साडेतीन टक्क्यांचा नियम

काही दिवसांपूर्वीच नेपाळ मध्ये सरकार उलथून देणारी हिंसक चळवळ झाली. अनेकांना अशी चळवळ भारतात होईल अशी भीती वाटली आणि अनेकांना अशी चळवळ भारतात व्हावी अशी इच्छा देखील झाली.
तेव्हा सर्वाना ३ .५ % च्या नियमाची आठवण झाली.
मानवजातीच्या इतिहासात सत्ताधारी वर्ग आणि सामान्य लोक यांच्यात संघर्ष नेहमीच झाला आहे. हा संघर्ष कधी शांततामय बंद किंवा निदर्शने करून झालेला आहे तर अनेकदा रक्तरंजित युद्धाच्या स्वरूपात दिसला आहे.

हार्वर्ड मधील राज्यशास्त्र अभ्यासक एरिका चेनोवेथ यांनी जगभरातील अशा आंदोलनांचा अभ्यास केला आहे. त्या अभ्यासातूनच त्यांनी “साडे तीन टक्क्यांचा नियम” मांडला आहे.

एरिका चेनोवेथ आणि संशोधक मारिया स्टेफन यांनी १९०० ते २००६ या कालावधीतील जगभरातील राजकीय आंदोलनांचे कठोर विश्लेषण केले.
एकूण आदोलनांपैकी केवळ यशस्वी आंदोलनांचा आणखी अभ्यास केला. त्यांना अशी ३२३ आंदोलने आढळली.

यशस्वी आंदोलनाचे निकषही स्पष्ट होते –
१ . आंदोलनाच्या कृतीमुळे एका वर्षाच्या आत सत्ताबदल झाला पाहिजे.
२ . हा बदल केवळ आंदोलनानेच झाला पाहिजे. परकीय सैन्याने हस्तक्षेप करून सत्ता बदलली, तर ते यश मानले जाणार नाही.
तसेच आंदोलनात स्फोट, अपहरण, मालमत्तेचे नुकसान वगैरे घडले असेल तर ते हिंसक मानले. अन्यथा ते अहिंसक अंदोलन म्हणून मानले.
(भारताचा स्वातंत्र्यलढा अंशतः यशस्वी मानण्यात आला होता. कारण अहिंसक मोहिमेच्या सर्वोच्च बिंदूपासून सत्तापालटाला एक वर्षापेक्षा जास्त अवधी लागला होता. यावरून चेनोवेथ यांच्या संशोधनाचे निकष किती कठीण होते याची कल्पना येते.)

या संशोधनाचे निकाल आश्चर्यचकित करणारे होते. चेनोवेथ यांच्या अभ्यासानुसार अहिंसक मोहिमांपैकी सुमारे ५३% वेळा राजकीय बदल साध्य झाले होते, तर हिंसक मोहिमांपैकी फक्त २६% वेळा. आणि अभ्यासातील २५ सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी, २० अहिंसक होती, व त्यापैकी १४ पूर्णपणे यशस्वी ठरली.
म्हणजेच अहिंसक मोहिमा हिंसक मोहिमांपेक्षा दुप्पट जास्त यशस्वी ठरल्या होत्या.

यातील काही उदाहरणांचा उल्लेख केलाच पाहिजे.

– १९८६ मध्ये फिलिपिन्समध्ये घडलेले पीपल पॉवर मूव्हमेंट हा इतिहासातील एक महत्वाचा टप्पा. लाखो लोकांनी प्रार्थना, गाणी आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात शांतपणे आंदोलन केले. फक्त चार दिवसांत काही दशकांपासून सत्तेत असलेले मार्कोस सरकार कोसळले.

– २००३ मध्ये जॉर्जियात घडलेली रोज रेव्होल्युशन ही देखील रक्ताशिवाय झालेली क्रांती होती. आंदोलनकर्त्यांनी संसदेत प्रवेश केला, पण त्यांच्या हातात बंदुका नव्हत्या तर गुलाब होते. हा प्रतीकात्मक क्षण लोकांच्या एकतेचे प्रतिक ठरला.

– १९८० च्या दशकात एस्टोनियामध्ये सिंगिंग रेव्होल्युशन घडली. लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून गाणी म्हणत सोव्हिएत युनियनविरुद्ध आवाज उठवला. हे आंदोलन इतके सामर्थ्यशाली ठरले की शेवटी एस्टोनियाला स्वातंत्र्य मिळाले.

– २०१९ मध्ये सुदान आणि अल्जेरियाचे दीर्घकालीन हुकूमशहा यांना पद सोडायला भाग पाडले गेले – तेही अहिंसक जनआंदोलनामुळे.

सामान्य जनतेला सरकार उलथून लावायचे असेल तर अहिंसक मार्गाने केलेले जनआंदोलन जास्त परिणामकारक ठरेल हे अभ्यासामुळे जगाला कळले. पण अहिंसक आंदोलनच का यशस्वी ठरते याचेही सखोल विवेचन चेनोवेथ यांनी केले आहे.

– नैतिक श्रेष्ठता: हिंसेच्या तुलनेत अहिंसक आंदोलन नैतिकदृष्ट्या अधिक स्वीकारले जाते. सामान्य नागरिक प्रशिक्षित सैनिक नसतात. त्यामुळे हिंसक आंदोलनापासून बरेच लोक दूर राहणे पसंद करतात.

– व्यापक सहभाग: संप, बहिष्कार, शांततामय मोर्चा – यासाठी शरीराने तंदुरुस्त असणे गरजेचे नाही. त्यामुळे समाजातील सर्व घटक जसे की वृद्ध, महिला, विद्यार्थी सर्वजण यात सहभागी होऊ शकतात.

– जास्त प्रसार: शांततामय आंदोलनाबाबत उघडपणे चर्चा करता येते, प्रसारमाध्यमांमध्ये जागा मिळते. हिंसक आंदोलन मात्र गुप्तपणे करावे लागते .त्यामुळे त्याचा प्रसार करताच येत नाही.

– सुरक्षादलांवर परिणाम: जेव्हा लाखो निरपराध लोक रस्त्यावर येतात, तेव्हा सैन्यदलातील अनेकांच्या नजरेसमोर त्यांचे कुटुंबीयच येतात. अशा वेळी ते कारवाई करण्यास धजत नाहीत.

या सर्व कारणांमुळे अहिंसक जनआंदोलन यशस्वी होण्याची शक्यता खूपच वाढते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अहिंसक जनआंदोलन यशस्वी होतेच. चेनोवीथ यांनी अहिंसक आंदोलनांच्या अपयशाचीही कारणमीमांसा केली आहे. आणि याबाबतच त्यांनी “साडे तीन टक्क्यांचा” नियम मांडला आहे.

त्यांच्यामते जेव्हा जेव्हा लोकसंख्येच्या किमान ३.५% लोक सक्रिय सहभाग घेतात, तेव्हा तेव्हा अपयशाची शक्यताच संपते.”

फिलिपिन्स, एस्टोनिया, जॉर्जिया – या साऱ्यांनी हा टप्पा गाठला आणि यश मिळवले.
पण १९५० च्या दशकात पूर्व जर्मनीतील ४ लाख लोक सहभागी झालेले आंदोलन अपयशी ठरले. कारण लोकसंख्येच्या फक्त २% लोक सहभागी झाले होते.
२०११ मधील बहारीन येथील उठाव सुरुवातीला मोठा होता, पण पुढे गटांत विभागला गेला आणि त्यामुळे अपयशी ठरला.

लोकसंख्येच्या साडेतीन टक्के लोकांनी जर सक्रिय सहभाग घेतला, आणि हे ऐक्य वर्षभर टिकून राहिले तर सत्तापालट अहिंसक मार्गाने करणे शक्य आहे.

भारताची लोकसंख्या १४५ कोटी आहे. साडेतीन टक्क्यांच्या नियमानुसार जवळपास पाच करोड लोक जेव्हा सत्ताबदलासाठी एकत्र येतील तेव्हा भारतासारख्या देशातही अशी चळवळ यशस्वी होऊ शकेल. परंतु १४५ कोटींची लोकसंख्या एकसंध नाही. ती वेगवगेळ्या भाषा/राज्य/धर्म/जाती यांमध्ये विखुरलेली आहे. आणि जोपर्यंत भारतीय मनाने विखुरलेले राहतील तोवर निर्णायक जनआंदोलन उभारणे भारतीयांना शक्यच होणार नाही.

आपल्याला नेहमी इतिहासात युद्धकथा, लढाया आणि रक्तपात यांच्याच गोष्टी सांगितल्या जातात. पण खरं तर जग बदलणारी मोठी ताकद ही सामान्य लोकांची, त्यांच्या अहिंसक पण ठाम आंदोलनाची आहे.

एरिका चेनोवेथ सांगतात –
“सामान्य लोकच हिंसा न करताही खरे शौर्य दाखवू शकतात. तेच जग बदलतात. पण त्यांना फार कमी वेळा गौरव मिळतो.”
शस्त्र नव्हे – तर दृढनिश्चय, ऐक्य आणि ३.५% लोकांचा सक्रिय सहभाग – हाच जग बदलण्याचा खरा मार्ग आहे.

संकलन – श्याम धारासूरकर, Librarian,उरण महाविद्यालय उरण
(लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322)

Please visit library-blog for more articles

संकटात ही संधी शोधणे

1889 मध्ये, अल्मोन स्ट्रॉजर (Almon Strowger) हा कॅन्सस सिटीमध्ये एक अंत्यसंस्कार करणारा (undertaker) होता.
त्याला मोकळ्या वेळेत नवनवीन गोष्टी शोधून काढायला आवडायचं. कारण त्याच्याकडे भरपूर वेळ असायचा.
याचे करण म्हणजे त्याचा व्यवसाय फारच खराब चालला होता.
त्याला कळेना की असं का होतंय, कारण ५०००० लोकसंख्येच्या शहरात त्याच्याव्यतिरिक्त दुसरा फक्त एकच undertaker होता.

पण सगळेजण दुसऱ्याकडे जात होते, कोणीही स्ट्रॉजरकडे येत नव्हतं.

एकदा त्याने पाहिलं की त्याचा एक मित्रसुद्धा मृत नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी दुसऱ्या undertaker कडे गेला.
त्याने मित्राला विचारलं, “माझ्याकडे का नाही आलास?”

मित्र म्हणाला की मी फोन केला होता, पण टेलिफोन एक्सचेंजवर काम करणाऱ्या महिलेने सांगितलं की स्ट्रॉजरचा फोन व्यस्त आहे.
मग तिने कॉल दुसऱ्या undertaker कडे वळवला.

स्ट्रॉजरला हे काही केल्या समजेना. कारण त्याचा फोन कधीच व्यस्त नसायचा. मग त्याने दुसऱ्या मित्राला सांगून एक्सचेंजला फोन करायला लावलं.
पण तो कॉलसुद्धा त्याचप्रमाणे दुसऱ्या undertaker कडे वळवण्यात आला.

थोडी शोधाशोध केल्यावर शेवटी त्याला कळलं की टेलिफोन एक्सचेंजवर जी बाई होती, ती दुसऱ्या undertaker ची पत्नी होती.
ती कायमच स्ट्रॉजरचे कॉल्स आपल्या नवऱ्याकडे वळवत होती!

त्या काळी फोनवर नंबर डायल करायचे नव्हते.
फोन लावल्यावर थेट टेलिफोन ऑपरेटर कॉल रिसिव्ह करायचा आणि तो हव्या त्या व्यक्तीकडे जोडून द्यायचा.
पण या बाईने मात्र सगळे कॉल आपल्या पतीकडे वळवून टाकले होते.
स्ट्रॉजरला प्रचंड राग आला. त्याच्याजागी आपण असतो तर त्या बाईला खडसावलं असतं, तिची तक्रार केली असती. पण स्ट्रॉजर हा मुळात संशोधक वृत्तीचा माणूस असल्याने त्याने या प्रश्नाकडे वेगळ्या प्रकारे पाहिलं.
त्याने ठरवलं की आता अशी यंत्रणा शोधून काढायची की त्या बाईचं कामच संपेल.

त्याने ऑटोमॅटिक टेलिफोन एक्सचेंज ची कल्पना मांडली.
जिथे कॉल थेट हव्या त्या व्यक्तीकडे जाईल—मध्येमध्ये कोणी कॉल वळवू शकणार नाही.

खूप खटाटोप करून त्याने एक छोटं बेसिक मॉडेल बनवलं. त्याकाळात इलेक्ट्रॉनिक्स स्विचेस नव्हते.
हे पूर्णपणे यांत्रिक (mechanical) असल्याने अनेक भागांना हलावं लागत होतं, त्यामुळे प्रक्रिया थोडी धीमी होती.यावर उपायही स्ट्रॉजरनेच शोधला. त्याने रोटरी डायल शोधला, ज्यामुळे कॉल आपोआप योग्य नंबरकडे जाऊ शकत होते. त्यावेळी एका रोटरवर 10 कनेक्शन्स बसवता येत, त्यामुळे 10 × 10 = 100 एक्स्टेंशन्स मिळू शकत होते. (रोटरी डायल म्हणजे आपण जुन्या चित्रपटात पाहिलेला प्रत्येक आकड्यासाठी गोल डायल फिरवावा लागणारा फोन !)

1891 मध्ये त्याला पेटंट मिळालं.1892 मध्ये इंडियाना राज्यातील ला पोर्ट (La Porte) शहरात पहिलं ऑटोमॅटिक टेलिफोन एक्सचेंज बसवण्यात आलं.
आणि अगदी खरंच, या शोधामुळे त्या undertaker ची पत्नी आणि बाकी सर्व टेलिफोन ऑपरेटरचं कामच कायमचं संपून गेलं.

स्ट्रॉजरने आपल्या जाहिरातीमध्ये हेच सांगितलं :
“Girl-less. Cuss-less. Out-of-order-less. Wait-less.” (“मुलीशिवाय. शिवीशिवाय. बिघाडाशिवाय. प्रतीक्षेशिवाय.”)

1916 मध्ये त्याचं पेटंट बेल सिस्टिम्स (Bell Systems) ने विकत घेतलं.
पुढे हीच कंपनी Bell Telephone Company झाली आणि नंतर अमेरिकेतील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी AT&T बनली. स्ट्रॉजरने तयार केलेले उपकरण आजही वॉशिंग्टन येथील SPARK म्युझिअममध्ये पाहता येते. आणि त्याचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर उपलब्ध आहे.

मित्रांनो, समस्या आली की आपण रागावतो, दोष देतो किंवा हार मानतो. पण खरी वाढ (growth) तेव्हाच होते जेव्हा आपण म्हणतो:
“मी याबद्दल काय वेगळं करू शकतो ? / मी यावरून काय नवीन तयार करू शकतो?”
संकटात लपलेली संधी ओळखणे, त्यावर कृती करणे आणि दीर्घकालीन परिणाम साधणे — हीच खरी प्रगती आहे.

एका अंडरटेकरने व्यावसायिक प्रश्न सोडविण्यासाठी एक संपूर्ण उद्योगक्षेत्रच कायमचं बदलून टाकलं त्याची ही गोष्ट !…

(संकलन -श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय, उरण.)
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )

कॅशिओ कंपनी ची गोष्ट

1923 मध्ये जपानमधील ग्रेट कांतो भूकंपामुळे 100,000 पेक्षा जास्त लोक मरण पावले. लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले किंवा बदलले. त्यापैकीच एक तरुण होता तादाओ. भूकंपामुळे तादाओला टोकियोला जावे लागले. तिथे पोहोचल्यावर त्याला त्याच्या काकांसोबत लेथ ऑपरेटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तादाओ लेथ वर काम करण्यात निपुण झाला आणि लवकरच त्याने मशीन्सचे सुटे भाग बनवण्यासाठी कंत्राटदार म्हणून व्यवसाय सुरू केला. हे काम खूप कष्टाचे होते. त्याचा धाकटा भाऊ, तोशिओ देखी त्याच्या व्यवसायात सहभागी झाला.

पण तोशिओ लेथमन नव्हता. तो एक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींमध्ये रस असणारा माणूस होता. तो स्वतःला एक संशोधक मानत असे आणि एडीसनला आपला आदर्श मानत होता. तोशिओला सरकारी नोकरी होती. पण तिथे फारसे चांगले काम नव्हते. तोशिओला माहित होते की तो त्यापेक्षा मोठ्या गोष्टींसाठी बनला आहे, म्हणून त्याने आपली नोकरी सोडली आणि काहीतरी शोधण्याच्या उद्देशाने आपल्या मेहनती भावाकडे सामील झाला. त्याने अनेक कल्पना वापरून पाहिल्या, काही चालल्या काही कधीच चालल्या नाही. पण त्याची पहिली व्यावसायिकरित्या यशस्वी कल्पना, जी त्याच्या स्वतःच्या नावावर विकली गेली, ती होती अंगठीसारखे एक सिगारेट होल्डर. हे खूप लोकप्रिय झाले कारण युद्धोत्तर जपानमध्ये सिगारेट्स दुर्मिळ होत्या आणि लोक सिगारेट पूर्णपणे संपेपर्यंत ओढत असत. हे उपकरण खूप लोकप्रिय झाले. युपिबा (Yupiba) असे त्याला म्हटले जायचे, त्याने कंपनीला इतका नफा मिळवून दिला की ते काहीतरी अधिक महत्त्वाकांक्षी करण्याचा प्रयत्न करू शकले.

नवीन कल्पना शोधत असताना, दोन्ही भाऊ टोकियोमधील एका व्यवसाय प्रदर्शनात गेले, जिथे त्यांनी अनेक उत्तम अविष्कार प्रथमच पाहिले. युद्धोत्तर संपूर्ण जपानमध्ये नव्या कंपन्या, व्यवसाय उदयास येत होते. त्यामुळे बाजारातही अनेक नवनवीन वस्तू दिसत होत्या.

तोशिओला इथे एक संधी दिसली. ते जवळपास प्रत्येक व्यावसायिकाला गरजेचे ठरेल असे उपकरण होते. पण प्रदर्शनात ठेवलेले ते उपकरण अगदी प्राथमिक स्वरूपाचे आणि यांत्रिकी असल्यामुळे अवजड होते.
तोशिओने यालाच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बनविण्याचा प्रयत्न केला. त्या नव्या यंत्रावर तो आपल्या भावासोबत रात्रंदिवस काम करत राहिला. अनेक फसलेल्या प्रयत्नानंतर त्याने शेवटी एक काम करू शकेल असा नमुना (Prototype) बनवला. उत्साहाने, त्या भावांनी आपले उपकरण काही मोठ्या व्यापार कंपन्यांकडे नेले. त्यांना ते उपकरण आवडले देखील. मात्र ते खर्चिक आणि बेभरवशाचे असल्याने कोणतेही विकत घेतले नाही.

तोशिओ आणि तादाओ निराश होऊन पुन्हा आपल्या मूळ पैसे कमावून देणाऱ्या उद्योगाकडे परत जाऊ शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी त्यांचे उपकरण अधिक चांगले करण्यासाठी आणि त्यातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी त्यांचे इतर दोन भाऊ देखील सामील झाले. शेवटी, अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर त्यांना त्यांचे उपकरण मिळाले.
त्याचे वजन 140 किलो होते. ते 70 सेंटीमीटर उंच आणि पूर्ण एक मीटर रुंद होते, ज्याची किंमत 500,000 येन किंवा 1950 च्या दशकाच्या शेवटी 3,000 डॉलरपेक्षा जास्त होती. आता हे अवजड वाटत असले तरी तेव्हा हे बऱ्यापैकी स्वीकाहार्य होते.

दोन्ही भाऊ खूप उत्साही होते, त्यांचे यंत्र एका व्यापार प्रदर्शनात घेऊन जाण्यासाठी तयार होते, पण त्यांना विमानात चढण्याची परवानगी मिळाली नाही. कारण त्यांचे यंत्र विमानाच्या परवानगी असलेल्या आकारापेक्षा मोठे होते. खूप वाद घातल्यानंतर, त्यांना त्यांचे यंत्र काळजीपूर्वक वेगळे करावे लागले. विमानातून उतरल्यानंतर जेव्हा त्यांनी ते सुटे भाग पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते यंत्र चाललेच नाही. विमान कंपनीच्या धोरणामुळे त्यांचे सर्व प्रयत्न आणि तेवढी वर्षे वाया गेली.

निराश झालेले, पण हार मानण्यास तयार नव्हते. त्यांनी चित्रांचा वापर करून प्रदर्शनामध्ये शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण चालू यंत्र न पाहिल्याने त्याची उपयुक्तता लोकांना कळलीच नाही.
चौघेही पराभूत होऊन टोकियोला परत आले.
पण उचिडा योको (Uchida Yoko), जी जपानमधील सर्वात मोठी ऑफिस उपकरणांची पुरवठादार कंपनी होती तिच्या काही लोकांना या यंत्राची उपयुक्तता कळली होती. त्या कंपनीने शहानिशा करण्यासाठी आपल्या प्रतिनिधीला पाठविले. तो इतका प्रभावित झाला की त्याने उचिडा योको आणि त्या भावांसोबत एक विशेष वितरक म्हणून करार केला.
आणि तिथून पुढे इतिहास घडला. ते 140 किलोचे उपकरण जगभरातील शेकडो कार्यालयांमध्ये पोहोचले आणि त्याचे पुढील मॉडेल जगभरातील लाखो कार्यालयांमध्ये पोहोचले. तोशिओ, तादाओ आणि त्यांच्या भावांसाठी आता मागे वळून पाहण्याची गरज नव्हती, कारण त्यांची कंपनी एका शोधाकडून दुसऱ्या शोधाकडे, एका नवनिर्मितीकडून दुसऱ्या नवनिर्मितीकडे वाटचाल करत होती.

त्यांनी अनेक नवीन उपकरणे बनविली. ज्यात ऑफिस उत्पादकता, वेळ व्यवस्थापन आणि संगीतही समाविष्ट होते. खरं तर, त्यांच्या कंपनीचे नाव ते बनवत असलेल्यापैकी अनेक वस्तूंशी समानार्थी आहे. आज, अर्थातच, ते त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी सर्वात जास्त ओळखले जातात. आणि त्यांचे नाव घराघरात पोहोचले आहे. ही कंपनी एलसीडी स्क्रीन असलेला डिजिटल कॅमेरा किंवा 3.2 एमपी कॅमेरा असलेला पहिला मोबाईल फोन किंवा काचेवर मजकूर दाखविणारे मनगटी घड्याळ (wristwatch) बाजारात आणणारी पहिली कंपनी होती. 1993 मध्ये डिजिटल होकायंत्र (digital compass) असलेले मनगटी घड्याळ, 1992 मध्ये खिशात ठेवता येण्यासारखा एलसीडी टीव्ही, सिंथेसाइज्ड आवाज असलेली गिटार आणि त्यापूर्वी काही दशकांपूर्वी, जगातील पहिले वैयक्तिक कॅल्क्युलेटर, आणि त्याच्याही 15 वर्षांपूर्वी, ते 140 किलोचे ऑफिस कॅल्क्युलेटर, 14 A , ज्याने कार्यालयीन कामात क्रांती घडवली.

कोणाला खरे वाटणार नाही की इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारा हा मोठा समूह सिगारेट ठेवण्यासाठीच्या अंगठीसारख्या उत्पादनातून निर्माण झाला असेल. अर्थात, हे फक्त नशिबावर अवलंबून नाही. यात त्यांचे कठोर परिश्रम, चिकाटी आणि शुद्ध संशोधक वृत्ती देखील आहे. हे कठोर परिश्रम, चिकाटी आणि शुद्ध संशोधक वृत्ती होती तोशिओ, तादाओ, काझुओ आणि युकियो यांची, ज्या भावांचे आडनाव शेवटी मनगटी घड्याळे आणि संगीत कीबोर्डसाठी एक प्रतिशब्द बनले. ते आडनाव होते काशीओ (Kashio) किंवा जसे जगाला माहित आहे तसे कॅसिओ (Casio).
तर मित्रहो,
“कोशिश करनेवालो की हार नही होती “👍

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian उरण महाविद्यालय,उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322

(Please visit the library-blog for more articles )

स्लो लिव्हिंग – थांबून श्वास घेण्याची कला

दररोज सकाळी अलार्म वाजतो, आपण डोळे चोळत उठतो आणि धावपळ सुरू होते — नोकरी, फोन, ई-मेल, मीटिंग्स, ट्रॅफिक, सोशल मीडिया… आणि रात्री थकून कोसळताना आपल्यालाच प्रश्न पडतो.

“आज दिवसभर धावलो, पण खरंच जगणं झालं का?”

याच ठिकाणी सुरू होते “स्लो लिव्हिंग” ही सुंदर संकल्पना —
थोडं थांबणं, शांत श्वास घेणं आणि आता या क्षणात जगणं.

स्लो लिव्हिंग म्हणजे काय नाही?
हे “आळशीपणा” नाही, “काम टाळणं” नाही आणि “सगळं सोडून डोंगरात जाऊन बसणं” तर मुळीच नाही.
स्लो लिव्हिंग म्हणजे — आयुष्य थांबवणं नाही, तर त्याचा वेग स्वतः ठरवणं.

स्लो लिव्हिंग म्हणजे काय आहे?

स्लो लिव्हिंग म्हणजे —

1. *जाणीवपूर्वक जगणं.*
2. *महत्वाच्या गोष्टींसाठी वेळ राखणं.*
3. *प्रत्येक क्षणातलं सौंदर्य ओळखणं.*

उदाहरणार्थ –
सकाळी ऑफिसला जायचं आहे, म्हणून घाईत गाडी दामटतो. कारण उठायला उशीर झाला, रात्री मोबाईलवर स्क्रोल करत बसलो.
पण जर थोडं लवकर झोपलो आणि सकाळी शांततेने उठलो, तर गाडीही हळू चालवता येते, मनही प्रसन्न राहतं. एवढं साधं आहे हे!

आपल्याला सगळं हवं असतं — नवी गाडी, नवा फोन, नवे कपडे…
पण एकदा मनाला विचारलं की, “खरंच ही गरज आहे का?”
उत्तर बहुतेक वेळा “नाही” असतं.

जसं ऑनलाइन शॉपिंग करताना अनेक वस्तू कार्टमध्ये टाकतो, आणि शेवटी विचार करतो — “खरंच हे आवश्यक आहे का?”
तो विचार आला की विषय संपतो.

गरजा मर्यादित केल्या की मन मोकळं होतं, आणि तेव्हाच शांत श्वास घेता येतो.

स्लो लिव्हिंगचा मजेशीर भाग

कधी कधी हे खूप साधं असतं —

* सकाळी चहाच्या कपातून येणाऱ्या वाफेकडे बघत पावसाचा सुगंध अनुभवणं.
* मुलांनी विचारलेल्या निरागस प्रश्नाचं उत्तर प्रेमाने देणं.
* मित्राला भेटताना मोबाईल बाजूला ठेवून मनमोकळ्या गप्पा मारणं.

या छोट्या क्षणांमध्येच आयुष्याचा खरा गोडवा आहे —
आणि त्यासाठी एकही रुपया खर्च नाही.

स्लो लिव्हिंग म्हणजे फक्त मंद गती नाही, तर उद्देशपूर्ण गती आहे.
आपल्याला का जगायचं आहे, काय महत्वाचं आहे — हे उमजलं की धावपळसुद्धा शांत वाटते.

जर तुमचा उद्देश आरोग्य राखणं असेल —
तर तुम्ही जेवण, झोप, व्यायाम यांना वेळ द्याल.
जर उद्देश मन:शांती असेल —
तर तुम्ही कामापेक्षा स्वतःकडे लक्ष द्याल.

आजच्या जगात स्लो लिव्हिंग का आवश्यक?

आज “ फास्ट ” जगणं म्हणजे “ स्मार्ट ” समजलं जातं. “मला वेळ नाही” असं सांगणं म्हणजे प्रतिष्ठा वाटते.
लोकं सतत व्यस्त दिसतात, पण आतून थकलेली असतात.
फास्ट लाईफ देतं यशाचं बाह्य रूप, पण घेऊन जातं मन:शांतीचं मर्म.

त्याउलट, स्लो लिव्हिंग करणारा माणूस बाहेरून शांत दिसतो, पण आतून समाधानी असतो.
तो प्रत्येक क्षणात जगतो, आणि म्हणूनच त्याचं जगणं पूर्ण वाटतं.

स्लो लिव्हिंग म्हणजे आयुष्याचा वेग कमी करणं नव्हे,
तर मनाचा वेग कमी करणं.

स्लो लिव्हिंग म्हणजे झाडासारखं —
शांत, स्थिर, पण तरीही सतत वाढत राहणारं.

स्लो लिव्हिंग म्हणजे —
पावसाच्या थेंबात, मुलाच्या हसण्यात, आणि गप्पांच्या ओघात आनंद शोधणं.

आणि सर्वात महत्त्वाचं —
*स्लो लिव्हिंग म्हणजे स्वतःसाठी थांबून श्वास घेणं.*

थोडं थांबा… डोळे मिटा… आणि श्वास घ्या.
कदाचित तुम्हाला जाणवेल —
याच क्षणात संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे.

विद्यार्थी मित्रहो,
आनंदाने उत्सहात जगा आणि आपले ध्येय साध्य करा पण..
समजून घ्या आर्ट ऑफ लिविंग….जीवन आनंदाने जगण्याची कला
All the best……

(संकलन – श्याम धारासूरकर Librarian उरण महाविद्यालय उरण.)
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322

(Please visit the library blog for more articles)

एलिझाबेथकालीन प्रसिद्ध नाटककार रॉबर्ट ग्रीन याने १५९२ मध्ये एका नवोदित लेखकावर सडकून टीका केली. त्याने लिहिलं

“तो एक उगवता कावळा आहे, आमच्या पिसांनी सजलेला (आमच्या कल्पना चोरून लिहिणारा !)
आणि तो आमच्यासारखा काव्य लिहू शकतो असा त्याचा गैरसमज आहे”.

लेखक आणि राजकारणी असलेल्या सॅम्युएल पीप्स यालाही त्या लेखकाचं त्याने पाहिलेलं नाटक अजिबात आवडलं नाही.
१६६२ मध्ये त्याने लिहिलं –
“हे माझ्या आयुष्यात पाहिलेलं सगळ्यात कंटाळवाणं नाटक आहे.”

१७५८ मध्ये फ्रेंच कवी डिडरॉ त्या लेखकाबद्दल म्हणाला:
“त्याने काव्य लिहिले यात त्याची चूक नाही, पण त्यामुळे कवितेचा दर्जा खालावला.”

१७६५ मध्ये फ्रेंच इतिहासकार आणि प्रसिद्ध लेखक व्हॉल्टेअर म्हणाला:
“तो थोडीशी कल्पनाशक्ती असलेला “जंगली” लेखक होता. त्याची नाटकं फक्त लंडन आणि कॅनडातच चालतील.”

१८१४ मध्ये कवी बायरन म्हणाला:
“त्या लेखकाचं नाव उगाचच मोठं केलं गेलंय, लवकरच लोक त्याला विसरून जातील.”

१९०७ मध्ये जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाला:
“त्याच्यासारखा लेखक मला इतका नकोसा वाटतो की त्याच्यावर दगड फेकावेत असं वाटतं.”

रशियन लेखक टॉलस्टॉय म्हणाला:
“त्याच्या नाटकांचा मला तीव्र तिरस्कार आहे आणि कंटाळा येतो.”

इतक्या मोठ्या कवी-लेखक -नाटककारांनी ज्या लेखकाची निंदा केली,
तो हयात असताना तर केलीच , त्याच्या मृत्यूपश्चातही केली,
जवळजवळ १५० वर्षे विविध महान लेखक – कवींनी ज्याच्यावर टीका केली,
आज तोच लेखक इंग्रजीतील सर्वात महान लेखक मानला जातो.

एव्हाना तुम्ही त्या लेखकाचं नाव ओळखलं असेलच !
तो लेखक आहे – विलियम शेक्सपिअर

असं का घडलं असेल ?
कोणाचं म्हणणं बरोबर आहे ? शेक्सपिअरची नाटके डोक्यावर घेणाऱ्या जगभरातील रसिकांचं की त्याच्यावर टीका करणाऱ्या हुशार, प्रभावी, प्रथितयश लेखकांचं ?

याच्यामागे एक तांत्रिक कारण आहे.
शेक्सपिअरच्या काळात जी नाटके होत तेव्हा ध्वनीक्षेपक नव्हते. कलाकारांना ओरडून बोलावे लागत होते. त्यात प्रेक्षकांचाही हल्लागुल्ला असायचा. हे वातावरण लक्षात घेऊन शेक्सपिअरने नाटके लिहिली.
त्याने सोपी भाषा, छोटी वाक्य आणि लोकाभिमुख शब्द आणि वाक्यप्रचार वापरले.
थोडक्यात, शेक्सपिअरने सामान्य पेक्षकांना समोर ठेवून नाटक लिहिलं.

शेक्सपिअरने कधीही टीकाकारांसाठी किंवा इतर लेखकांसाठी लिहिलं नाही. आणि त्याने टीका कधी ऐकलीही नाही.
त्याने सामान्य लोकांसाठी लिहिलं.
म्हणूनच आजही लोक त्याचे वाक्प्रचार दैनंदिन जीवनात वापरतात.

कधी तुम्ही एखादा सामान्य माणूस रॉबर्ट ग्रीन, व्हॉल्टेअर किंवा टॉलस्टॉय यांनी लिहिलेली वाक्य दैनंदिन वापरात ऐकली आहेत का?
पण शेक्सपिअर? रोज ऐकायला मिळतो.

हे अगदी तसेच आहे जे ज्ञानेश्वरांनी केले. सामान्य माणसांपर्यंत ज्ञान पोहोचविण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणून आज ज्ञानेश्वर अजरामर आहेत.

या उदाहरणांमधून दोन गोष्टी नक्की शिकण्यासारख्या आहेत.

१ . तुम्ही कोणीही असलात, काहीही केलं तरी टीका होणारच ! ज्यांचे ऐकले नाही ते पण टीका करणार, ज्यांचं ऐकलं ते पण टीका करणार आणि कोणाचंच ऐकली नाही तरी टीका होणारच !
त्यामुळे फार ताण घेऊ नका. मनातील “होकायंत्र” वापरा !
२ . आपल्या व्यवसायात ग्राहकांना (Target Audience) समोर ठेवूनच सर्व कामे करा. त्यांना आवडेल का ? त्यांना उपयोगी ठरेल का ? त्यांना सोयीचे होईल का ? हा एकमेव विचार सदैव मनात राहूद्या.

विद्यार्थी मित्रहो,
आपल्या नौकरी किंवा व्यवसायात वरील उदाहरण नेहमी लक्षात ठेवावं 👍

(संकलन- श्याम धारासूरकर, Librarian उरण महाविद्यालय, उरण) लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322

(Please visit the library blog for more articles )