतिम वास्तव समजतो.
‘द ट्रुमन शो’ हा एक प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट आहे. ही ट्रुमन बरबँक नावाच्या एका माणसाची कथा आहे, जो एक सामान्य आणि आनंदी जीवन जगतो. तो सीहेवन नावाच्या एका सुंदर, शांत आणि परिपूर्ण शहरात राहतो. त्याचे मित्र आहेत, त्याची पत्नी आहे आणि एक चांगली नोकरी आहे. पण त्याला एक गोष्ट माहीत नसते – त्याचे संपूर्ण आयुष्य एक खोटं आहे. तो जन्मापासून एका विशाल स्टुडिओमध्ये (जो शहरासारखा दिसतो) राहत आहे आणि त्याचे आयुष्य हा २४ तास चालणारा, जगभरात प्रसारित होणारा एक प्रचंड लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो आहे.
या चित्रपटातील नायकाप्रमाणेच, “आपल्यासमोर जे जग सादर केले जाते, तेच आपण वास्तव म्हणून स्वीकारतो.” आपणही आपापल्या ‘उमवेल्ट’ स्वीकारतो आणि तिथेच थांबतो.
माणसाची ‘उमवेल्ट’ जास्त गुंतागुंतीची आहे, कारण ती फक्त ज्ञानेंद्रियांवर अवलंबून नाही. ती अनेक पातळ्यांवर तयार होते:
१. जैविक ‘उमवेल्ट’ (The Biological Umwelt): आपल्या प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. जो व्यक्ती रंगांधळा आहे, त्याचं आणि आपलं दृश्य जग वेगळं आहे. काही लोकांना इतरांपेक्षा जास्त तीव्र गंध येतो किंवा चव समजते. काहीजण अतिशय मंद आवाजही ऐकू शकतात. हा आपल्या ‘उमवेल्ट’मधील नैसर्गिक फरक आहे.
२. अनुभवांची ‘उमवेल्ट’ (The Experiential Umwelt): हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपले आयुष्यभरातील अनुभव आपल्या वास्तवाची आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची निर्मिती करतात.
उदाहरणार्थ, सुरक्षितता: ज्या व्यक्तीचं बालपण युद्धजन्य परिस्थितीत गेलं आहे, तिच्यासाठी फटाक्याचा मोठा आवाज म्हणजे ‘धोक्याचा संकेत’ असतो. याउलट, शांत वातावरणात वाढलेल्या व्यक्तीसाठी तोच आवाज फक्त ‘एक गोंगाट’ असतो. इथे आवाज (संकेत) एकच आहे, पण दोन्ही ‘उमवेल्ट’मध्ये त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे.
उदाहरणार्थ, आर्थिक स्थिती: गरिबीत वाढलेल्या व्यक्तीसाठी पैशाचं, बचतीचं आणि सुरक्षिततेचं महत्त्व वेगळं असतं. तिच्या जगात प्रत्येक निर्णय आर्थिक गणितावर अवलंबून असतो. दुसरीकडे, श्रीमंतीत वाढलेल्या व्यक्तीच्या ‘उमवेल्ट’मध्ये हे संकेत तितकेसे तीव्र नसतात.
३. ज्ञान आणि संस्कृतीची ‘उमवेल्ट’ (The Knowledge and Cultural Umwelt): आपलं शिक्षण, आपली नोकरी आणि आपली संस्कृती आपली ‘उमवेल्ट’ घडवते.
एकाच पुलाकडे पाहताना, एका इंजिनिअरला त्यातील ‘लोड-बेअरिंग स्ट्रेस’ आणि ‘टेन्साइल स्ट्रेंथ’ दिसेल, तर एका इतिहासकाराला त्या पुलाने शहराच्या विकासात बजावलेली भूमिका दिसेल. एका कवीला त्यात विरह किंवा मिलनाचं प्रतीक दिसेल. पूल तोच आहे पण प्रत्येकाची ‘उमवेल्ट’ वेगळी आहे.
समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा आपण हे विसरतो की समोरच्या व्यक्तीची ‘उमवेल्ट’ आपल्यापेक्षा वेगळी असू शकते. आपण आपल्याच अनुभवांच्या आणि ज्ञानाच्या चष्म्यातून जगाला पाहतो आणि आग्रह धरतो की समोरच्यानेही ते तसंच पाहावं. इथूनच मतभेद आणि संघर्षाला सुरुवात होते. (सोशल मीडियावर तर हे २४ तास चालू असते !)
‘उमवेल्ट’ आपल्याला शिकवते की आपलं ज्ञान आणि अनुभव मर्यादित आहेत. आपण जगाचा एक छोटासा तुकडाच पाहू शकतो. ही जाणीव आपल्यातील अहंकार कमी करते. “मी सर्वकाही जाणू शकत नाही आणि माझं जग हे एकमेव सत्य नाही,” ही भावना मनात रुजवणं, ही विकासाची पहिली पायरी आहे.
जेव्हा तुमचा कोणाशी वाद होईल, तेव्हा त्याला ‘जिंकण्याची लढाई’ म्हणून पाहू नका. त्याकडे ‘समोरच्याची उमवेल्ट समजून घेण्याची संधी’ म्हणून पाहा.
“तुझं चुकतंय!” असं म्हणण्याऐवजी, “तू या निष्कर्षापर्यंत कसा पोहोचलास, हे मला समजून घ्यायचं आहे,” असं म्हणून पाहा.
“हे असं कसं असू शकतं?” याऐवजी, “तुला असं का वाटतं, हे सांगशील का?” असं विचारा. यामुळे संवाद तुटण्याऐवजी अधिक अर्थपूर्ण होतो.
सहानुभूती म्हणजे फक्त समोरच्यासाठी वाईट वाटणं नाही, तर त्याची ‘उमवेल्ट’ कशी असेल याची कल्पना करण्याचा प्रयत्न करणे (सह-अनुभूती). त्याचे अनुभव, त्याच्या भीती, त्याच्या आशा-आकांक्षा कोणत्या जगात घडल्या आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे. यामुळे आपण माणसांना त्यांच्या वागण्यावरून नाही, तर त्या वागण्यामागील कारणांवरून समजून घ्यायला लागतो.
एका टीममध्ये किंवा समाजात जितके जास्त प्रकारचे लोक असतील, तितक्या वेगवेगळ्या ‘उमवेल्ट’ एकत्र येतात. यामुळे होतं काय की, सगळ्यांच्या मर्यादित जगांना एकत्र करून, वास्तवाचं एक मोठं आणि अधिक स्पष्ट चित्र दिसू लागतं. जिथे एकाला धोका दिसतो, तिथे दुसऱ्याला संधी दिसू शकते. म्हणूनच, कामाच्या ठिकाणी किंवा समाजात विविधता असणं हे केवळ नैतिकदृष्ट्या चांगलं नाही, तर ते व्यावहारिकदृष्ट्याही अत्यंत फायदेशीर आहे.
आपल्या रोजच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला खात्री असते की ‘आपणच बरोबर आहोत’ आणि समोरची व्यक्ती ‘चुकत आहे’. मग ते कौटुंबिक वाद असोत, ऑफिसमधील मतभेद असोत किंवा मित्रांसोबतची चर्चा असो. आपण आपल्या मतांवर ठाम राहतो आणि समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण या सगळ्यात आपण एक मूलभूत गोष्ट विसरतो. कदाचित हा संघर्ष ‘बरोबर’ विरुद्ध ‘चूक’ असा नसून, ‘एक जग’ विरुद्ध ‘दुसरं जग’ असा असेल तर? आपण जेव्हा हे स्वीकारतो की आपलं जग मर्यादित आहे, तेव्हाच आपल्याला इतरांचं जग शोधण्याची प्रेरणा मिळते. आणि याच जाणिवेत अधिक समृद्ध मानवी संबंधांची शक्यता दडलेली आहे.
तर विद्यार्थी आणि वाचक मित्र हो…
पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की ‘मीच बरोबर आहे’, तेव्हा क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा: “मी माझ्या ‘उमवेल्ट’मधून बोलतोय की समोरच्याची ‘उमवेल्ट’ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय?”
या एका प्रश्नाने तुमच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अफाट बदल घडू शकतो.
(संकलन – श्याम धारासूरकर Librarian, उरण महाविद्यालय, उरण-रायगड)
लायब्ररी हेल्प लाइन नं. 9892798322