Run, Operate and Manage by Kapil Patil Educational Institute | UGC Recognised as 2(f) 12(B) | Permanently Affiliated to University of Mumbai | Re-accredited 'B' Grade by NAAC (3rd cycle) | AISHE code 34145
आपल्याला शाळाकॉलेजेसमध्ये सगळे विषय शिकवतात पण जीवनावश्यक असलेलं आर्थिक नियोजन मात्र आपल्याला कोणीही शिकवत नाही, त्यासाठी स्वतःला ओळखून स्वतःच्या आर्थिक गरजा आणि आपले एकूण उत्पन्नाच्या तूलनेत होणारे खर्च, आपल्यावरील आर्थिक जबाबदारी या सर्वांचा सर्वंकश विचार करून मग आपल्याला हे स्वतःचं गणित बसवावं लागतं. मात्र, अनेकांना हेच गणित कसं बसवायचं ते लक्षात येत नाही. म्हणूनच, आज अशा सर्वांसाठी हा लेख, ज्यांना आर्थिक नियोजनाची घडी व्यवस्थित बसवायची आहे, त्यांनी या मुद्द्यांचा जरूर विचार करावा –
1. स्वनियंत्रण ठेवायला शिका –
स्वतःवरती नियंत्रण ठेवण्याची एक कलाच आहे खरंतर, आणि ही कला ज्यांनी जितक्या लवकर आत्मसात केली त्यांची आर्थिक बाजू तितक्या लवकर बळकट झाली असं एक निरीक्षण आहे. कसं ते बघा हं, हल्ली आपण फटाफट क्रेडीट कार्ड किंवा ऑनलाईन पेमेंटने वाट्टेल तशी शॉपिंग करतो, त्यात बरीच खरेदी ही अकारणच केलेली अनावश्यक अशी असते. तुम्ही जर नंतर बँक स्टेटमेंट काळजीपूर्वक पाहिलंत तर तुम्हालाही ते जाणवेल. क्रेडीट कार्डवरून घरबसल्या विनाकष्ट शॉपिंग करणं हे इतकं सोपं झालंय की प्रत्यक्षात हीच वस्तू आणण्यासाठी किती खर्च झाला असता ते कष्ट आपण लक्षातही घेत नाही आणि भराभर स्वॅप करत आपली हौस पुरवत जातो. म्हणूनच मित्रांनो, खर्चाच्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिका.
मग हे नियंत्रण कसं ठेवायचं, कसं कळेल की कोणता खर्च आवश्यक आहे आणि कोणता अनावश्यक ..?
तर त्यासाठी Timothy Keller चं हे वाक्य लक्षात ठेवा – ” Self control is the ability to do the important thing over the urgent “
2. तुमचं आर्थिक भविष्य कसं असेल याचा विचार करा –
जर तुम्ही अव्वाच्यासव्वा खर्च करत राहिलात आणि त्या तुलनेत तुमचं इनकम फारसं नसेल तर तुमचं आर्थिक भविष्य कसं असेल याचा एकदा विचार करून पहा. जर तुम्हाला आर्थिक नियोजन कसं करावं याविषयी अजिबात माहिती नसेल तर काही पुस्तकं वाचा, अभ्यास करा. लक्षात घ्या, दर वीकेंडला पैसे उडवणाऱा उनाड तरूण आणि आर्थिक नियोजन करणारा एक जबाबदार तरूण या दोन्हीही व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःच, पण एकाच वेळी तुम्ही या दोन्हीही व्यक्ती होऊ शकणार नाही.. हे लक्षात घ्या.
3. पैशाच्या वाटा शोधा –
आपल्याकडे एक म्हण आहे, ‘आय पाहून व्यय करावा ..!’ म्हणजे काय की तुमचं अर्थार्जन जितकं आहे त्या तुलनेतच किंबहुना त्यापेक्षा कमी खर्च करावा, पण बरेचदा हे शक्य होत नाही कारण आपल्याकडे पैसा येण्यापूर्वीच तो कुठे कुठे खर्च करायचाय याचं नियोजन झालेलं असतं. मग हा बॅलन्स कसा साधायचा, तर त्यासाठीच पैशाच्या वाटा शोधा.. म्हणजे पैसा नेमका कुठे कुठे खर्च होणार आहे ते आधी एका कागदावर लिहून काढा आणि मग त्यातील अनावश्यक ठिकाणी खर्च होत असलेल्या पैशाच्या मार्गांवर फुली मारून टाका.. नुसती कागदावरच नव्हे तर प्रत्यक्षातही बरं का ..!
4. तात्काळ खर्चासाठी काही रक्कम पूर्वनियोजित वेगळी काढून ठेवा –
आपण कितीही प्लॅन केलं तरीही आर्थिक गणित नीट बसतंच असं नाही, याचं कारण अचानक, तात्काळ उद्भवणारे खर्च. कधी अपघातासाठी, कधी अचानक आजारपणं, कधी लग्नमुंजी, कधी अचानक आलेले पाहुणे .. अशा हज्जारो गोष्टी ज्या आपल्या नियोजनात नसतात पण ऐनवेळी हे खर्च निघतात, म्हणून त्यासाठी दरमहा काही रक्कम बाजूला काढून ठेवत चला. बँकेत तुम्ही अशा काही रकमेच्या एफडीसुद्धा करून ठेऊ शकता.
5. निवृत्ती नंतरचं आर्थिक नियोजन –
नोकरी करणाऱ्यांसाठी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. निवृत्तीनंतरचं आर्थिक नियोजन आधीच करून ठेवायला हवं. कारण, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी पैसे मागायला कोणापुढेही हात पसरावे लागले नाही पाहिजेत हे लक्षात ठेवा, या जगात आपल्याजवळ पैसा असतो तोवरच आपल्याला किंमत असते ही काहीशी दुःखद पण खरी गोष्ट आहे. म्हणून, आज जे कमावताय त्यातलेच पैसे वृद्धापकाळासाठी बाजूला ठेवायला लागा. वॉरेन बफेट तर म्हणतात, “Spend what is left after saving.”
6. कर भरण्याला गांभीर्याने घ्या –
अनेकदा आपण टॅक्स भरण्याला फारसं महत्त्व देत नाही, परंतु, त्याकडे लक्ष देणं, आपला टॅक्स किती आणि कसा कधी भरावा लागेल या सगळ्याबाबत माहिती असणं हे सगळं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते जमत नसल्यास ऑनलाईन टॅक्स कॅलक्यूलेटर्स वापरू शकता.
7. आरोग्याची काळजी घ्या –
आता तुम्ही म्हणाल, अचानक हे काय.. तर खरंय मित्रांनो, ‘Health is wealth’ असं म्हणतात ते खरंच आहे. स्वतःची काळजी घेतली नाहीत तर सगळा पैसा सतत दवाखान्यांमध्येच खर्च होत राहील म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
(संकलन – श्याम धारासूरकर, लायब्ररिअन, उरण महाविद्यालय, उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )
सवयीनुसार, तुम्ही एकतर उजवा बूट आधी घालता किंवा डावा. सवयीनुसार, तुम्ही बुटाची लेस बांधताना उजव्या हाताकडील लेस डाव्या बाजूच्या लेसच्या मागून घेता किंवा याच्या उलट करता. उद्या सकाळी लक्षपूर्वक पहा की तुम्ही कोणता बूट आधी घालता आणि लेस कशी बांधता. आता जाणीवपूर्वक असा निर्णय घ्या की, पुढील २१ दिवस तुम्ही दुसरा बूट (नेहमीच्या विरुद्ध पायाचा) आधी घालून आणि वेगळ्या पद्धतीने लेस बांधून एक नवीन सवय लावणार आहात. दररोज सकाळी, जेव्हा तुम्ही अशा विशिष्ट पद्धतीने बूट घालण्याचे ठरवाल, तेव्हा ही साधी कृती तुम्हाला त्या दिवसभरातील विचार करण्याच्या, वागण्याच्या आणि अनुभवण्याच्या इतर जुन्या सवयी बदलण्यासाठीची एक ‘आठवण’ (Reminder) ठरू दे.बुटाची लेस बांधताना स्वतःला सांगा, ‘मी दिवसाची सुरुवात एका नवीन आणि चांगल्या पद्धतीने करत आहे.’ त्यानंतर, जाणीवपूर्वक ठरवा की दिवसभर:
१. मी शक्य तितका प्रसन्न (Cheerful) राहीन.
२. मी इतर लोकांशी थोडे अधिक मैत्रीपूर्ण वागण्याचा आणि तशी भावना ठेवण्याचा प्रयत्न करेन.
३. मी इतरांवर टीका करणे थोडे कमी करेन आणि त्यांच्या दोषांबद्दल, उणिवांबद्दल आणि चुकांबद्दल थोडा अधिक सहनशील होईन. त्यांच्या कृतींचा मी शक्य तितका ‘चांगला’ अर्थ लावेन (त्यांच्या वागण्यामागे वाईट हेतू न शोधता चांगला हेतू शोधेन).
४. ‘यश हे अपरिहार्य आहे’ (ते नक्की मिळणारच आहे) आणि मला ज्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व बनायचे आहे, तसा मी आधीच आहे, असे समजून मी वागेन. “मी जसा असायला हवे होते, तसा मी आधीच आहे” या भावनेचा मी सराव करेन.
५. मी माझ्या स्वतःच्या मतांमुळे तथ्यांना (Facts) किंवा घटनांना निराशावादी किंवा नकारात्मक रंग देणार नाही.
६. मी दिवसातून किमान तीन वेळा तरी हसण्याचा (स्मितहास्य करण्याचा) सराव करेन.
७. काहीही घडले, तरी मी शक्य तितक्या शांतपणे आणि समंजसपणे प्रतिक्रिया देईन.
८. ज्या निराशावादी आणि नकारात्मक ‘तथ्यांमध्ये’ (परिस्थितीत) मी काहीही बदल करू शकत नाही, त्यांच्याकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष करेन आणि त्यांच्यासाठी माझे मन बंद करेन.
हे सोपे आहे का? तर होय. पण वागणे, अनुभवणे आणि विचार करणे या, वर दिलेल्या प्रत्येक सवयीचा तुमच्या ‘आत्म प्रतिमेवर’ (Self-image) एक फायदेशीर आणि रचनात्मक प्रभाव नक्कीच पडतो. २१ दिवस याप्रमाणे कृती करून पहा. त्यांचा प्रत्यक्ष “अनुभव” घ्या, आणि पहा की तुमची चिंता, अपराधीपणाची भावना आणि इतरांबद्दलची कटुता कमी झाली आहे की नाही; तसेच तुमचा आत्मविश्वास वाढला आहे की नाही.
( मॅक्सवेल माल्ट्झ लिखित सायको सायबरनेटिक्स या पुस्तकातून )
शिक्षण नाही,
अनुभव नाही,
भांडवल नाही,
मदत नाही,
समाजाचा सपोर्ट नाही….या परिस्थितीत भलेभले हात टेकतात. मात्र सात महिलांनी या परिस्थितीवर मात करून तब्बल 1600 करोडचा व्यवसाय उभा केला. त्यांच्या जिद्दीची आणि अचाट बिझनेस कौशल्याची ही गोष्ट !
वर दिलेली कारणं तुमच्या पण प्रगतीच्या आड येत असतील तर ही गोष्ट वाचून तुम्हाला लक्षात येईल की ही फक्त “कारणे” आहेत , प्रश्न नाहीत.
तर .. ते वर्ष असेल साधारण 1950 चं.. जेव्हा भारतातील बहुतांश लोकांच्या पदरी शिक्षण नव्हतं. शिक्षणालाच मुळात तेव्हा तितकंस महत्त्व प्राप्त झालेलं नव्हतं, असा तो काळ. या काळात सात बायकांनी
(जसवंतिबेन जमनादास पोपट, परवतीबेन रामदास थोडानी, उजंबेन नरांडास कुंडलिया, बानुबेन एन. तन्ना, लगुबेन अमृतलाल गोकानी, जयबेन वी. विथलानी, आणि दिवालिबेन लुक्का..)
जसवंतिबेन जमनादास पोपट यांना लिज्जत पापड चे प्रमुख संस्थापक मानले जाते.
ज्यांना मुळात उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा कोणताही अनुभव नव्हता ना पदरी शिक्षण होतं.. अशा बायकांनी एकत्र येऊन एक असा उद्योगव्यवसाय सुरू केला की जो बघता बघता प्रचंड वाढला. या व्यवसायाची उलाढाल अल्पावधीतच तब्बल 1600 कोटींइतकी झाली आणि तब्बल 69 शाखाही अस्तित्वात आल्या.
या विलक्षण उद्योगव्यवसायाचं नाव होतं, ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड !’
अलिकडच्या काळातील टॉपक्लास दोन कंपन्या ‘स्टारबक्स’ आणि ‘Apple’ यांच्या व्यावसायिक धोरणांशी मिळतीजुळती तत्व भारतातील लिज्जत पापड समूहानी त्याकाळीच राबवली होती.
काय होतं या कंपनीच्या धोरणांमध्ये एवढं विशेष की ज्यामुळे ही कंपनी अल्पावधीतच एवढी फोफावली आणि तब्बल 62 वर्षांहून अधिक काळ या कंपनीने जनमानसावर राज्य केलं ?
तत्कालीन भारताची स्थिती अशी होती की जेव्हा अगदी 8 टक्केच महिला शिकलेल्या होत्या. मात्र, शिकलेल्या असूनही त्यांनासुद्धा घराबाहेर पडून काम करण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीही, 1959 च्या सुमारास सात महिलांनी एकत्र येत अशी कल्पना प्रत्यक्षात आणली ज्यासाठी त्यांना कुठेच घराबाहेर न जाताही नफा कमावता येणार होता. शिवाय वेळेचं बंधन नव्हतं आणि हे उत्पादन तत्कालीन बाजारपेठेची गरजही होतं.
सुरूवातीला मिळालेल्या अवघ्या 80 रूपयांच्या भांडवलातून काम सुरू झालं. मात्र एवढ्याशा भांडवलातूनही त्यांनी बनवलेले पापड इतके चविष्ट होते की अल्पावधीतच लहानमोठ्या दुकानदारांनी हे पापड आपल्याकडे विक्रीसाठी ठेवण्यास सुरूवात केली.
आता हळूहळू लिज्जत पापडने आपला व्यवसाय वाढवायला सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी आपल्या उत्पादनांची किंमत थोडीफार वाढवली आणि आपल्याबरोबर आणखी काही महिलांना या कामी जोडून घेतले. त्यांच्या या कृतीने महिलांच्या जीवनात रंग भरले, अनेक महिलांना जगण्याचा नवा उद्देश सापडला, नवा दृष्टीकोन मिळाला.
या कंपनीच्या पहिल्या बोर्ड मीटींगमध्ये त्यांनी ‘महिला सक्षमीकरण’ हेच उद्दीष्ट ठरवून टाकले. महिलांचं जीवन फुलवणे व त्यांना स्वयंपूर्ण होता येण्यासाठी हा समूह योगदान देईल असे मोठे लक्ष्य आता या कंपनीने समोर ठेवले व त्यानुरूप काम सुरू केले. त्यासाठी कंपनीला मिळणाऱ्या नफ्यातील काही रकमेची तरतूद सर्वानुमते करण्यात आली. लिज्जत समूहाशी जोडल्या जाणाऱ्या महिलांना ‘कामगार’ वगैरे न संबोधता छानपैकी ‘लिज्जत सिस्टर्स’ अर्थात ‘लिज्जत भगिनी’ असे संबोधून त्या प्रत्येकीला कंपनीच्या मालकीहक्कातील काही प्रमाणात भागधारक बनवण्यात आले. सामुहिक मालकी हक्क तत्वावर कंपनी अधिक जोमाने प्रगती करू लागली. नफा आणि तोटा सर्वांनी मिळून वाटून घ्यायचा हे साधं तत्व..
ना वयाची अट, ना धर्माची, ना जातीची ..
प्रत्येक महिला कंपनीची काही प्रमाणात मालकीण असणार हेच धोरण कायमस्वरूपी राबवले गेले. सध्या प्रचलित असलेल्या ‘स्टारबक्स’ कंपनीनेही हेच धोरण अंगिकारले आहे.. केवळ फरक एवढाच आहे की स्टारबक्समध्ये एमबीए पदवी घेतलेल्या सुशिक्षित हुशार पदाधिकाऱ्यांनी ही कल्पना राबवली आहे तर लिज्जत पापड समूहातील स्त्रिया अल्पशिक्षित व अशिक्षित असूनही त्यांनी हीच कल्पना कैक वर्षांपूर्वीच राबवली होती.. तेव्हा स्टारबक्सचा जन्मही झाला नव्हता. एवढी कुशाग्र बुद्धीमत्ता या महिलांची होती.
लिज्जत समूहाच्या प्रगतीचा दुसरा व महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी सप्लाय चेन तयार केल्या. याकरिता कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या जीवनशैलीशी सुसंगत कामाचे स्वरूप व वेळा आणि किफायती आणि अत्यंत दर्जेदार उत्पादन बनवण्याचा त्यांचा प्रयास यशस्वी झाला.
एका विशिष्ट मध्यवर्ती ठिकाणी पापडाकरीता वापरण्यात येणारे पीठ एकत्रित केले जाई. तिथे त्या पिठापासून पापडाची खिशी (dough) बनवली जाई. लिज्जत भगिनी तेथून ती घेऊन जात आणि त्यापासून ठराविक आकाराचे व संख्येचे पापड बनवत. हे पापड कंपनीत आणून दिले की त्यांना त्याचे पैसे आणि पुढले पापड बनवण्यासाठी पुन्हा आणखी पापडाची खिशी दिली जाई. अशा पद्धतीने काम सुरू झाले आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत दिवसागणिक कंपनी मोठी होऊ लागली.
कंपनीला जो नफा होई, तो गोल्ड कॉईन्सच्या स्वरूपात महिलांमध्ये वाटून दिला जाई. या सर्वात फार महत्त्वाचं होतं ते म्हणजे कंपनीचे ध्येयधोरण कायम ठेवणे व सर्व महिलांना त्यामध्ये व त्यानुरूप प्रोत्साहन देत काम चालू रहाणे आणि कंपनीने हे देखील यशस्वी करून दाखवले.
“सर्वांसाठी प्रगतीची द्वारे खुली” या तत्वामुळे शेकडो महिला या समुहाशी देशभरातून जोडल्या गेल्या व त्यांनी आपली प्रगती व आपल्या मेहनतीने व्यवसायवृद्धीही केली.
एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की केवळ एमबीए सारख्या मोठमोठ्या पदव्या असतील तरच तुमचा व्यवसाय यशस्वी होतो असे नाही, तर व्यवसाय यशस्वी होण्यासाठी एकात्मतेची ताकद ओळखता यायला हवी.
एका उद्योजकात म्हणूनच शिक्षणाबरोबरच, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि दूरदृष्टी व विकास करण्याची क्षमता या साऱ्यांचा उत्तम मिलाप असला पाहिजे.
(संकलन – श्याम धारासूरकर, ग्रंथपाल, उरण महाविद्यालय, उरण
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit the library-blog for more articles )
मिलेनियल्स, जेंझी, अल्फा जनरेशन नंतर ऑक्सफर्ड डिक्शनरीने एक नवीन शब्द आणलाय “ब्रेन रॉट” जनरेशन.
“अधाश्यासारखे इंस्टाग्राम, टिकटॉक, युटूबवरील पंधरावीस सेकंदाच्या रिल्स तासंतास पाहून झोंबीसारखे त्याच्या आहारी जाऊन स्वतःचा मेंदू कुजवून घेणारी पिढी” हा ब्रेन रॉट या शब्दाचा अर्थ होतोय. चार वर्षाच्या लेकरापासून ते सत्तर वर्षांचे म्हातारे, मिलेनियल्स, जेंझी, अल्फा हे आता ब्रेन रॉटचे झोंबी झालेत. ऑक्सफर्ड डिक्शनरीने तर या शब्दाला २०२४ मधील “word of the year ” म्हणून घोषित केला.
कामावरून बसने-कारने घरी जाणारी मिलेनियल्स, गावभर उंडारत फिरणारी झेंजी, नाहीतर काहीच काम नाही म्हणून निवांत बेडवर सोफ्यावर लोळत पडणारी अल्फा, सगळी पिढी आता फक्त ब्रेन रॉट झाली आहे. रिल्स स्क्रोल करून – करून आता कुठंतरी थांबावं, पण नाही. जरा मोबाईलच्या स्क्रीनवरून बोटं बाजूला झाली कि मेंदूतून जोराची सनक येतेय, समोर दिसेल त्याच्यावर चिडचिड होतेय “झोंबी स्क्रोलिंग”. एवढा वेळ डोळ्यांची दिवाळी आणि मेंदूचा भुगा करून काहीच कसं मिळालं नाही याची अजूनच सणक येत असेल तर अभिनंदन तुम्ही तुमची एक नवीनच पिढी तयार केली आहे
आणि हो तुमच्यासारखे असे लाखोजण तुमच्या आजूबाजूला सोशल मीडियाचे रक्तपिपासू झोंबी आहेत “ब्रेन रॉटस”
सुरवातीला या शब्दला विरोध झाला अशी काही पिढी अस्तित्वातच नाही त्यामुळे हा शब्द माघारी घ्या म्हणून लोकांनी आवाज उठवला. पण कोंबड झाकलं म्हणून दिवस उगवायचा थांबत नाही या म्हणीप्रमाणे ऑस्ट्रेलियातील काही संशोधकांनी सुमारे एक लाख लोकांच्यावर मानसिक कसोटीच्या आधारवर प्रयोग आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन ब्रेन रॉट अस्तित्वात आहे हे सिद्ध केले. अगदी दोन आठवड्यापूर्वी त्यांनी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये आपले संशोधन प्रसिद्ध केले आणि मग जगभरतील मीडिया जागी झाली, या पिढीच्या अस्तित्वाला विरोध करणारे नास्तिक अचानक पुन्हा ब्रेन रॉटचे आस्तिक झाले. हे संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणतायत ब्रेन रॉट फक्त एक मानसिक रोग नसून त्याच्याहीपुढ निघून गेला आहे जो आता एक शारीरिक दुष्परिणाम झाला आहे ज्याला डॉक्टर “न्यूरोकॉग्निटिव सिंड्रोम” असं म्हणतात जो मेंदूपेशींचे आतून नुकसान करतोय.
या सगळ्याच्या मागे एकच केमिकल लोचा आहे तो म्हणजे “डोपामिन” तो नाद लावतोय, नवीन काहीतरी बघा, पुढं जावा अजून स्क्रिनवर बोटं फिरवा मग मी तुम्हाला आनंदी ठेवेन, तेच ते बघत राहिलात तर तो आनंद कमी करेन.
डोपामिन आपल्याला म्हणतं: “काहीतरी नवीन बघ… अजून बघ… अजून स्क्रोल कर… मी तुला लगेच आनंद देतो.” पंधरावीस सेकंद करत करत पुढं तासंतास डोकं त्यामध्ये गुरफटून जातेय आणि
शेवटी उरतोय रिकामपणा…. डोकं सुन्न करणारा. !!!!
मग हा मेंदूचा “रिवार्ड सिस्टम” डोपामिन ओव्हरलोड होतोय, आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी मेंदूमधील डोपामिन रिसेप्टर कमी करतो. डोपामिन वारंवार वाढल्यामुळे मेंदूतील काही भाग सतत उत्तेजित राहतोय, सारखी सारखी उत्तेजना पाहिजेय त्याला, मग त्या उत्तेजनेच्या नादात एकाग्रता, निर्णय घेणे (Prefrontal cortex ) रोजच्या सवयी (Striatum) यांचा लय बिघडतोय आणि मग पुन्हा मेंदूच्या सर्किट्सवर ताण येतोय आणि आपले लक्ष एखाद्या कामावरून कमी होतेय. मग हे आशाळलेले मन मेंदूकडे अजून डोपामिनची मागणी करतेय.
विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर मेंदूमध्ये डोपामिन मुख्यतः मिडब्रेनमध्ये तयार होते त्यानंतर त्याला सुरक्षित पॅकेजमध्ये ठेवून सिनॅप्समध्ये सोडली जातात. सिनॅप्स हा एक जंक्शन आहे जिथे एक न्युरॉनने दुसऱ्या न्युरॉनशी संवाद साधतो, जेणेकरून मेंदूचा संदेश दुसऱ्या न्यूरॉन्सपर्यंत पोहोचेल. पुढे अति झालेलं डोपामिन transporters आणि एंझाइम्सद्वारे metabolize केलं जात म्हणजे हे होताना काही प्रमाणात reactive oxygen species (ROS) तयार होतात, जे जर जास्त झाले तर पेशींना oxidative stress होऊ शकतो. या नादात मेंदूच्या पेशींमध्ये ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढतो हा केमिकल स्ट्रेस म्हणजे पेशींमध्ये मोकळी फिरणारी विषारी रसायने, जी त्या पेशींना आतून वाळवीसारखे पोखरतात. हा मेंदूच्या पेशींमधील स्ट्रेस सारखाच वाढत राहिला तर पेशींची न भरून येणारी हानी होतेय या मेंदूपेशींना हा स्ट्रेस डॅमेज करायला सुरवात करतो. अशी स्थिती फक्त अत्यधिक किंवा pathological dopamine activity मध्ये होते, जसे की काही ड्रग्स वापरल्यास किंवा dopamine नियमन बिघडल्यास. हाच बिघडलेला डोपामिन पुढे जाऊन तो पेशींच्या प्रोटीन, DNA आणि ऊर्जा केंद्रांवर हल्ला करतो आणि मग जगण्यासाठी पेशींना जास्तीचा ऑक्सिजन वापरायला भाग पडतो. त्यातून सतत ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढू लागल्यास न्यूरॉन्स नीट काम करत नाहीत किंवा मरतात, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता कमी होते, मानसिक थकवा, चिंता, डिप्रेशन आणि अल्झायमर, पार्किन्सन सारखे न्यूरोडीजेनेरेटिव आजार होऊ शकतात.
खरेतर बाबा आमटे म्हणाले होते “देश उभा करायला आणि बुडती नाव वाचवायला समुद्रात झोकून देणारे कॅप्टन हवे असतात.” हे कॅप्टन अंगमेहनती असले पाहिजेत, तासंतास एकाग्रचित्त होऊन वाचन करणारे अभ्यास करणारे विचारवंतअसले पाहिजेत. रात्रदिवस प्रयोगशाळेत प्रयोग करणारे शास्त्रज्ञच जपान-जर्मनीसारखे बेचिराख झालेले देश राखेतून उभा करू शकतात. पण आमचे जेंझी आणि अल्फा ज्यांच्यावर मिलनियल्सच्या म्हातारपणाच्या अपेक्षा आहेत त्यांची एकाग्रता पंधरा सेकंदावर आली आहे. आता पुढच्या पिढीतून कुठले अब्दुल कलाम आणि सीव्ही रामन…!!!
याच पिढीच्या खांद्यावर पुढचा देश, पुढचं विज्ञान, पुढचं तंत्रज्ञान उभं राहणार आहे. आणि हि पिढी कुठाय?
१५ सेकंदांच्या जगात बंदिस्त……
“अंगमेहनती लोक, सतत शिकणारे, वाचन करणारे, प्रयोग करणारे, विचार करणारे” जपान-जर्मनी राखेतून उभे राहिले ते अशा लोकांच्या कष्टांवर.
या पंधरा सेकंदाच्या व्यसनामुळं शास्त्रज्ञांना असं दिसून येतेय एक पिढीचं सामाजिक जीवनातून एकांतपणा घेतेय. कमी जीवन समाधान, आत्मसन्मान कमी, स्वतःच्या प्रतिमेबद्दल चिंता, नीट झोप न येणे, चिंता आणि एकटेपणा यांसारखे नकारात्मक परिणाम या ब्रेन रॉट पिढीमध्ये वाढतायत. पंधरा सेकंदांच्या जगात बंदिस्त असलेली ही पिढी तरी बदलू शकते; स्वतःला डिजिटल व्यसनापासून दूर ठेवून, एकाग्रता जपून, सतत शिकत राहून आणि विचार करून मेंदूला शांत होण्याची कला शिकवणारीच पिढी पुढील अब्दुल कलाम, सी.व्ही. रामन तयार करू शकते.
नाहीतर तुम्हाला माहित आहे का मेंदूचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे जो आजपर्यंत कोणताच शास्त्रज्ञ सोडवू शकला नाही….
“The brain loves the stimulation but struggles with the comedown”
मेंदूला उत्तेजना खूप आवडते, पण त्यानंतर शांत होणे त्याला कठीण जाते.
पंधरा सेकंदाच्या बंदिस्त जगातील ब्रेन रॉट “झोंबी स्क्रोलिंग” पिढी आता या मेंदूच्या जाळयात अडकत चालली आहे.
(संकलन – श्याम धारासूरकर, ग्रंथपाल, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit the library-blog for more articles )